जर ‘संघर्ष’ नको मग संवादातून मार्ग का काढत नाही? प्रवीण दरेकरांचा थेट मुख्यमंत्र्यांना सवाल

| Updated on: Jun 27, 2021 | 6:47 AM

शिवसेना महाविकास आघाडी सरकारमध्ये असल्याकारणामुळे आज केवळ सत्ता टिकवणे हेच अंतिम ध्येय असल्याचे स्पष्ट होत आहे," अशी खोचक टीकाही प्रवीण दरेकरांनी केली. (BJP Pravin Darekar Comment On CM Uddhav Thackeray)

जर ‘संघर्ष’ नको मग संवादातून मार्ग का काढत नाही? प्रवीण दरेकरांचा थेट मुख्यमंत्र्यांना सवाल
प्रवीण दरेकर आणि उद्धव ठाकरे
Follow us on

मुंबई : “संघर्ष कधी करायचा अन् संवाद कधी साधायचं, हे ज्याला कळतं तोच खरा नेता असतो. गर्दी करून ताकद दाखवता येते. मात्र, त्यामुळे कोरोनाची साथ पसरण्याचा धोका आहे,” असा अप्रत्यक्ष निशाणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी साधला होता. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावर भाजपचे विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी पलटवार केला आहे. “जर ‘संघर्ष’ नको मग संवादातून मार्ग का काढत नाही?” असा सवाल प्रवीण दरेकर यांनी केला आहे. (BJP Pravin Darekar Comment On CM Uddhav Thackeray Statement OBC political reservation All Over maharashtra Agitation)

OBC आरक्षणासाठी भाजपचा राज्यभरात एल्गार

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या (OBC Reservation) मागणीसाठी भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. काल राज्यभरात भाजप नेते कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. पुणे,मुंबई, सातारा, कोल्हापूर, नागपूर, नाशिक अशा महत्त्वांच्या शहरांत तसंच तालुक्यांच्या ठिकाणी ओबीसी आरक्षण परत मिळावं, यासाठी भाजपने एल्गार केला. देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत राज्यातल्या विविध ठिकाणी हे आंदोलन पार पडलं. यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्या नेत्यांना ताब्यात घेतलं तसंच कार्यकर्त्यांचीही धरपकड केली.

प्रवीण दरेकर काय म्हणाले? 

“भाजपने काल संपूर्ण राज्यात ओबीसी राजकीय आरक्षणासाठी प्रचंड संघर्ष उभा केला, आंदोलन केलं. मात्र या आंदोलनाला आदळआपट म्हणणं म्हणजे आंदोलकांची किंबहुना ज्या समाजाच्या न्यायहक्कांसाठी भाजपकडून संघर्ष करण्यात आला. त्यांचा अपमान करण्यासारखी किंवा चेष्टा करण्यासारखी गोष्ट आहे. OBC व मराठा आरक्षणासाठी आंदोलन म्हणजे “आदळआपट” असं हीणवनं म्हणजे दोन्ही समाजांची चेष्टा करण्यासारखे आहे !” असे प्रवीण दरेकर म्हणाले.

“संघर्ष कधी करावा, संवादाने प्रश्न सुटतील असे मुख्यमंत्री सांगत असताना, आपण संवाद करत आरक्षणाचा विषय का मार्गी लावला नाही? असा सवालही दरेकरांनी मुख्यमंत्र्यांना विचारला. मुख्यमंत्री शिवसेनेचे प्रमुख आहे. संघर्षातून न्याय मिळविणे हा शिवसेना पक्षाचा इतिहास आहे. मात्र आज संघर्ष नको असे शिवसेना सांगत आहे. शिवसेना महाविकास आघाडी सरकारमध्ये असल्याकारणामुळे आज केवळ सत्ता टिकवणे हेच अंतिम ध्येय असल्याचे स्पष्ट होत आहे,” अशी खोचक टीकाही प्रवीण दरेकरांनी केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय म्हणाले? 

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपने छेडलेल्या राज्यव्यापी आंदोलनावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. कोल्हापुरातील सारथी उपकेंद्राच्या ऑनलाईन उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर संयम बाळगल्याबद्दल संभाजीराजे छत्रपती यांचे आभार मानले. न्याय व हक्कांसाठी रस्त्यावर उतरणं हा भाग आहे. पण संघर्ष कधी करायचा आणि संवाद कधी करायचा हे ज्याला कळतं तोच नेता होऊ शकतो. संभाजीराजे तुम्ही संघर्ष थांबवून संवाद सुरु केलात. अनेकजण आदळआपट करत आहेत. पण त्याविषयी मी तुर्तास फार बोलणार नाही, असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे विरोधकांचे कान टोचले.

आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा समाज वाटलं असतं तर काहीही करु शकला असता. आरक्षण मिळवण्यासाठी आपल्याला काही कायदेशीर अडथळे पार करायेच आहेत. आपण कायद्याची लढाई सोडून दिलेली नाही. आपला समजुतदारपणा समाजाला दिशा दाखवणार आहे.मराठा समाजासाठी जे जे काही करता येईल ते सर्व सरकारकडून केले जाईल. सरकार कोणत्याहीप्रकारे मागे राहणार नाही, असे वचन मी तुम्हाला देतो, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

(BJP Pravin Darekar Comment On CM Uddhav Thackeray Statement OBC political reservation All Over maharashtra Agitation)

संबंधित बातम्या : 

फडणवीस, चंद्रकांतदादा, दरेकर, शेलार पोलिसांच्या ताब्यात, OBC आरक्षणासाठी भाजपचा राज्यभरात एल्गार

माझ्या हातात सूत्रं दिल्यास ओबीसींना पुन्हा आरक्षण मिळवून देईन नाहीतर राजकारणातून संन्यास घेईन : फडणवीस

संघर्ष कधी करायचा अन् संवाद कधी साधायचा, हे ज्याला कळतं तोच खरा नेता: उद्धव ठाकरे