‘इतके भूकंप झाले तर…, महाराष्ट्राची काळजी वाटतेय’, पंकजा मुंडे यांचं मोठं वक्तव्य

"माझ्या 15 वर्षाच्या राजकारणात मी कोणावरही वैयक्तिक टीका केली नाही. भूकंप विरहित पक्ष बांधणीची गरज आहे. मुख्यमंत्री कोण व्हावं आमच्या हातात नाही. कोण मुख्यमंत्री व्हावं हे जनता 2024 ला ठरविणार आहे. त्या यंत्रणेचा मी भाग नाही", असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

इतके भूकंप झाले तर..., महाराष्ट्राची काळजी वाटतेय, पंकजा मुंडे यांचं मोठं वक्तव्य
Image Credit source: social media
| Edited By: Chetan Patil | Updated on: Apr 22, 2023 | 8:53 PM

बीड : सुप्रीम कोर्टातील महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल जाहीर झाल्यानंतर राजकीय भूकंप होईल, अशी चर्चा सुरु आहेत. तसेच आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार (Ajit Pawar) हे मुख्यमंत्री होतील, अशाही चर्चांना उधाण आलं आहे. महाराष्ट्रातील या राजकीय भूकंपाच्या चर्चांवर भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी आपली भूमिका मांडली आहे. इतके राजकीय भूकंप झाले तर मला महाराष्ट्राची काळजी वाटतेय, असं वक्तव्य भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलं आहे. तसेच कोणत्या नेत्याची गरज आहे, या प्रक्रियेतत मी नाही, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

“इतके भूकंप झाले तर माझा महाराष्ट्र कसा राहील? याचं मला टेन्शन आहे. महाराष्ट्राचं राजकारण कसं राहील? याचं मला टेन्शन आहे. मला यातले कुठलेही संकेत असण्याचं कारण नाही. कारण मी त्या व्यवस्थेचा भाग नाही. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्यातील अध्यक्ष, तसेच राज्यातील नेते याबाबत निर्णय घेतील. भारतीय जनता पक्षाला आणखी काही लोकांची कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेत्यांची गरज आहे का? याचा निर्णय घेणाऱ्या प्रक्रियेत मी नाही. त्यामुळे यावर काही भाष्य करु शकणार नाही”, अशी भूमिका पंकजा मुंडे यांनी मांडली.

“बीडमध्ये भाजप नगरसेवक जगदीश गुरखुदे यांचं काम चांगलं आहे. परळीत असं काम नाही. रस्ते, नाल्या कुठे आहेत माहीत नाही. याबाबत परळीतील जनतेत प्रचंड रोष आहे. मला बिनविरोध काढणारे ते कोण? आमची लढाई आहे”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

‘भूकंप विरहित पक्ष बांधणीची गरज’

“माझ्या 15 वर्षाच्या राजकारणात मी कोणावरही वैयक्तिक टीका केली नाही. भूकंप विरहित पक्ष बांधणीची गरज आहे. मुख्यमंत्री कोण व्हावं आमच्या हातात नाही. कोण मुख्यमंत्री व्हावं हे जनता 2024 ला ठरविणार आहे. त्या यंत्रणेचा मी भाग नाही. लोकांचा विश्वास जिंकून भाजपने निवडणुका जिंकल्या आहेत. पुढेही तसंच होईल. बीड जिल्ह्यातील अनेक कृषी उत्पन्न बाजार समिती भाजपच्या ताब्यात येतील, असा विश्वास पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला.

“परळी कृषी उत्पन्न बाजार समितीत माझी लढाई आहे. दोघेही मल्ल मोठ्या शक्तीचे आहेत. मात्र प्रवृत्ती वेगळी आहे”, अशा शब्दांत पंकजा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात सातत्याने वाद रंगलेला बघायला मिळतो. यावेळी देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरुन दोन्ही बहीण-भावात वाद रंगताना दिसतोय.

Follow Us