भाजपला शून्यापासून शिखरावर घेऊन जाणारे नेते अडगळीत

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने जवळपास सर्वच ज्येष्ठ नेत्यांचं तिकीट कापलंय. नुकत्याच जारी झालेल्या यादीत पक्षाचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनाही तिकीट नाकारण्यात आलं. भाजपला शून्यापासून शिखरावर घेऊन जाणाऱ्या या नेत्यांमध्ये लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी हे प्रमुख आहेत. याशिवाय शांता कुमार, हुकूमदेव यादव, कलराज मिश्र, भगत सिंह कोश्यारी, बीसी खंडुरी आणि करिया […]

भाजपला शून्यापासून शिखरावर घेऊन जाणारे नेते अडगळीत
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:12 PM

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने जवळपास सर्वच ज्येष्ठ नेत्यांचं तिकीट कापलंय. नुकत्याच जारी झालेल्या यादीत पक्षाचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनाही तिकीट नाकारण्यात आलं. भाजपला शून्यापासून शिखरावर घेऊन जाणाऱ्या या नेत्यांमध्ये लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी हे प्रमुख आहेत. याशिवाय शांता कुमार, हुकूमदेव यादव, कलराज मिश्र, भगत सिंह कोश्यारी, बीसी खंडुरी आणि करिया मुंडा यांचंही तिकीट कापण्यात आलंय.

या सर्व नेत्यांशी भाजपचे संघटन महासचिव रामलाल यांनी संपर्क साधला होता. रामलाल यांच्याबाबत अडवाणींच्या निकटवर्तीयाने नुकतीच प्रतिक्रिया दिली होती, तर मुरली मनोहर जोशी यांनीही रामलाल यांचा संदर्भ देत भाजप नेतृत्त्वावर निशाणा साधला होता.

काय आहे अडवाणींची प्रतिक्रिया?

लालकृष्ण यांचं सध्याचं वय 91 वर्षे आहे, जे लोकसभेचा कार्यकाळ संपेपर्यंत 96 वर्षे होईल. त्यामुळे त्यांचं तिकीट कापल्याचं पक्षाने सांगितलंय. गांधीनगरमधून तिकीट कापल्यानंतर अडवाणींच्या वतीने त्यांच्या एका निकटवर्तीयाने प्रतिक्रिया दिली. तिकीट कापणं हा मोठा मुद्दा नाही, पण ज्या पद्धतीने हे सर्व करण्यात आलं, ती पद्धत अपमानजनक आहे, अशी प्रतिक्रिया अडवाणींच्या वतीने देण्यात आली.

“उमेदवारांची यादी निश्चित करण्यापूर्वी रामलाल यांनी ज्येष्ठ नेत्यांशी संपर्क साधून त्यांना निवृत्तीची घोषणा करण्यास सांगितलं होतं. पण अडवाणी यांनी यासाठी नकार दिला. पक्षातील कोणत्याही वरिष्ठ नेत्याने संपर्क साधला नाही याबाबत अडवाणी नाराज होते,” असंही त्यांच्या निकटवर्तीयाने सांगितलं.

मुरली मनोहर जोशींचंही जाहीर पत्र

मुरली मनोहर जोशी यांनीही मंगळवारी कानपूरमधील त्यांच्या मतदारसंघातील जनतेला जाहीर पत्र लिहिलं. सोमवारी भाजपचे संघटन महासचिव रामलाल यांनी मुरली मनोहर जोशींची भेट घेतली. पक्ष यावेळी तुम्हाला तिकीट देणार नसल्याचं रामलाल यांनी सांगितलं. शिवाय तुम्ही पक्ष कार्यालयात जाऊन निवडणूक लढवत नसल्याची घोषणा करावी, अशी मागणीही रामलाल यांनी केली.

मुरली मनोहर जोशी यांनी पक्ष नेतृत्त्वावर जाहीर नाराजी व्यक्त केली. हे पक्षाचे संस्कार नाहीत. आम्हाला निवडणूक लढवू द्यायची नसेल तर किमान पक्षाध्यक्ष अमित शाह यांनी स्वतः त्याबाबत सांगणं त्यांचं कर्तव्य आहे, असं मुरली मनोहर जोशी यांनी त्यांच्या पत्रात लिहिलंय.

कोण आहेत रामलाल?

रामलाल यांच्यावर पक्षातील सर्व ज्येष्ठ नेत्यांशी संपर्क साधण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळेच त्यांनी सर्व ज्येष्ठ नेत्यांची भेट घेतली आणि तुम्ही निवृत्ती घ्यावी अशी मागणीही केली. रामलाल हे आरएसएसचे प्रचारकही होते, नंतर ते राजकारणात आले. सध्या ते भाजपचे संघटन महासचिव आहेत.

फेब्रुवारीमध्ये रामलाल चर्चेत आले, जेव्हा त्यांच्या पुतणीने मुस्लीम मुलासोबत लग्न केलं होतं. यावरुन रामलाल यांना ट्रोलही करण्यात आलं. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतही त्यांचं नाव होतं. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत त्यांनी मोठी भूमिका निभावली होती. यूपीत नाराज नेत्यांना मनवण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us