कल्याण-डोंबिवली महापालिकेत भाजप-मनसे एकत्र येतील, भाजप आमदाराचं भाकित

| Updated on: Jan 27, 2020 | 10:32 AM

आगामी कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत भाजप-मनसेची युती होऊ शकते, असा विश्वास भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी व्यक्त केला

कल्याण-डोंबिवली महापालिकेत भाजप-मनसे एकत्र येतील, भाजप आमदाराचं भाकित
Follow us on

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत भाजप-मनसे एकत्र येऊ शकतात, असं भाकित भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी वर्तवलं (BJP MLA on MNS BJP Alliance) आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर भाजपमधून मनसेशी युतीचा सूर आळवला जात आहे.

एकमेकांना शिव्या देणारे एकत्र येऊ शकतात, तर आम्ही हिंदुत्ववादी आणि देशाच्या हिताचा विचार घेऊन चालणारेही एकत्र येऊ शकतो, असं म्हणत आमदार गणपत गायकवाड यांनी महाविकास आघाडीला टोला लगावला. आगामी कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत भाजप-मनसेची युती होऊ शकते, असा विश्वासही गणपत गायकवाड यांनी ‘टीव्ही9 मराठी’कडे व्यक्त केला. गणपत गायकवाड हे कल्याण पूर्व मतदारसंघातून भाजपचे आमदार आहेत.

कल्याणमधील पिसवली गावची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे गावात सध्या रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. पावसाळ्यात गुडघाभर पाण्यातून ग्रामस्थांना प्रवास करावा लागत होता. त्यामुळे स्थानिक नगरसेवक आणि माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर यांनी डीपी प्लॅन मांडण्यात आला. रस्त्याच्या कामाचे उद्घाटन आमदार गणपत गायकवाड यांनी केले.

एकीकडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाअधिवेशनातील समारोपाच्या भाषणात राज ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या ‘नागरिकत्व सुधारणा कायद्या’ला जाहीर पाठिंबा दिला होता. मनसे 9 फेब्रुवारीला आझाद मैदानात ‘सीएए’च्या समर्थनार्थ भव्य मोर्चाही काढणार आहे. त्यामुळे शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र आलेले असताना भाजप-मनसे युतीचीही नांदी होताना दिसत आहे.

भाजप मनसे समविचारी : गिरीश महाजन

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आधीच आपली भूमिका स्पष्ट केली आहे. विषम विचारी पक्ष एकत्र येत असतील, मग आम्ही तर समविचारी आहोत, असं म्हणत भाजपचे संकटमोचक नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांनीही मनसे-भाजप युतीचे संकेत दिले होते. भविष्यात काहीही अशक्य नसल्याची प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी मनसेच्या भगव्या झेंड्याच्या अनावरणानंतर ‘टीव्ही9 मराठी’कडे (BJP MLA on MNS BJP Alliance) दिली होती.