Eknath Shinde | शिवसेनेचं औरंगाबाद संस्थान खालसा! मनपा निवडणुकांच्या तोंडावर 5 आमदार शिंदेंच्या गोटात, स्थानिक भाजपाच्या पोटात गोळा का?

| Updated on: Jun 23, 2022 | 9:46 AM

शहरात महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग आराखडा जाहीर झाला आहे. बहुतांश इच्छुकांनी कोणत्या मतदार संघातून निवडणूक लढवायची हेही निश्चित केले आहे. त्यात अचानक राजकीय समीकरणे कमालीची बदलली आहेत.

Eknath Shinde | शिवसेनेचं औरंगाबाद संस्थान खालसा! मनपा निवडणुकांच्या तोंडावर 5 आमदार शिंदेंच्या गोटात, स्थानिक भाजपाच्या पोटात गोळा का?
Follow us on

रंगाबादः महाराष्ट्राच्या राजकारणातील (Maharashtra politics) भूकंपाचे पडसाद विविध शहर आणि जिल्ह्यांमधील ग्रामीण भागापर्यंत पहायला मिळत आहेत. सध्या राज्यातील घडामोडींवर सर्वांचं लक्ष असलं तरीही स्थानिक राजकारण्यांमध्येही धाकधूक वाढलीय. आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांसह भविष्यातील विधानसभेसाठी अनेकांनी तयारी सुरु केली होती. राज्यात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार असल्यामुळे भाजप म्हणून आपण स्वतंत्र लढणार असंही भाजपच्या नेत्यांनी गृहित धरलं होतं. याच धारणेतून गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून राजकारण केलं जात होतं. मात्र शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या औरंगाबादमधील (Aurangabad) पाच बडे आमदार एकनाथ शिंदेंच्या गटात गेले. सत्ता स्थापनेसाठी शिंदे गटानं भाजपाशी हातमिळवणी केली तर मोठी पदं, आणि संधी याच आमदारांना मिळतील. याच चिंतेंने स्थानिक भाजपाील इच्छुकांच्या पोटात सध्या गोळा आलाय.

शिंदे गटात गेलेले औरंगाबादचे आमदार कोण?

  1. अब्दुल सत्तार- सिल्लोड
  2. संदिपान भुमरे- पैठण
  3. संजय शिरसाट- पश्चिम औरंगाबाद
  4. रमेश बोरनारे- वैजापूर
  5. प्रदीप जैस्वाल- मध्य औरंगाबाद

भाजप नेत्यांची धाकधूक वाढली

राज्यातील उलथापालथींमुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. येथील भाजप नेत्यांनी अडीच वर्षे भाजपचे काम करताना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत पंगा घेतला आहे. त्याचे फळ म्हणून पुन्हा राजकीय बळी जाणार असेल तर आपण काय करायचं, या चिंतेनं अनेकांना ग्रासलं आहे. पण उघडपणे अजून कुणीही बोलून दाखवत नाहीयेत. सध्या तरी हिंदुत्वासाठी काही चांगलं होत असेल तर आमचा बळी गेला तरी चालेल, अशीच भावना व्यक्त केली जात आहे. भाजपचे संजय केणेकर म्हणाले. मध्य औरंगाबाद मतदार संघाच्या विधानसभा निवडणुकांसाठी ते इच्छुक असल्याची चर्चा आहे.

‘आम्ही त्याग करायला तयार’

तर पश्चिम मतदार संघावरील भाजपचे इच्छुक नेते राजू शिंदे यांनीही अशीच प्रतिक्रिया दिली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असतील तर अनेकदा आमचा अपेक्षाभंग झाला तरी चालेल. आम्हाला पक्षादेश शिरसावंद्य असेलस, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

मनपा इच्छुकांवर टांगती तलवार

दरम्यान, शहरात महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग आराखडा जाहीर झाला आहे. बहुतांश इच्छुकांनी कोणत्या मतदार संघातून निवडणूक लढवायची हेही निश्चित केले आहे. त्यात अचानक राजकीय समीकरणे कमालीची बदलली आहेत. सेनेचा मोठा गट भाजपात प्रवेश करण्याच्या मार्गावर आहे. या गटातील आमदारांचे समर्थक आपल्या प्रभागात येऊ शकतात का, याचीही चाचपणी भाजपमधील इच्छुकांकडून सुरु झाली आहे.

जिल्हा परिषद निवडणुकांच्या तोंडावर धास्ती

सिल्लोडचे अब्दुल सत्तार, वैजापूरचे रमेश बोरनारे आणि पैठणचे संदिपान भूमरे शिंदे गटात गेल्याने जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये काय भूमिका घ्यायची, याची धास्ती समर्थकांना लागलीय. शिवसेनेशी अशी गद्दारी केल्याने थेट काहींचे कार्यकर्ते संतप्त आहेत तर काही जणांचे कार्यकर्ते वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत. मात्र राज्यातील उलथापालथीनंतर ग्रामीण भागातील समर्थकांना आता राजकीय भवितव्याची चिंता वाटू लागली आहे.