CM Vijay : यांची भ्रष्टाचाराची फाईल वेळेवर उघडीन; मुख्यमंत्री विजय यांची धमकी
CM Vijay : तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांनी विधानसभेत अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. योग्य वेळी मी यांची भ्रष्टाचाराची फाईल उघडीन, अशी धमकीच त्यांनी मागील सरकारला दिली आहे.

तमिळनाडू विधानसभेत मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून माजी मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन आणि डीएमके पक्षावर निशाणा साधला आहे. सभागृहात टीव्हीके आणि डीएमके आमदारांमध्ये झालेल्या गदारोळादरम्यान विजय यांनी थेट भ्रष्टाचाराची फाईल उघडण्याची धमकी दिली. “मी मागील डीएमके सरकारच्या भ्रष्टाचाराच्या फाईल्स योग्य वेळी उघडेन. माझ्या टेबलवर दोन फाईल्स आहेत. आता तसं करण्यासाठी माझ्यावर दबाव टाकू नका”, असं विजय म्हणाले. थलपती विजय यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे. विधानसभेतील भाषणादरम्यान विजय यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली.
रस्ते बांधणीतील कथित अनियमिततेवरून विधानसभेत सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री विजय यांनी सभागृहात हे वक्तव्य केलं. टीव्हीके पक्षाच्या आमदारांनी रस्ते बांधणीतील कथित अनियमिततेचा मुद्दा उपस्थित केला होता. यामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या आमदारांमध्ये जोरदार वादविवाद सुरू झाला. या वादात विजय यांनी हस्तक्षेप करत मागील सरकारने केलेल्या कथित भ्रष्टाचाराचा तपशील असलेल्या फाईल्स समोर आणेन, असा इशारा दिला. राज्यातील भ्रष्टाचाराविरोधात कठोर भूमिका घेण्याची गरज असल्याचं विजय यांनी यावेळी स्पष्ट केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे डीएमके आणि टीव्हीके यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
भ्रष्टाचार हा केवळ राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा विषय नसून सामान्य नागरिकांवर परिणाम करणारा गंभीर मुद्दा असल्याचं विजय यांनी सांगितलं. इतकंच नव्हे तर विजय यांच्या सरकारने आता भ्रष्टाचाराशी संबंधित तक्रारींवर लक्ष ठेवण्यासाठी एक मोठं पाऊल उचललं आहे. तमिळनाडू सरकार राज्याच्या भ्रष्टाचाराविरोधी संस्था DVAC अंतर्गत सोशल मीडिया मॉनिटरिंग सेंटर म्हणजेच SMMC स्थापन करणार आहे. यासाठी सरकारने 50 लाख रुपयांचा बजेट ठेवला आहे.
डीव्हीएसीकडे सध्या भ्रष्टाचाराशी संबंधित सोशल मीडिया माहिती जतन करण्यासाठी कोणतीही समर्पित प्रणाली नाही. त्यामुळे हे नवीन केंद्र या तक्रारी आणि पोस्ट्सची नोंद ठेवेल, जेणेकरून सोशल मीडियावरून मजकूर काढून टाकल्यानंतरही महत्त्वपूर्ण पुरावे जतन केले जातील, असं विजय यांच्या सरकारचं म्हणणं आहे. हे केंद्रातील पथक दिवसाचे 24 तास सोशल मीडियावर लक्ष ठेवून असेल.
