Chandrashekhar Bawankule | भाजपचे प्रदेशाध्यक्ष पद चंद्रशेखर बावनकुळेंकडे, आशिष शेलारांकडे कोणती जबाबदारी?

| Updated on: Aug 09, 2022 | 2:44 PM

भाजप नेते आशिष शेलार यांच्याकडे मुंबईतील भाजप अध्यक्षांची जबाबदारी सोपवण्यात येऊ शकते. आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलार यांच्याकडे भाजप पक्षश्रेष्ठींकडून हे पद देण्यात येऊ शकते.

Chandrashekhar Bawankule | भाजपचे प्रदेशाध्यक्ष पद चंद्रशेखर बावनकुळेंकडे, आशिष शेलारांकडे कोणती जबाबदारी?
Image Credit source: social media
Follow us on

मुंबईः चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांची महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात वर्णी लागल्यामुळे रिक्त झालेल्या भाजप प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी कुणावर सोपवली जातेय, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. ही जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्यावर सोपवली जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. चंद्रकांत पाटील यांचं नाव मंत्रिपदाच्या यादीत आल्यानंतरच भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठीच्या नावांची चर्चा सुरु होती. कालपर्यंत या पदासाठी आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्या नावाची चर्चा होती. मात्र आता चंद्रशेखर बावनकुळेंचं नाव समोर येतंय. तर आशिष शेलार हे भाजपचे मुंबई अध्यक्ष होऊ शकतात. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विशेषतः मुंबई महापालिकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमधील या दोन पदाधिकाऱ्यांकडे मोठी जबाबदारी सोपवली जाऊ शकते.

चंद्रकांत पाटील यांची मंत्रिमंडळात वर्णी

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्षपदावर असताना चंद्रकांत पाटील यांनी पक्षाचा एक आक्रमक चेहरा म्हणून काम पाहिले. महाविकास आघाडीविरोधात पक्षाची भूमिका अत्यंत स्पष्ट शब्दात मांडण्यात ते अग्रेसर होते. तसेच ओबीसी आरक्षणासारख्या प्रश्नावरून महाविकास आघाडी सरकार विरोधातील आंदोलनातही त्यांनी उत्तम नेतृत्व केले. त्यामुळे आता नव्या सरकारमध्ये त्यांना मंत्रिपद देण्यात आले असून महत्त्वाचं खातं मिळण्याची शक्यता आहे.

शेलारांकडे मुंबईची धुरा?

भाजप नेते आशिष शेलार यांच्याकडे मुंबईतील भाजप अध्यक्षांची जबाबदारी सोपवण्यात येऊ शकते. आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलार यांच्याकडे भाजप पक्षश्रेष्ठींकडून हे पद देण्यात येऊ शकते. एकनाथ शिंदे गटाच्या बंडखोरीमुळे शिवसेनेची मुंबईतील ताकद कमी झाली आहे. मात्र उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा पेटून उठण्यासाठी मोर्चेबांधणी केली आहे. प्रत्येक ठिकाणच्या शिवसेनेत उभी फूट पडली आहे. याचा फायदा भाजपा होऊ शकतो, असे म्हटले जातेय. आगामी महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई महापालिका जिंकण्याची संधी असल्याने भाजपसाठी हे मोठं मिशन ठरणार आहे. त्यामुळेच शेलारांसारख्या अनुभवी नेत्याकडे ही जबाबदारी सोपवली जाऊ शकते.

आता प्रतीक्षा खातेवाटपाची

मागील 39 दिवसांपासून अवघ्या महाराष्ट्राला शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होईल, याची प्रतीक्षा होती. आज अखेर पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार झाला असून लवकरच या मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर होईल. महाविकास आघाडीतील अनेक आमदार तसेच मंत्र्यांनी उद्धव ठाकरे सरकारविरोधात थेट नाराजी बोलून दाखवली होती. मंत्रिपद न मिळाल्यानेही अनेकजण नाराज होते. आता शिंदे सरकारतर्फे कुणाला-कोणतं खातं मिळेल, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. दरम्यान आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत नव्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.