‘अंगावर आलात तर शिंगावर घेऊ’, नाना पटोलेंच्या आंदोलनाच्या इशाऱ्याला आशिष शेलारांचं जोरदार प्रत्युत्तर

| Updated on: Feb 08, 2022 | 4:45 PM

पंतप्रधान मोदी यांनी काल लोकसभेत आणि आज राज्यसभेत बोलताना काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. महाराष्ट्र काँग्रेसमुळे देशभर कोरोनाचा फैलाव झाल्याचा आरोप पंतप्रधान मोदी यांनी केला आहे. त्यावर आता राज्यात जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. पटोले यांनी दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्याला आता भाजपचे आमदार आशिष शेलार यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे.

अंगावर आलात तर शिंगावर घेऊ, नाना पटोलेंच्या आंदोलनाच्या इशाऱ्याला आशिष शेलारांचं जोरदार प्रत्युत्तर
आशिष शेलार, नाना पटोले
Follow us on

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर बोलताना महाराष्ट्राचा अपमान केल्याचा आरोप काँग्रेसकडून (Maharashtra Congress) करण्यात आलाय. हा अपमान महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्राची माफी मागावी. त्यांनी माफी मागितली नाही तर उद्या राज्यभरात भाजपच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिला आहे. पंतप्रधान मोदी यांनी काल लोकसभेत आणि आज राज्यसभेत बोलताना काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. महाराष्ट्र काँग्रेसमुळे देशभर कोरोनाचा फैलाव झाल्याचा आरोप पंतप्रधान मोदी यांनी केला आहे. त्यावर आता राज्यात जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. पटोले यांनी दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्याला आता भाजपचे आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे.

‘काँग्रेसनं आंदोलनाचा प्रयत्न जरुर करावा. लोकशाहीत आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना आहे. पण नाना पटोले तुम्ही पहिल्यांदा उत्तर द्या की, त्या गरीब, श्रमिक, मजदूर माणसाला तुम्ही फसवलं का? तुम्ही सुपरस्प्रेडर म्हणून काम का केलत? कोरोना काळात त्यांची माथी का फिरवलीत? त्यांना घराबाहेर आणून तुम्ही असुरक्षित का केलत? तुम्ही महाराष्ट्रातील श्रमिक, मजदूर माणसाचा अपमान का केलात? आणि चिनी हस्तक म्हणून चीनला हवं होतं ते तुम्ही का केलत? अंगावर आलात तर शिंगावर घेऊ, एवढंही नाना पटोले मी तुम्हाला सांगतो’, अशा शब्दात आशिष शेलार यांनी पटोले यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्याला प्रत्युत्तर दिलं आहे.

पटोलेंचा इशारा नेमका काय?

महाराष्ट्रातील जनतेने भाजपला सत्तेतून दूर केल्यापासून गल्ली पासून दिल्लीपर्यंतच्या भाजपच्या सर्व नेत्यांना महाराष्ट्र द्वेषाची कावीळ झाली आहे. त्यामुळे ते दररोज महाराष्ट्राला बदनाम करण्यासाठी खोटी नाटी षडयंत्रे रचत आहेत. आता तर पंतप्रधानांनी महाराष्ट्र द्वेषाच्या सर्व मर्यादा पार केल्या आहेत. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना त्यांनी महाराष्ट्राचा अवमान केला आहे. पंतप्रधान हे संपूर्ण देशाचा असतो याचाही त्यांना विसर पडला आहे. त्यांनी पंतप्रधानपदाची गरिमा घालवली असून ते फक्त भाजपचे प्रचारक झाले आहेत, असं पटोले म्हणाले. त्याचबरोबर मोदींनी तात्काळ महाराष्ट्राची माफी मागावी. मोदींनी माफी न मागितल्यास उद्या राज्यभरात भाजपच्या कार्यालयाबाहेर आंदोलने केली जातील, असा इशारा पटोले यांनी दिलाय.

पंतप्रधान मोदींचा नेमका आरोप काय?

‘कोरोनाच्या पहिल्या लाटेत देश जेव्हा लॉकडाऊनचं पालन करत होतं. WHO सल्ला देत होतं. तज्ज्ञ म्हणत होते की जो तिथे आहे तिथेच थांबा. कारण माणूस एका ठिकाणावरुन दुसऱ्या ठिकाणी जात असेल आणि तो कोरोना संक्रमित असेल तर त्याच्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो. तेव्हा काँग्रेसनं काय केलं, तर मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर उभं राहून लोकांना मुंबई सोडून जाण्यासाठी प्रोत्साहित केलं. कामगार, मजुरांना तिकीटं देण्यात आली. लोकांना प्रेरित करण्यात आलं. महाराष्ट्रात आमच्यावर जो बोज आहे तो जरा कमी व्हावा. तुम्ही जा… तुम्ही उत्तर प्रदेशचे आहात. तुम्ही बिहारचे आहात. जा… तिथे कोरोना पसरवा. तुम्ही हे मोठं पाप केलं. अफरातफरीचं वातावरण निर्माण केलं. कामगार बांधवांना अनेक कठीण प्रसंगात ढकलून दिलं’, अशी घणाघाती टीका पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर केलीय.

इतर बातम्या :

PM Modi Speech in Parliament: इन्हे आईना मत दिखाओ, वो आईना भी तोड देंगे, मोदींचा शेरो शायरीतून काँग्रेसवर घणाघाती हल्ला

…तर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव येणारच, इतिहास बदलण्याच्या आरोपावर मोदींचं हसत हसत उत्तर

‘माझे बाबा, आजी-आजोबांचं रक्त सांडलंय इथं’ असं म्हणणाऱ्या राहुल गांधींना मोदींनी नेहरुंच्या शब्दातच सुनावलं!