पंकजा मुंडेंच्या माथी आणखी एक पराभव, 10 वर्षांचा गड कोसळला, धनंजय मुंडेंचा ‘या’ निवडणुकीत एकहाती विजय

| Updated on: Nov 03, 2022 | 10:33 AM

अवतीभोवती सतत गराडा घालून फिरणाऱ्या काही कार्यकर्त्यामुळे सर्वसामान्य नागरिक पंकजा यांच्यापासून दुरावले गेल्याचे जाणकारांचे मत आहे. त्याचाच फटका अनेक निवडणुकीत पंकजा यांना बसत आहे.

पंकजा मुंडेंच्या माथी आणखी एक पराभव, 10 वर्षांचा गड कोसळला, धनंजय मुंडेंचा या निवडणुकीत एकहाती विजय
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

महेंद्रकुमार मुधोळकर, बीडः पराभव आणि राजकीय माघार पंकजा मुंडेंची (Pankaja Munde) पाठ सोडायला तयार नाहीये. बीडमधील (Beed) नुकत्याच झालेल्या एका निवडणुकीतही पंकजा मुंडेंच्या गटाला धनंजय मुंडे (Dhananjay Munde) गटाने चांगलीच धुळ चारली आहे. परळीच्या पांगरी येथील सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या गटाचा दारुण पराभव झाला आहे. आमदार धनंजय मुंडे यांच्या गटाचे सर्वच उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत.

तब्बल 10 वर्षानंतर पांगरी येथील सोसायटीवर धनंजय मुंडे यांचे एकहाती वर्चस्व पहावयास मिळाले आहे. पांगरी येथेच गोपीनाथ गड आहे. त्यामुळे मुंडे भावंडांची ही लढाई वर्चस्वाची ठरते. आणि याच गावातून धनंजय मुंडे यांच्या गटाने दणदणीत विजय मिळविल्याने पंकजा मुंडे यांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

पांगरी सोसायटी धनंजय मुंडेंच्या ताब्यात गेल्याने पंकजा मुंडे यांना मोठा धक्का समजला जातोय. दरम्यान निवडणूक विजयानंतर धनंजय मुंडेंच्या गटाने मोठा जल्लोष केला आहे.

लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे पांगरी सोसायटीवर वर्चस्व होते. मात्र त्यांच्या निधनानंतर पांगरीच्या ग्रामस्थांनी पंकजा मुंडे यांना मोठी साथ देत सेवा सहकारी सोसायटी ताब्यात दिली. यंदा मात्र या निवडणुकीत मुंडे बहीण भावात चुरशीची लढाई पहावयास मिळाली.
विधानसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने धनंजय मुंडे विजयी झाले. त्यानंतर मात्र परळी मतदार संघातील अनेक लहान मोठ्या निवडणुकीत धनंजय मुंडे हे जातीने लक्ष देत विजयाची मुहूर्तमेढ रोवण्यास सुरूवात केली. आणि त्याचेच फलित म्हणून पांगरी सेवा सहकारी सोसायटीकडे पाहिले जातेय. 12 वर्षांनंतर पहिल्यांदाच या सोसायटीवर राष्ट्रवादी म्हणजेच धनंजय मुंडे यांनी एकहाती वर्चस्व मिळविले आहे.

वाल्मिक कराड ठरले किंगमेकर…

परळी नगरपरिषदेचे गट नेते वाल्मिकी कराड आहेत. ते धनंजय मुंडेंचे अत्यंत जवळचे मानले जातात. निवडणूक असो वा कुठला कार्यक्रम त्याची संपूर्ण जबाबदारी वाल्मिक कराड यांच्या खांद्यावर असते. पांगरी हे गाव वाल्मिक कराड यांचे आहे. आणि याच परिसरातून विधानसभा निवडणूक विजयाचे गणित जुळविले जाते.
वाल्मिक कराड यांची या भागात मजबूत पकड आहे. सर्वसामान्यांना तात्काळ मदत करणारे अण्णा म्हणून त्यांची खरी ओळख आहे. आमदार धनंजय मुंडेंच्या माघारी वाल्मिक कराड यांनीच या निवडणुकीचे सूत्र हलविले. त्यामुळे या निवडणुकीत वाल्मिकी कराड यांना किंगमेकर मानले जाते.

भाजपच्या पराभवाचं कारण काय?

भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्यातील राजकीय वाद सर्वश्रुत आहे. पंकजा यांचा विधानसभेत दारूण पराभव झाल्यानंतर देखील त्या मतदारसंघात जनतेच्या संपर्कात राहिल्या.

मात्र अवतीभोवती सतत गराडा घालून फिरणाऱ्या काही कार्यकर्त्यामुळे सर्वसामान्य नागरिक पंकजा यांच्यापासून दुरावले गेल्याचे जाणकारांचे मत आहे. त्याचाच फटका अनेक निवडणुकीत पंकजा यांना बसत आहे.

एकही कार्यकर्ता पाठीशी नसणारे स्वयंभू नेते पंकजा यांच्या गटात सामील झाल्याने विजयी जागा देखील पराभवाच्या खाईत जात आहेत, त्यामुळे पंकजा मुंडे यांना वेळीच सावध होण्याची गरज असल्याची चर्चा सर्वसामन्यातून होत आहे.