सोनियांशी सलगी ‘गोरा बाजार’, मग अजित पवारांशी आघाडी ‘काळा बाजार’ का? : शेलार

| Updated on: Nov 24, 2019 | 11:11 AM

जे रामाला विसरले ते रामप्रहराला काळोख म्हणत आहेत. ज्यांनी सत्तेसाठी अयोध्येत राम मंदिरला जायचं रद्द केलं, त्यांनी आम्हाला शिकवू नये, अशा शब्दात आशिष शेलार यांनी राऊतांवर तोंडसुख घेतलं.

सोनियांशी सलगी गोरा बाजार, मग अजित पवारांशी आघाडी काळा बाजार का? : शेलार
Follow us on

मुंबई : दिल्लीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी केलेली सलगी म्हणजे ‘गोरा बाजार’ आणि अजित पवारांशी केलेली आघाडी म्हणजे काळा बाजार कसा? असा प्रश्न भाजप आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. जमेल त्या घाणेरड्या भाषेत उत्तर द्यायला आम्ही संजय राऊत नाही, अशा शब्दात शेलारांनी राऊतांचा समाचार घेतला. गेल्या काही दिवसांपासून शेलार आणि राऊत (Ashish Shelar on Shivsena) यांच्यात वाक्-युद्ध सुरुच आहे.

सुप्रीम कोर्टात जो न्याय निवाडा येईल तो येईल, पण 30 तारखेपर्यंत आम्हाला विश्वासदर्शक ठराव जिंकायला वेळ दिला आहे. किमान 170 संख्याबळाच्या जोरावर आम्ही विश्वासदर्शक ठराव जिंकू, असा विश्वास आशिष शेलार यांनी व्यक्त केला. 30 तारखेला बहुमत सिद्ध करुन महाराष्ट्राला स्थिर सरकार देऊ, असं आशिष शेलार म्हणाले.

आम्ही सकाळी सहा वाजता शाखेत जाणारे स्वयंसेवक आहोत, सकाळची वेळ ही रामप्रहर असते, पण जे रामाला विसरले ते रामप्रहराला काळोख म्हणत आहेत. ज्यांनी सत्तेसाठी अयोध्येत राम मंदिरला जायचं रद्द केलं, त्यांनी आम्हाला शिकवू नये, अशा शब्दात आशिष शेलार यांनी राऊतांवर तोंडसुख घेतलं.

संजय ‘राऊत’ नाही, संजय ‘पराभूत’, आशिष शेलारांची शेलकी टीका

संजय राऊत यांचे आभार, की त्यांनी इंदिरा गांधी यांनी लादलेली आणीबाणी ही भयंकर होती, हे मान्य केलं, काँग्रेस सोबत जाण्याआधीच राऊत हे इंदिरा गांधी यांच्यावर टीका करतात त्यांचं अभिनंदन, अशी शेलकी टीकाही शेलारांनी केली.

पेढ्याची ऑर्डर दिली ते पेढे आलेच नाहीत, त्या संजय राऊत यांनी खऱ्या खोट्याची भाषा करू नये, 170 वरून 165 वर आले आणि 30 तारखेला आणखी किती खाली येतील हे सांगता येत नाही. सोनिया गांधींवर टीका करणारी शिवसेना आज त्यांच्यासोबत जाते, त्यांनी आम्हाला प्रश्न विचारु नये, अशा शब्दात शेलारांनी राऊतांना सुनावलं.

ज्या अजित पवार यांना विधिमंडळ गटनेते म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस कोर्टासमोर नाकारत नाही, त्यांना आम्ही का नाकारायचं, त्यामुळे आमच्या दृष्टीने जयंत पाटील हे अधिकृत गटनेते नाहीत. विधिमंडळ नेता बदलीचं पत्र दिलं तर आमदारांची शहानिशा करण्याचा अधिकार राज्यपालांना आहे. त्यामुळे ती प्रक्रिया पार पडेपर्यंत जयंत पाटील विधिमंडळ नेते होऊ शकत नाहीत, असंही शेलार (Ashish Shelar on Shivsena) म्हणाले.