मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बुधवारी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. राजीनामा देण्यापूर्वी त्यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी ते भावनिक झाल्याचे पहायला मिळाले. तसेच त्यांनी शिवसैनिकांना शांत राहण्याचे आवाहन देखील केले. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर आता महाविकास आघाडीमधील विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. या सर्व घडामोडींवर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी देखील आपले मत व्यक्त केले आहे. उद्धव ठाकरे हे संवेदनशील व्यक्तिमत्व आहे. आक्रमक न होता कोणाला न दुखवता त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे थोरात यांनी म्हटले आहे. तसेच उद्धव ठाकरे हे संयमी नसल्याचे पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी म्हटले होते. यावर देखील थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते चव्हाण यांचं वैयक्तीक मत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्राला गेले अडीच वर्ष उद्धव ठाकरे यांच्या रुपाने एक चांगले नेतृत्व लाभले. कोरोना काळात परिस्थिती बिकट बनली होती. संपूर्ण देश हातबल झाला होता. मात्र या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यंत्रणा सक्षमपणे राबवत राज्याला संकटातून बाहेर काढल्याचे थोरात यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामंतरनावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. बुधवारी संभाजीनगरच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. याला कोणाचाही विरोध नाही. हा विषय धार्मिक नाही. तर स्वराज्याशी संबंधित आहे. त्यामुळे आमचा त्याला विरोध नसल्याचे थोरात यांनी म्हटले आहे. पक्षातील आमदारांसोबत चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे देखील थोरात यांनी यावेळी सांगितले.
भाजपाची आज महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. सागर बंगल्यावर ही बैठक होणार आहे. या बैठकीला चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, अशिष शेलार यांच्यासह जवळपास सर्वच महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. सुत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार या बैठकीनंतर आज भाजपाकडून राज्यापालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करण्यात येण्याची शक्यता आहे. भाजपा एकनाथ शिंदे गटासोबत मिळून सत्ता स्थापन करण्याची शक्यता आहे.