30 वर्षांचा अनुभव पणाला लावणार, 175 जागा जिंकणार : अजित पवार

| Updated on: Jul 26, 2019 | 3:41 PM

आमचं सरकार सत्तेत आल्यावर खासगी आणि शासकीय नोकरीत स्थानिकांना 75 टक्के जागा राखीव ठेवण्याचा निर्णय घेऊ. याबाबतचा कायदाच आम्ही करणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली.

30 वर्षांचा अनुभव पणाला लावणार, 175 जागा जिंकणार : अजित पवार
Follow us on

सोलापूर : आमचं सरकार सत्तेत आल्यावर खासगी आणि शासकीय नोकरीत स्थानिकांना 75 टक्के जागा राखीव ठेवण्याचा निर्णय घेऊ. याबाबतचा कायदाच आम्ही करणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली. विशेष म्हणजे या विधानसभा निवडणुकीत आपला 30 वर्षांचा अनुभव पणाला लावून 175 जागा जिंकण्याचा निर्धार अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलाय.

अजित पवार आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी विधानसभेसाठी सोलापूर जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांनी आमच्यासोबत यावं. लोकसभेला वंचितमुळे 12 जागांवर फटका बसला. तसा तो दोघांनाही फटका बसलाय, त्यामुळे विधानसभेला एकत्रित लढावं, तसंच याकाळात विरोधकांनी समंजसपणा दाखवणं गरजेचं असल्याचंही अजित पवार म्हणाले. आगामी विधानसभेला 30 वर्षांचा अनुभव पणाला लावून विधासनसभेच्या 175 जागा जिंकण्याचा आमचा माणस असल्याचंही अजित पवार यावेळी म्हणाले.

राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांना भाजपात आणण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले. मात्र त्यांनी नकार दिल्यानंतर आयकर विभागाच्या धाडी टाकण्यात आल्या. आम्ही सत्तेत असताना अशा प्रकारचं कारस्थान कधीच केलं नाही. अनेक सरकारी संस्थांचा वापर करत सरकार विरोधकांना हतबल करत असल्याचा आरोप अजित पवार यांनी केला.

कर्नाटकात जनतेने सरकारला निवडून दिल्यानंतर सुद्धा कर्नाटकात अनितीचा आणि घोडेबाजार करून सत्ता स्थापित केलं जात असल्याचा आरोप अजित पवार यांनी केला.

सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशावर प्रतिक्रिया

पक्ष सोडून जाताना वेदना होतात. मात्र दुःख धरुन चालणार नाही. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 50 वर्षांच्या कारकीर्दीत अनेक चढउतार पहिले आहेत. माझ्याही 30 वर्षात असे अनेक चढउतार पाहिले, असं म्हणत अजित पवारांनी राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत गेलेल्या सचिन अहिर यांच्यावर प्रतिक्रिया दिली. शिवसेना हा जातीयवादी पक्ष आहे, असं म्हणणाऱ्यांना आत्ताच शिवबंधन कसं आठवलं, अशी टीका अजित पवार यांनी केली.