स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांचं महत्वाचं वक्तव्य, काय म्हणाले पवार?

| Updated on: Aug 21, 2021 | 6:17 PM

राज्यात महाविकास आघाडीच्या रुपात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र असले तरी स्थानिक पातळीवर हे पक्ष स्वतंत्र लढण्याचीच शक्यता अधिक आहे. अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्वाचं वक्तव्य केलंय. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याची मुभा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेबाबत त्या त्या जिल्ह्यात अधिकारी देणार असल्याचं अजित पवार म्हणाले.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांचं महत्वाचं वक्तव्य, काय म्हणाले पवार?
उपमुख्यमंत्री अजित पवार
Follow us on

बारामती : राज्यातील महत्वाच्या महापालिका आणि नगर परिषद निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यात महाविकास आघाडीच्या रुपात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र असले तरी स्थानिक पातळीवर हे पक्ष स्वतंत्र लढण्याचीच शक्यता अधिक आहे. अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्वाचं वक्तव्य केलंय. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याची मुभा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेबाबत त्या त्या जिल्ह्यात अधिकारी देणार असल्याचं अजित पवार म्हणाले. (Important statement of Deputy CM Ajit Pawar regarding local body elections)

अजित पवार काय म्हणाले?

प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याची मुभा आहे. सद्यस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना एकत्र सरकार चालवत आहेतत. राज्य स्तरावरच्या आणि इतर महत्वाच्या निवडणुका लढवण्याबाबत वरिष्ठ पातळीवरचे नेते निर्णय घेतात. स्थानिक स्वराज्य संस्थेबाबत त्या त्या जिल्हात अधिकार देणार. याबाबत उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, छगन भुजबळ आम्ही सर्वजण बैठक घेऊन निवडणुकाबाबत दिशा ठरवू, असं अजित पवार म्हणाले.

पिंपरी-चिंचवड लाचखोरी प्रकरणात सूडबुद्धीने कारवाई नाही

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्षांसह 4 जणांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं कारवाई केलीय. या कारवाईबाबत महापालिकेतील सत्ताधारी भाजपकडून हे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप करण्यात येतोय. विरोधकांच्या या आरोपांना अजित पवार यांनी उत्तर दिलं आहे. ही कारवाई सूडबुद्धीने झालेली नाही. जर तुम्ही भ्रष्टाचार केला नाही तर तुम्ही त्यात सापडू शकता का? असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केलाय. सूडबुद्धीनं कारवाई हे चुकीचं वक्तव्य आहे. त्याला काही अर्थ नाही, असं अजित पवार म्हणाले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षांवर कारवाई झाली तर आम्ही कारवाई केली. जर आमच्यावर कारवाई झाली तर त्या संस्थेला मुभा आहे म्हणून कारवाई झाली असतं बोलतात. वास्तविक कुणाचं तरी काहीतरी चुकलं आहे म्हणून एसीबीने कारवाई केली आहे. या कारवाईत राजकीय हेतू नाही. प्रत्येकानं पारदर्शकपणे काम करावं ही जनतेची अपेक्षा आहे. कुणी चुकीचं काम करत असेल तर त्यांच्यावर कारवाई करणं हे एसीबीचं काम आहे. कुठेतरी पाणी मुरत असेल तर त्या लोकांना शासन करणं हे एसीबीच्या कामाचा भाग असल्याचंही अजित पवार यांनी म्हटलंय.

‘शिळ्या कढीला ऊत आणू नका’

अजित पवार यांनी राज ठाकरे यांच्या प्रकरणाचा द एन्ड केला आहे. पत्रकारांनी राज ठाकरे यांच्यावर अजितदादांना प्रश्न विचारताच शिळ्या कढीला ऊत आणू नका, असं म्हणत अजितदादा पत्रकारांवर संतापले. आमच्या दृष्टीने राज ठाकरेंचा विषय संपला, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

आज अजित पवार बारामती दौऱ्यावर आहे. सकाळी 7 वाजल्यापासून ते बारामतीत विविध कार्यक्रमांना हजेरी लावत आहे. बारामतीच्या कोव्हिड परिस्थितीची आढावा बैठक संपल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरं दिली.

इतर बातम्या :

‘मदिरालयावर ज्यांचा विश्वास, त्यांना मंदिरांशी काही देणंघेणं नाही’, सुधीर मुनगंटीवारांचा सरकारला टोला

स्टंटबाजी कशाला करताय, आमचीही तीच भूमिका, पडळकरांच्या बैलगाडा शर्यतीनंतर अजित पवारांचं मोठं भाष्य

Important statement of Deputy CM Ajit Pawar regarding local body elections