‘कुठे यायचं ते सांगावं’, रवी राणा यांच्या चॅलेंजला बच्चू कडूं यांचं प्रत्युत्तर

"मी निवडून येणार नाही हे तुम्ही नाही तर निवडणुकीतले मतदार सांगतील. घोडा मैदान जवळ आहे. ते बरोबर ठरवतील", असं बच्चू कडू म्हणाले.

कुठे यायचं ते सांगावं, रवी राणा यांच्या चॅलेंजला बच्चू कडूं यांचं प्रत्युत्तर
Chetan Patil | Updated on: Nov 02, 2022 | 7:03 PM

अमरावती : आमदार बच्चू कडू यांनी काल आमदार रवी राणा यांना इशारा दिल्यानंतर त्यांच्यातील तणाव पुन्हा वाढण्याची शक्यता होती. विशेष म्हणजे अगदी तसंच काहीसं आज घडताना दिसलं. रवी राणा आज प्रसारमाध्यमांसमोर आले आणि त्यांनी बच्चू कडूंवर सडकून टीका केली. बच्चू कडू पुढच्या वेळी निवडून कसे येतात ते पाहतो, असं रवी राणा म्हणाले. त्यांच्या या विधानाला बच्चू कडू यांनी प्रत्युत्तर दिलंय.

“मी निवडून येणार नाही हे तुम्ही नाही तर निवडणुकीतले मतदार सांगतील. घोडा मैदान जवळ आहे. ते बरोबर ठरवतील”, असं बच्चू कडू म्हणाले.

“माझ्याकडून वाद मिटला आहे. त्यांनी पुन्हा चॅलेंज केलं असलं तरी शांततेत राहण्याचा माझा विचार आहे. मला वाद वाढवायचा नाही. पण तरीसुद्धा त्यांना वाटत असेल तर त्यांची इच्छा मारण्याची आहे. तर मी तयार आहे. मी कुठे यायचं रवी राणांनी सांगावं”, अशी भूमिका बच्चू कडू यांनी मांडली.

नेमकं प्रकरण काय?

आमदार रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर गेल्या आठवड्यात गंभीर आरोप केला होता. बच्चू कडू यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देण्यासाठी खोके (पैसे) घेतल्याचा आरोप रवी राणांनी केलं होतं. त्यानंतर बच्चू कडू चांगलेच आक्रमक झाले होते.

बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना या प्रकरणी प्रसारमाध्यमांसमोर भूमिका मांडण्याचं आवाहन केलं होतं. तसेच रवी राणा यांना माफी मागण्याचं सांगितलं होतं. राणांनी माफी मागितली नाही तर आपण आठ आमदारांसह सत्तेतून बाहेर पडू, असा इशारा त्यांनी दिला होता.

त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी करत दोन्ही आमदारांमधील वाद मिटवला होता. पण बच्चू कडू यांनी त्यानंतर कार्यकर्ता मेळाव्यात रवी राणा यांचं नाव न घेता पुन्हा डिवचलं होतं. त्याला आज रवी राणा यांनी प्रत्युत्तर दिलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us