जनता पुरात, पालकमंत्री रात्रीत मुंबईत, हे पालकमंत्री नव्हे, हे तर पळपुटे मंत्री : चित्रा वाघ

रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांनी संकटाच्या काळात जनतेला पाठ दाखवली आहे, अशी टीका भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केलीय.

जनता पुरात, पालकमंत्री रात्रीत मुंबईत, हे पालकमंत्री नव्हे, हे तर पळपुटे मंत्री : चित्रा वाघ
चित्रा वाघ आणि अनिल परब
| Edited By: | Updated on: Jul 24, 2021 | 9:50 AM

मुंबई :  जोरदार पावसाने आणि महापुराने चिपळूणचं होत्याचं नव्हतं झालं. नागरिक अन्न पाण्यावाचून तडफडत आहेत. नागरिक मोठ्या संकटात सापडले आहेत. अशावेळी पालकमंत्र्यांनी तिथे थांबून जनतेला मदत करायला हवी. पण पालकमंत्री एका रात्रीत मुंबईला पळ काढतात. हे पालकमंत्री नाही तर हे पळपुटे मंत्री आहेत, अशा शब्दात भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांच्यावर निशाणा साधला आहे.

हे पालकमंत्री नव्हे, हे तर पळपुटे मंत्री…!

आस्मानी संकटामुळं चिपळूणचे नागरिक अन्न-पाण्यावाचून तडफडतायेत एवढचं नाही तर पुरामुळे दवाखान्यातून ॲाक्सिजन पुरवठा रद्द झाल्याने एकाच दिवशी ८ कोविड रूग्ण दगावले अशा वेळेस पालकमंत्री म्हणून जनतेच्या पाठीमागे खमकेपणाने उभं राहण्याऐवजी अनिल परब रात्रीतून मुंबईला पळ काढतात… अशा संकटाच्या काळात जनतेला पाठ दाखवणारे हे पालकमंत्री कसले ? हे तर पळकुटे मंत्री..!!, अशी टीका चित्रा वाघ यांनी अनिल परब यांच्यावर केली आहे.

मंत्री परब यांनी संकटाच्या काळात जनतेला पाठ दाखवली

कोकणात पावसाने अक्षरश: हैदोस माजवलाय. अनेक ठिकाणी पूर आलाय. गावच्या-गावं पुराच्या पाण्यात अडकलीत… अशावेळी पालकमंत्र्यानी तिथे थांबून जनतेला धीर देणे अपेक्षित होते. मंत्री परब यांनी संकटाच्या काळात जनतेला पाठ दाखवली आहे, अशी टीका चित्रा वाघ यांनी केलीय.

चित्रा वाघ यांची मुख्यमंत्र्यांवर टीका

आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: गाडी चालवत मुंबईवरुन पंढरपूरला गेले होते. त्यांच्या ड्रायव्हिंगवरुन विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडलं होतं. आता हाच धागा पकडत संपूर्ण कोकण पुराच्या पाण्यात असताना आणि खऱ्या अर्थाने लोकांना शासनाच्या मदतीची गरज असताना मुख्यमंत्री गाडी चालवून कोकणच्या दिशेने जाणार का?, असा खडा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केलाय.

राज्याचे कुटुंबप्रमुख हे स्वत:ची जबाबदारी समजत स्वत: गाडी चालवत कोकणच्या दिशेने निघालेत का…… मुख्यमंत्री महोदय आता खरी गरज आहे तुमच्या ड्रायव्हिंग कौशल्याची, असं ट्विट करुन चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्र्यांना परिस्थितीची जाणीव करुन देण्याचा प्रयत्न केला आहे.

(BJP Chitra Wagh Slam Minister Anil Parab Over Chiplun Flood)

हे ही वाचा :

मुख्यमंत्रीसाहेब, आता तुमच्या कौशल्याची खरी गरज, ड्रायव्हिंग करत कोकणात जाणार आहात का? : चित्रा वाघ