Breaking News | मलाच महाराष्ट्राचं राज्यपाल पद नकोय, भगतसिंह कोश्यारींची भावना- सूत्रांची माहिती

| Updated on: Nov 28, 2022 | 3:39 PM

कोश्यारी यांनी आपल्या निकटवर्तीयांकडे ही भावना व्यक्त केल्याची माहिती टीव्ही 9 च्या विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

Breaking News | मलाच महाराष्ट्राचं राज्यपाल पद नकोय, भगतसिंह कोश्यारींची भावना- सूत्रांची माहिती
Image Credit source: social media
Follow us on

दिनेश दुखंडे, मुंबईः एकिकडे छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) अडचणीत आल्याचे चित्र आहे. तर खुद्द भगतसिंह कोश्यारी यांनाच आता महाराष्ट्रातलं (Maharashtra Governor) हे पद नकोय, अशी माहिती समोर आली आहे. कोश्यारी यांनी आपल्या निकटवर्तीयांकडे ही भावना व्यक्त केल्याची माहिती टीव्ही 9 च्या विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय हालचालींना आणखी वेग येण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यपाल भगत सिंह कोश्यारी सातत्याने महाराष्ट्रातील नागरिकांना दुखावणारी वक्तव्ये करत आहेत. मुंबईतून गुजरातींचा पैसा काढून घेतला तर काही उतरणार नाही, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांबाबत नुकतंच केलेलं वक्तव्य… यावरून महाराष्ट्रातील नागरिकांनी तसेच विविध संघटनांनी तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. वेळोवेळी राज्यपालांना पायउतार करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

छत्रपती शिवरायांची तुलना शरद पवार आणि नितीन गडकरी यांच्याशी केल्यानंतर यावेळी महाविकास आघाडी राज्यपालांविरोधात आक्रमक झाली आहे. केंद्र सरकारमधील भाजपने यावर तत्काळ भूमिका घेऊन, महाराष्ट्रातून या राज्यपालांची हकालपट्टी करावी, अशी मागणी शिवसेनेने लावून धरली आहे.

महाविकास आघाडीचे यावर एकमत असून लवकरच या मागणीसाठी आक्रमक आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर ‘महाराष्ट्र बंद’ केला जाईल, असे संकेत उद्धव ठाकरेंकडून देण्यात आले होते. मात्र या संपूर्ण घटनाक्रमाला आता कलाटणी मिळाल्याचे दिसत आहे. राज्यपालांनाच महाराष्ट्रात या पदावर राहण्याची इच्छा नसल्याचे पुढे आले आहे.

अजित पवारांजवळही म्हणाले होते?

काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही यासंबंधी माहिती दिली होती. पत्रकार परिषदेत तो किस्सा सांगताना अजित पवार म्हणाले, ‘ महाराष्ट्रात विरोधी पक्ष नेता, त्यापूर्वी उपमुख्यमंत्री असल्यामुळे वारंवार राज्यपालांना भेटण्याची वेळ येत होती. एका भेटीत राज्यपालांनीच मला आता महाराष्ट्रात राहण्याची इच्छा नाही, असं सांगतिलं होतं…’
या भावनेमुळेच राज्यपाल अशी उलटसुलट वक्तव्य करत असावेत, असं अजित पवार म्हणाले..