‘परमबीर आणि वाझेंनी स्वतःला वाचवण्यासाठी…’ अनिल देशमुखांचा आरोप

| Updated on: Oct 07, 2022 | 7:35 AM

अनिल देशमुखांचा सीबीआयच्या विशेष कोर्टात जामीनासाठी अर्ज, अर्जात परमबीर सिंहांसह सचिन वाझेंवर गंभीर आरोप

परमबीर आणि वाझेंनी स्वतःला वाचवण्यासाठी... अनिल देशमुखांचा आरोप
अनिल देशमुख आणि 100 कोटी वसुली प्रकरण
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर सचिन वाझे (Sachin Vaze) आणि परमबीर सिंह (Parambir Singh) यांनी 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचं काम दिल्याचा आरोप केला होता. याच प्रकरणी अटकेत असलेल्या अनिल देशमुखांनी सीबीआयच्या विशेष कोर्टात जामीनासाठी अर्ज केलाय. या अर्जात सचिन वाझेसह परमबीर सिंह यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आलाय. परमबीर आणि वाझे यांनी स्वतःला वाचवण्यासाठी माझं नाव पुढे केलं, असा आरोप अनिल देशमुखांनी केला आहे. जामीन अर्जामध्ये त्यांनी केलेल्या आरोपांवरुन आता सीबीआय कोर्टात काय युक्तिवाद केला जातोत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ईडीची अटक

नुकताच ईडीच्या गुन्ह्याप्रकरणी अनिल देशमुख यांना दिलासा मिळाला होता. सीबीआयने 100 कोटी वसुली प्रकरणी अनिल देशमुखांवर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर या प्रकरणाचा दाखला देत ईडीनेही अनिल देशमुखांवर गुन्हा दाखल करत अटक केली होती.

राज्याच्या गृहमंत्रीपदाचाही राजीनामा देशमुखांना द्यावा लागला होता. अनिल देशमुख यांच्यानंतर महाविकास आघाडी सरकारमध्ये गृहमंत्रीपद हे दिलीप वळसे पाटील यांच्याकडे देण्यात आलं होतं.

11महिन्यांपेक्षा जास्त काळ जेलमध्ये

दरम्यान, मुंबई हायकोर्टाने अखेर ईडीने केलेल्या अटकप्रकरणी देशमुखांना जामीन मंजूर केलाय. तब्बल 11 महिन्यांपेक्षा जास्त काळ कोठडीत घालवल्यानंतर अनिल देशमुखांना जामीन मिळाला होता. पण तरिही ते कोठडीबाहेर येऊ शकले नव्हते.

लवकरच सुनावणी

ईडीच्या गुन्ह्यात देशमुखांना दिलासा मिळाला असला, तरी सीबीआयच्या गुन्ह्यात अद्यापही अनिल देशमुख हे कोठडीतच आहेत. ईडीनंतर सीबीआयच्या गुन्ह्यातही जाामीन मिळवण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरु केले आहेत. त्यासाठी सीबीआयच्या विशेष कोर्टात गुरुवारी अर्जदेखील दाखल करण्यात आलाय. अनिल देशमुखांच्या जामीन अर्जावर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.

ईडीनंतर आता सीबीआयचं विशेष कोर्टही अनिल देशमुख यांना जमीन देतं का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सीबीआयच्या विशेष कोर्टात याप्रकरणाची सुनावणी नेमकी केव्हा होते, हे पाहणंही आता महत्त्वाचं ठरणार आहे.