Bhaskar Jadhav : नाव शिवसेनेचं घेताय आणि कार्यक्रम भाजपचा राबवताय, सत्तेसाठी भाजपवाले माशासारखे तडफडत होते; भास्कर जाधवांचा हल्लाबोल

| Updated on: Aug 22, 2022 | 4:54 PM

Bhaskar Jadhav : शंभुराज किमान स्वत:च्या मनाने विचार करा. प्रत्येक गोष्टीत तोंड घालून स्वत:चं हसं करून घेऊ नका. काव काव काय? मला वाटलं आता पितृपक्ष येणार आहे. प्रॅक्टिस करतोय की काय गडी असं वाटलं. निर्लज्जपणाचा कळस आहे. निर्लज्जपणाचा, अशी टीका भास्कर जाधव यांनी केली.

Bhaskar Jadhav : नाव शिवसेनेचं घेताय आणि कार्यक्रम भाजपचा राबवताय, सत्तेसाठी भाजपवाले माशासारखे तडफडत होते; भास्कर जाधवांचा हल्लाबोल
नाव शिवसेनेचं घेताय आणि कार्यक्रम भाजपचा राबवताय, सत्तेसाठी भाजपवाले माशासारखे तडफडत होते; भास्कर जाधवांचा हल्लाबोल
Image Credit source: vidhansabha
Follow us on

मुंबई: थेट जनतेतून नगराध्यक्ष आणि सरपंच निवडीचं विधेयक आणणाऱ्या राज्य सरकारवर शिवसेनेचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी जोरदार हल्ला केला. खासकरून एकनाथ शिंदे गटावर त्यांनी तोंडसुख घेतलं. एकनाथराव शिंदे (cm eknath shinde), तुम्ही नाव शिवसेनेचं घेताय आणि सर्व निर्णय व कार्यक्रम भाजपचे (bjp) राबवताय. गेल्या दीड दोन महिन्यातील असा एक निर्णय दाखवा, असा एक निर्णय दाखवा जो तुम्ही तुमच्या स्वत:च्या मनाने घेतलाय. तुम्हीच घेतलेले सर्व निर्णय ते तुमच्याकडून बदलून घेत आहेत. याचा अर्थ तुमच्याकडून सर्व निर्णय बदलू घेत आहेत. सावध व्हा. कारभार करायचा तर स्वाभिमानाने करा. गरज फक्त तुम्हाला नाही. त्यांनाही आहे. सत्तेत त्यांनाही यायचं होतं. ते कितीही नाही म्हणत असले तरी ते तडफडत होते. सत्तेच्या बाहेर राहून माशासारखे तडफडत होते, असा हल्लाबोल भास्कर जाधव यांनी केला.

विधानसभेत चर्चेत भाग घेताना भास्कर जाधव यांनी हा हल्लाबोल केला. शंभुराज किमान स्वत:च्या मनाने विचार करा. प्रत्येक गोष्टीत तोंड घालून स्वत:चं हसं करून घेऊ नका. काव काव काय? मला वाटलं आता पितृपक्ष येणार आहे. प्रॅक्टिस करतोय की काय गडी असं वाटलं. निर्लज्जपणाचा कळस आहे. निर्लज्जपणाचा, अशी टीका भास्कर जाधव यांनी केली.

मीही राजकीय बोलू शकतो

डॉ. कुटे म्हणाले ठीक आहे. पण वेळ आली तर मी देखील राजकीय बोलू शकतो हे तुम्हाला चांगले माहीत आहे. नगराध्यक्षांनी काय काय उपदव्याप केले हे मी सांगणार नाही. मी कधी कुणावर व्यक्तिगत आरोप करत नाही आणि नाव घेत नाही. निरंकुश सत्ता तुम्ही ठेवू नका. हा कायदा पुन्हा एकदा तपासून बघा, असंही ते म्हणाले.

सरकारचं शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष

यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. केवळ सभागृह सुरू रहावं यासाठी परवा फक्त एकच मंत्री सभागृहात होते. शेतकऱ्यांकडे हे सरकार दुर्लक्ष करतंय. रिफायनरी प्रकल्पा विषयी कोकणी माणसाकडून विश्वास मिळवून घेणं महत्वाचं आहे, असं ते म्हणाले.

शिंदे सरकार भाजपची बाहुली

नगरपालिकेच्या, महानगरपालिका निवडणुका जवळ आल्याचं आहेत. आता प्रभाग रचना पुन्हा होणार आहे. झालेली प्रभाग रचना रद्द झालेली आहे, पण वॉर्ड रचना पडलेले आरक्षण पुन्हा बदलत आहेत. कोणा करता बदलत आहेत? कोण आहे यांच्या पाठीमागे? त्यावेळी नगरविकास मंत्री कोण होते? आता नगरविकास मंत्री कोण आहे? ज्यांनी स्वतःच्या खात्याच्या घेतलेला कारभार हा स्वतःच बदलायचा निर्णय घेतात यांचा अर्थ आता असलेले सरकार भाजपच्या हातातील बाहुली बनली आहे, अशी टीकाही त्यांनी केली.