Nilesh Rane | राज्यपाल रोहित पवारांनी आजोबांकडे बघावं, तुमच्यामुळे मविआचीपण अडचण झालीय, रोहित पवारांच्या टीकेला निलेश राणेंचं उत्तर

राज्यसभा निवडणुकीच्या निकालांवर प्रतिक्रिया देताना काल राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपावर निशाणा साधला. काही लोकांना ईडीची भीती दाखवली, काही लोकांना वेगळी ताकद देऊन मत परिवर्तन केले, असे ते म्हणाले.

Nilesh Rane | राज्यपाल रोहित पवारांनी आजोबांकडे बघावं, तुमच्यामुळे मविआचीपण अडचण झालीय, रोहित पवारांच्या टीकेला निलेश राणेंचं उत्तर
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 12, 2022 | 1:54 PM

मुंबईः राज्यपाल रोहित पवारांनी (Rohit Pawar) भाजपवर आरोप करण्याऐवजी आपल्या आजोबांकडे लक्ष द्यावे. कारण आजोबा नेमके काय करतात, हे कुणालाच सांगत नाहीत. त्यामुळे तुमच्याबरोबर महाविकास आघाडीचीही (Mahavikas Aghadi) अडचण झाली आहे, असा खोचक टोमणा भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी लगावला आहे. राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेवर भाजपचा विजय झाल्यानंतर रोहित पवारांनी या निवडणूक प्रक्रियेवर आणि भाजपने वापरलेल्या दबाव तंत्रावर टीका केली होती. रोहित पवार हे राज्यपाल असल्याप्रमाणे प्रतिक्रिया देत आहेत, त्यामुळे निलेश राणे यांनी थेट रोहित पवारांना राष्ट्रवादीचे राज्यपाल म्हणत त्यांना टोमणे मारले आहेत. ट्विटरद्वारे निलेश राणेंनी ही टीका केली.

रोहित पवारांची टीका काय?

राज्यसभा निवडणुकीच्या निकालांवर प्रतिक्रिया देताना काल राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपावर निशाणा साधला. काही लोकांना ईडीची भीती दाखवली, काही लोकांना वेगळी ताकद देऊन मत परिवर्तन केले. संजय पवारांना पहिल्या नंबरची मतं होती. जी आकडेवारी पाहिजे होती, त्या आकडेवारीत कमतरता आली. पक्षाचे सर्व आमदार होते. ते मनापासून महाविकास आघाडीच्या पाठीमागे उभे राहिले. काही अपक्षांनी ताकद दिली. मात्र इतर अपक्ष आणि मित्रपक्षांनी सोबत रहायला पाहिजे होते. ते झाले नाही, अशी खंत रोहित पवार यांनी व्यक्त केली.

‘तुम्ही आजोबांकडे लक्ष द्या’

भाजपावर आरोप करणाऱ्या रोहित पवारांना निलेश राणेंनी ट्विटद्वारे उत्तर दिलंय. तुम्ही भाजपवर आरोप करण्याआधी तुमच्या आजोबांकडे लक्ष द्या. ते काय करतात, हे कुणालाही सांगत नाहीत, त्यामुळे मविआची अडचण झाली आहे, असं ट्वीट निलेश राणे यांनी केलंय.

शरद पवारांचे मविआसाठी सूचक विधान काय?

दरम्यान, महाविकास आघाडीची राज्यसभा निवडणुकीत नाचक्की झाल्यानंतर शरद पवार यांनीही शिवसेना प्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्देशून प्रतिक्रिया दिली. देवेंद्र फडणवीसांचं कौतुक करत त्यांनी माणसं जोडली, त्यामुळे हा विजय मिळाल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा स्पष्ट शब्दात इशारा आहे. कारण अनेक आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्यावर नाराजी दर्शवली असून त्यांनी विकास कामांसाठी निधी न दिल्याबद्दल तक्रारही केली आहे.