बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करणं सुपुत्रांना जमलं नाही, म्हणून त्यांना वंदनीय मानणाऱ्यांनी ते पूर्ण करु नये का?, उद्धव ठाकरेंच्या फडणवीसांवरील टीकेला शेलांराचं प्रत्युत्तर

| Updated on: Aug 20, 2022 | 9:37 PM

उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला भाजप आमदार आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलंय. 'हिंदुत्वाचा ज्वलंत विचार जगणाऱ्या वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न त्यांच्या मा. सुपुत्रांना पुर्ण करण्यास नाही जमले. म्हणून त्यांना वंदनीय मानणाऱ्यांनी ते पुर्ण करु नये का?' असा खोचक सवाल शेलार यांनी विचारलाय.

बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करणं सुपुत्रांना जमलं नाही, म्हणून त्यांना वंदनीय मानणाऱ्यांनी ते पूर्ण करु नये का?, उद्धव ठाकरेंच्या फडणवीसांवरील टीकेला शेलांराचं प्रत्युत्तर
आशिष शेलार, उद्धव ठाकरे
Image Credit source: Google
Follow us on

मुंबई : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबई महापालिकेची सत्ता मिळवायची आहे, असं वक्तव्य भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलंय. त्या वक्तव्यावरुन बाळासाहेब ठाकरेंचे सुपुत्र आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांवर जोरदार टीका केलीय. बाळासाहेबांच्या नावाने आता मताचा जोगवा मागितला जात आहे म्हणजे, मोदीपर्व संपले असल्याची कबुलीच म्हणावे लागेल, अशा शब्दात ठाकरे यांनी फडणवीसांवर निशाणा साधलाय. आता उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला भाजप आमदार आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी प्रत्युत्तर दिलंय. ‘हिंदुत्वाचा ज्वलंत विचार जगणाऱ्या वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न त्यांच्या मा. सुपुत्रांना पुर्ण करण्यास नाही जमले. म्हणून त्यांना वंदनीय मानणाऱ्यांनी ते पुर्ण करु नये का?’ असा खोचक सवाल शेलार यांनी विचारलाय.

उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा

हिंदुत्वाचा ज्वलंत विचार जगणाऱ्या वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न त्यांच्या मा. सुपुत्रांना पुर्ण करण्यास नाही जमले. म्हणून त्यांना वंदनीय मानणाऱ्यांनी ते पुर्ण करु नये का? ते इतरांनी पुर्ण केले म्हणून त्यांच्या मुलांनी एवढे चिडावे का? आपल्या वडिलांच्या विचारांनी झपाटून समाजातील लोक, आयुष्य खर्च करुन आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करतात. याचा, त्यांच्या सुपुत्रांना आनंदच व्हायला हवा ना? पेला अर्धा भरला आहे, असेही म्हणता येते पेला अर्धा रिकामा असेही म्हणता येते! फक्त भरला आहे म्हणायला मोठे मन लागते! असा जोरदार टोला शेलार यांनी ठाकरेंना लगावलाय.

हे म्हणजे अती झाले आणि हसू आले…!

उरला प्रश्न मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पर्व संपत आले म्हणून वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव भाजप वापरते असे जे मा. सुपुत्रांना वाटतेय. हे म्हणजे अती झाले आणि हसू आले…! पण काय करणार? आपण घरात बंद खोलीत बसून राहिलो की, बाहेरचे विशाल जग संपल्यासारखे वाटायला लागतेच!, असं प्रत्युत्तर शेलार यांनी ठाकरेंना दिलंय.

ठाकरेंची फडणवीसांवर टीका काय?

नाही म्हणलं तरी आता महापालिकेच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. यातच आता टायमिंग साधत पक्षाची धोरणे आणि मत परिवर्तनच्या अनुशंगाने जो तो प्रयत्न करीत आहे. मात्र, बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायचे म्हणून मताचा जोगवा म्हणजे मत मागण्यासाठी भाजपाचा तो केविलवाणा प्रयत्न आहे. दुसरीकडे मोदींच्या नावाने मते मागून उपयोग होणार नाही हेच एकप्रकारे फडणवीस यांनी अधोरेखित केले आहे. भाजपच्या धोरणानुसार वापर संपला की नवीन नाव शोधायचे आणि त्यांच्या नावाने मते मागायची आणि आपली सत्तेची तळी भरायची असाच हा प्रकार, या निमित्ताने भाजपचा खरा चेहरा समोर आल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांवर केलीय.

काय म्हणाले होते फडणवीस?

जे स्वप्न मुंबईकरीता हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरें यांनी बघितलं होतं ते स्वप्न पूर्ण करायचे ही आपली जबाबदारी आहे. कारण त्यांचं नाव सांगून जे निवडून आले त्यांनी त्यांचं स्वप्न धुळीस मिळवले. ते स्वप्न पूर्ण करू शकले नाहीत, ते इतके आत्ममग्न, इतके आत्मकेंद्रीत होते की, स्वतःच्या पलीकडे पाहू शकले नाहीत. मुंबईकराकडे त्यांनी कधीही बघितले नाही. आता मुंबईकरांसाठी काम करणाऱ्यांना आपण निवडून आणायचे आहे. जे स्वप्न वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी पाहिले आहे, ते पुर्ण करण्याचे काम आता आपल्याला करायचे आहे, त्यासाठी कामाला लागा, असं आवाहन फडणवीस यांनी केलं होतं.