Sachin Ahir: शिंदे गटात जाण्यापूर्वी सचिन अहिरांनी ठाकरेंना केला मेसेज? नेमकं काय म्हणाले होते?
Sachin Ahir: सचिन आहिर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर तातडीने विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. हा निर्णय ठाकरे गटासाठी मोठा आघात मानला जात आहे. पण सचिन अहिर यांनी शिंदे गटात प्रवेश करण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांना मेसेज केला होता. त्यात काय म्हटलं होतं जाणून घ्या..

शिवसेना ठाकरे गटासाठी एकामागून एक धक्कादायक घटना घडत आहेत. अलीकडेच ठाकरे गटातील सहा खासदार यांनी पक्ष सोडून एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला. आणि आता या पक्षफुटीचा नवा अध्याय म्हणजे ठाकरे गटाचे विधान परिषद सदस्य सचिन आहिर यांनीही उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे. सचिन आहिर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर तातडीने विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. हा निर्णय ठाकरे गटासाठी मोठा आघात मानला जात आहे. दरम्यान, सचिन अहिर यांनी पक्ष सोडण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांना मेसेज केला असल्याचे बोलले जात आहे.
उद्धव ठाकरेंना निरोप
पक्ष सोडण्यापूर्वी सचिन अहिर यांनी उद्धव ठाकरे यांना एक मेसेज पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिलीआहे. या संदेशात अहिर यांनी अपरिहार्य कारणांमुळे पक्ष सोडत असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी ठाकरेंनी दिलेल्या विश्वास आणि प्रेमाबद्दल आभार मानले आणि तो कायम राहावा अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच, “पक्षाच्या उज्ज्वल भविष्यासाठी माझ्या शुभेच्छा सदैव राहतील,” असेही सचिन आहिर यांनी आपल्या निरोपात नमूद केले.
आहिर यांचा विधान परिषद सदस्यत्वाचा कार्यकाल २०२८ पर्यंत आहे. यानंतर ते वरळी विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांच्याविरुद्ध निवडणूक लढण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे हा ठाकरेंना दुहेरी धक्का ठरला आहे. मागील चार वर्षांत ठाकरे गटाला ही दुसरी मोठी पक्षफूट आहे. यामुळे पक्षात मोठी अस्वस्थता पसरली आहे.
सचिन अहिर यांची पहिली प्रतिक्रिया
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सचिन अहिर यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी, आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी जी जबाबदारी दिली. ती पार पाडण्याचं काम केलं आहे. शिंदेही साक्षीला आहे. पक्ष म्हणून जी जबाबदारी असते तिथे काम करावं लागतं. विधानसभा आणि महापालिकेत माझं काय योगदान आहे हे तिथल्या लोकांना माहीत आहे. पुण्यातील २१ विभागातील लोकांनाही योगदान माहीत आहे. काही लोकांना वाटतं आम्हीच आहोत बाकी कोण नाही असे म्हटले.