मुंबई : “किशोर वाघ(Kishor Wagh) सरांवर 12 फेब्रुवारीला गुन्हा दाखल झाला आहे. भाजपने 2016 ला याबाबत खुली चौकशी सुरू केली होती. आपण साहेबांच्या तालमीत तयार झाल्या आहात. त्यामुळे दिशाभूल करू नये,” असा टोला राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांना लगावला. चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर चित्रा वाघ यांनी त्यांना छळलं जात असल्याचा आरोप केला. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात सरकारला जाब विचारल्यामुळेच ही कारवाई केली जात असल्याचे त्या म्हणाल्या. त्यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी ट्विट करत वरील भाष्य केले. त्यांनी चित्रा वाघ यांचा मुद्दा खोडून काढला. (Amol Mitkari criticizes Chitra Wagh on alleging to Maha Vikas Aghadi government)
अमोल मिटकरी यांनी त्यांच्या ट्विटमध्ये चित्रा वाघ यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. किशोर वाघ यांच्यावर यापूर्वी म्हणजेच 12 फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल झालेला आहे. त्याहीपेक्षा सन 2016 रोजी भाजपनेच याबाबत खुली चौकशी लावलेली आहे, असा खुलासा अमोल मिटकरी यांनी ट्विटरद्वारे केला. तसेच चित्रा वाघ यांनी भाजपत प्रवेश केला नसता तर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच या प्रकरणी गुन्हा दाखल केला असता, असा दावाही त्यांनी केला. ही बाजू मांडताना त्यांनी एसीबीने दाखल केलेल्या गुन्ह्याची एफआरआयची कॉपीसुद्धा ट्विटरवर पोस्ट केली आहे.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामध्ये संजय राठोड यांचे नाव आल्यानंतर चित्रा वाघ रोज पत्रकार परिषद घेऊन सरकारला दारेवर धरत आहेत. वनमंत्री संजय राठोड यांच्यावर जोपर्यंत कारवाई होणार नाही, तोपर्यंत शांत बसणार नसल्याचं वाघ यांनी यापूर्वी अनेकवेळा बोलून दाखवलं आहे. या पूर्वी त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना मी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या तालमीत तयार झाल्याचे बोलून दाखवले होते. याच मुद्द्यावरुन आज अमोल मिटकरी यांनी चित्रा वाघ यांच्यावर टीका केली. “तुम्ही भाजपमध्ये गेल्या नसता तर देवेंद्र फडणवीस यांनीच किशोर वाघ यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असता, तुम्ही शरद पवार यांच्या तालमीत तयार झाल्या आहात. तुम्ही लोकांची दिशाभूल करु नका,” अशा शब्दांत चित्रा वाघ यांच्यावर मिटकरी यांनी टीकेचा बाण सोडला.
आ.चित्राताई,श्री किशोर वाघ सरांवर 12 फेब्रुवारीला गुन्हा दाखल झाला आहे. भाजपने 2016 ला याबाबत खुली चौकशी सुरू केली होती. आपण भाजपात गेला नसता तर देवेंद्र फडणवीसांनी तेव्हाच गुन्हा दाखल केला असता.
आपण साहेबांच्या तालमीत तयार झाल्या आहात.त्यामुळे दिशाभूल करू नये. pic.twitter.com/0JuGDXjGBN— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) February 27, 2021
चित्रा वाघ काय म्हणाल्या?
“लाच घेतल्याचे प्रकरण घडले तेव्हा माझे पती किशोर वाघ घटनास्थळापासून पाच किलोमीटरच्या परिसरातही नव्हते. याप्रकरणात मुख्य आरोपी असलेले गांधी रुग्णालयाचे तत्कालीन महानिरीक्षक गजानन भगत यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यांची अजून चौकशीच सुरु आहे. 2011 पासून एसीबीच्या अनेक केसेस पेंडिंग आहेत,” असे चित्रा वाघ म्हणाल्या. तसेच, माझ्या नवऱ्यावरच गुन्हा दाखल कसा करण्यात आला?, असा सवाल चित्रा वाघ यांनी विचारला.
एसीबीने ज्याप्रकारने तातडीने गुन्हा दाखल केला त्यासाठी मी गृहमंत्र्यांना तीनदा सॅल्यूट ठोकते. मी पूजा चव्हाण प्रकरणात आवाज उठवत असल्यामुळे माझ्या पतीला अटक करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यांच्यावर रोज दबाव आणला जातोय, त्यांना टॉर्चर केले जात आहे. पण मला न्यायव्यस्थेवर विश्वास आहे, ती सरकारसारखी मुर्दाड नाही. मी या सरकारला एकटी पुरून उरेन. मी तुमच्यासोबत 20 वर्षे काम केले आहे, हे विसरु नका, असा इशारा चित्रा वाघ यांनी दिला.