आठ महिन्यानंतरही विधान परिषद सदस्यांची नियुक्ती नाही, मुख्यमंत्र्यांची मोदींकडे राज्यपालांची तक्रार

| Updated on: Jun 08, 2021 | 1:47 PM

महाविकासआघाडी सरकार रीतसर सत्तेत आले आहे, आमच्याकडे पूर्ण बहुमत आहे. आम्ही प्रथेप्रमाणे मंत्रिमंडळात ठराव करून सदस्यांची नावे मंजूर केली आहेत. | Ajit Pawar 12 MLC Bhagat Singh Koshyari

आठ महिन्यानंतरही विधान परिषद सदस्यांची नियुक्ती नाही, मुख्यमंत्र्यांची मोदींकडे राज्यपालांची तक्रार
उपमुख्यमंत्री अजित पवार
Follow us on

नवी दिल्ली: गेल्या अनेक महिन्यांपासून वादाचा विषय ठरत असलेल्या राज्यपालनियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीचा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यासमोर मांडण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी महाराष्ट्र सदनात झालेल्या बैठकीत यासंदर्भात माहिती दिली. (DCM Ajit Pawar press conference in Maharashtra Sadan live updates after meeting with PM Modi)

आजच्या बैठकीत आम्ही पंतप्रधान मोदी यांच्यासमोर राज्यपालनियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीचा मुद्दा मांडला. महाविकासआघाडी सरकार रीतसर सत्तेत आले आहे, आमच्याकडे पूर्ण बहुमत आहे. आम्ही प्रथेप्रमाणे मंत्रिमंडळात ठराव करून सदस्यांची नावे मंजूर केली आहेत. त्यानंतर राज्यपालांना आमदारांची यादीही पाठवण्यात आली. मात्र, आठ महिने उलटूनही त्यावर निर्णय झालेला नाही. तेव्हा पंतप्रधानांनी यामध्ये लक्ष घालावे, अशी विनंती आम्ही केल्याचे अजित पवार यांनी म्हटले.

राज्यपालनियुक्त सदस्यांच्या नियुक्तीवरुन उच्च न्यायालयातही याचिका दाखल करण्यात आली आहे. आम्ही या सदस्यांच्या नियुक्तीसाठी आवश्यक असलेल्या नियमावलीतील सर्व गोष्टींची पूर्तता केली आहे, असे अजित पवार यांनी सांगितले. त्यामुळे आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी महाविकासआघाडी सरकारने दिलेल्या 12 आमदारांच्या यादीला हिरवा कंदील दाखवणार का, याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तब्बल पावणेदोन तास चर्चा केली. या शिष्टमंडळात उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचा समावेश होता. यावेळी अजित पवार यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे केंद्राने महाराष्ट्राला जीएसटी थकबाकीची रक्कम तातडीने अदा करावी, अशी मागणीही केल्याचे समजते.

संबंधित बातम्या: 

मराठा आरक्षण ते मेट्रो कारशेड, मुख्यमंत्र्यांनी मोदींपुढे मांडल्या 11 मागण्या; वाचा सविस्तर

Uddhav Thackeray: मोदींनी सगळं गांभीर्याने ऐकून घेतलंय, आता सकारात्मक पाऊल उचलावं हीच आशा: उद्धव ठाकरे

(DCM Ajit Pawar press conference in Maharashtra Sadan live updates after meeting with PM Modi)