पक्ष सोडणाऱ्या नेत्यांना चपराक, पवारांसाठी निष्ठावंत सरसावले

| Updated on: Sep 25, 2019 | 4:22 PM

औरंगाबादच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन खंद्या समर्थकांनी शरद पवारांसोबतची निष्ठा व्यक्त करण्यासाठी असा निर्णय घेतलाय की तो ऐकून प्रत्येक जण थक्क होईल.

पक्ष सोडणाऱ्या नेत्यांना चपराक, पवारांसाठी निष्ठावंत सरसावले
Follow us on

औरंगाबाद : वयाच्या 78 व्या वर्षी निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या शरद पवारांना (Sharad Pawar supporters) अनेक निष्ठावंत लोक सोडून जात आहेत. तर दुसऱ्या बाजूला अंमलबजावणी संचालनालयाने त्यांच्यावर (Sharad Pawar supporters) गुन्हा नोंदवला आहे. अशाही परिस्थितीत शरद पवारांची ऊर्जा आणखी वाढवणारी बातमी आहे. औरंगाबादच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन खंद्या समर्थकांनी शरद पवारांसोबतची निष्ठा व्यक्त करण्यासाठी असा निर्णय घेतलाय की तो ऐकून प्रत्येक जण थक्क होईल.

मुख्याध्यापकपदाचा राजीनामा देऊन पक्षाचं काम

प्रदीप सोळुंखे.. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वक्ता सेलचे ते अध्यक्ष आहेत. हे झालं त्यांचं पक्षातलं स्थान, पण व्यक्तिगत आयुष्यात प्रदीप सोळुंखे हे औरंगबाद जिल्ह्यातील शहनुरवाडी इथल्या मराठवाडा शिक्षण मंडळाच्या शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

आपला शिक्षकी पेशा सांभाळून प्रदीप सोळुंखे हे राष्ट्रवादीत कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करत आले. पण गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक निष्ठावंत पदाधिकारी पक्ष सोडून जाऊ लागले आहेत. त्यामुळे व्यथित झालेल्या प्रदीप सोळुंखे यांनी थेट आपल्या मुख्याध्यापकपदाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं पूर्णवेळ काम करण्याचा निर्णय घेतला.

चांगला पगार मिळणाऱ्या आपल्या नोकरीचा राजीनामा देऊन एका राजकीय पक्षाचं पूर्णवेळ काम करण्याचा प्रदीप सोळुंखे यांचा हा निर्णय अनेकांना रुचणारा नाही. पण पवार साहेबांच्या प्रेमापोटी हा धाडसी निर्णय घेणारे प्रदीप सोळुंखे महाराष्ट्रातील एकमेव मुख्याध्यापक असावेत. प्रदीप सोळुंखे यांच्या या निर्णयाला त्यांच्या कुटुंबानेही एकमताने पाठिंबा दिला आहे.

पीएचडी धारकाची साथ न सोडण्याची ग्वाही

दुसरे आहेत दादासाहेब कांबळे. औरंगबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ते पीएचडी करतात. विद्यार्थी दशेतच दादासाहेब कांबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम सुरू केलं. पण ज्या लोकांना शरद पवार यांनी आमदार, खासदार आणि मंत्री केलं, तेच लोक आज शरद पवार यांना सोडून जाऊ लागल्यामुळे व्यथित झालेल्या दादासाहेब कांबळे यांनी थेट 100 रुपयांच्या बॉण्डवर शपथपत्र करून शरद पवार यांना आयुष्यभर कधीही सोडून न जाण्याचा ग्वाही दिली. दादासाहेब कांबळे यांनी हे शपथपत्र थेट शरद पवार यांना सादर केलं. या शपथपत्राचं शरद पवारांनीही कौतुक केलं.

एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक दिग्गज लोक शरद पवार यांना सोडून जाऊ लागल्यामुळे विरोधक हे राष्ट्रवादीवर पक्ष संपल्याचा आरोप करत आहेत. तर दुसरीकडे अशाही परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे काम करण्यासाठी कुणी शपथपत्र लिहून देत आहेत, तर कुणी आपल्या नोकरीचा राजीनामा देत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही असंख्य निष्ठावंत कार्यकर्ते प्राण ओतायला तयार असल्याचं समोर येत आहे.