किशोर तिवारींच्या उरफाट्या सल्ल्यांची गरज नाही : भाजप नेते अमोल ढोणे

| Updated on: May 26, 2019 | 12:57 PM

यवतमाळ : चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात येणाऱ्या वणी आणि आर्णी विधानसभा क्षेत्रात भाजप कार्यकर्त्यांच्या परिश्रमामुळेच मतांची आघाडी मिळाली असून नेहमीच भाजप विरोधी कारस्थान करणाऱ्या किशोर तिवारींनी हंसराज अहीर आणि पक्ष नेत्यांना उरफाटे सल्ले देऊ नये, असा घणाघाती प्रहार भाजप चे जिल्हा सरचिटणीस नेते अमोल ढोणे यांनी केला आहे. भारतीय जनता पक्ष चंद्रपूर आर्णीमध्ये संघटनात्मक दृष्ट्या मजबूत […]

किशोर तिवारींच्या उरफाट्या सल्ल्यांची गरज नाही : भाजप नेते अमोल ढोणे
Follow us on

यवतमाळ : चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात येणाऱ्या वणी आणि आर्णी विधानसभा क्षेत्रात भाजप कार्यकर्त्यांच्या परिश्रमामुळेच मतांची आघाडी मिळाली असून नेहमीच भाजप विरोधी कारस्थान करणाऱ्या किशोर तिवारींनी हंसराज अहीर आणि पक्ष नेत्यांना उरफाटे सल्ले देऊ नये, असा घणाघाती प्रहार भाजप चे जिल्हा सरचिटणीस नेते अमोल ढोणे यांनी केला आहे.

भारतीय जनता पक्ष चंद्रपूर आर्णीमध्ये संघटनात्मक दृष्ट्या मजबूत आहे. महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एकदिलाने लोकसभा निवडणुकीत काम केले. मात्र पांढरकवडा परिसरात नेहमीच भाजप सरकार विरोधी वातावरण निर्माण करणाऱ्या सोबतच पक्षाची व पक्षनेत्यांची प्रतिमा मलीन करण्याचे नेहमीच कारस्थान करणाऱ्या किशोर तिवारी यांनी मात्र लोकसभा निवडणुकीत हंसराज अहीर यांच्या विरोधात काम केले, असा आरोप अमोल ढोणे यांनी केला आहे.

“चंद्रपूर मतदारसंघात पराभावाची कारणमीमांसा पक्षात होईलच, याबाबत किशोर तिवारींनी चिंता करू नये, माध्यमांद्वारे  फुकटचे सल्ले देऊ नये, त्यांच्या उपदेशाच्या डोजची पक्षनेतृत्वाला गरज नाही, सक्षम संघटनेसाठी पक्ष नेतृत्व सक्षम आहे. तिवारी परिवाराला भारतीय जनता पक्षाने भरपूर काही दिले मात्र घर का भेदी लंका ढहाये या उक्तीप्रमाणे त्यांची कार्यपद्धती सगळेच जाणतात. तिवारींच्या वागण्या बोलण्यामुळे नेहमीच पक्षाचे नुकसान झाले आहे. लोकसभा निवडणुकीत देखील त्यांची भूमिका कट कारस्थान रचण्याचीच होती” अलसा घणाघात अमोल ढोणे यांनी केला.

“वणी, मारेगाव, आर्णी, झरीजामणी, पांढरकवडा, घाटंजी, येथील कार्यकर्त्यांनी पालकमंत्री मदन येरावार, महसूलराज्यमंत्री संजय राठोड, अण्णासाहेब पारवेकर, आमदार निलय नाईक, माजी मंत्री राजाभाऊ ठाकरे, संजय देशमुख, आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार, आमदार राजू तोडसाम, जेष्ठ नेते उद्धवराव येरमे,जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे तसेच शिवसेना भाजप आणि रिपाईं आठवले गटाच्या जेष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनात प्रामाणिकपणे पक्षाचे काम केले त्यामुळे फुकटच्या उपदेशाचे डोस पाजणार्‍या लोकांनी हंसराज अहीर यांची काळजी करण्याची गरज नाही” असेही अमोल ढोणे म्हणाले.

तसेच, “भाजपच्या भरवश्यावर राजकारण करणाऱ्या तिवारींना हंसराज अहीर यांच्या पराभवामुळे विकृत समाधान मिळाले असले, तरी यापुढे तिवारींचे लाड पुरवू नये, अशी भाजप कार्यकर्त्यांची मागणी असून त्याबाबत पक्षनेतृत्वाला कळवू.” असेही अमोल ढोणे यांनी स्पष्ट केले.