Maharashtra Cabinet : रविवारपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार नक्की, दीपक केसरकरांचा दावा; सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीवर मात्र मौन

| Updated on: Aug 03, 2022 | 4:30 PM

येत्या रविवारपर्यंत राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होईल, असा दावाच दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी केलाय. इतकंच नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबतची अधिकृत घोषणा करतील, अशी माहितीही केसरकर यांनी दिलीय.

Maharashtra Cabinet : रविवारपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार नक्की, दीपक केसरकरांचा दावा; सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीवर मात्र मौन
दीपक केसरकर, एकनाथ शिंदे
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाळीनंतर राज्यात सत्तांतर झालं. राज्यातील सत्तापालटाला आता महिना उलटून गेलाय. मात्र अद्यापही मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. त्यामुळे विरोधकांकडून राज्य सरकारवर जोरदार टीका करण्यात येतेय. अशावेळी शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत (Cabinet Expansion) महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. येत्या रविवारपर्यंत राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होईल, असा दावाच दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी केलाय. इतकंच नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबतची अधिकृत घोषणा करतील, अशी माहितीही केसरकर यांनी दिलीय.

उदय सामंत यांच्यावरील हल्ला निषेधार्ह आहे. अशा प्रकारचा हल्ला करणं महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत चुकीचं आहे. सामंत यांच्यावरील हल्ला आणि इतर बाबींवर उद्या पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करणार असल्याचंही केसरकर यांनी सांगितलं. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर कोणतंही भाष्य करणार नसल्याचंही केसरकर यांनी सांगितलं.

शिंदे सरकारचा फैसला उद्या होणार?

एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे या सुप्रीम कोर्टात सुरु असलेल्या प्रकरणावर उद्या म्हणजेच 04 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. आज दोन्ही पक्षातील वकिलांनी विविध मुद्द्यांवर जोरदार युक्तिवाद केला. त्यानंतर उद्या सुप्रीम कोर्टात या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. गुरुवारी सुप्रीम कोर्टाच्या पटलावर पहिलीच केस घेतली जाईल. कोर्टाचं कामकाज सकाळी 10.30 वाजता सुरु होतं. त्यामुळे उद्या सकाळपासून पुन्हा एकदा दोन्ही गटाचे वकील आपापल्या मुद्द्यांवर युक्तिवाद करतील. आज उद्धव ठाकरे यांच्या गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी शिंदे गटातील आमदारांवर पक्षांतर बंदी कायद्यानुसार, अपात्रतेची कारवाई झाली पाहिजे, यासाठी जोरदार युक्तिवाद केला. तर शिंदे गटाचे वकील हरिश साळवे यांनीदेखील आम्ही अजून पक्ष सोडला नसल्याने पक्षांतर बंदी कायदा आम्हाला लागूच होऊ शकत नाही, असा युक्तिवाद केला. त्यानंतर कोर्टानेही दोन्ही पक्षांच्या वकिलांसमोर काही प्रश्न उपस्थित केले.

सहनशिलतेचा अंत पाहू नका, सामंतांचा इशारा

कात्रजमध्ये आपल्या गाडीवर हल्ला झाल्यानंतर उदय सामंत यांनी मंगळवारी रात्रीच पोलिस तक्रार दिली. पोलिसांत तक्रार दिल्यानंतर सामंत म्हणाले की, पहिली गोष्ट म्हणजे काहीजण सांगत आहेत की त्यांनी माझा ताफा अडवला. ते धादांत खोटं आहे. माझी गाडी सिग्नलला थांबली होती. मी कुठेही घाई न करता मी तिथे थांबलो होतो. माझ्या बाजूला दोन गाड्या येऊन थांबल्या. त्या गाड्यातून दोन पांढरे शर्ट घातलेले युवक उतरले. एकाच्या हाता. बेस बॉलची स्टिक होती, एकाच्या हातात दगड बांधलेला होता. मला ते समोर येऊन शिव्या घालत होते आणि दुसऱ्या बाजूला एक 50 – 60 जणांचा मॉब होता. डाव्या बाजूला एसपीओ माझं रक्षण करण्याचा प्रयत्न करतो होते. त्याबाजूला दुसरे दोन पांढरे शर्ट घातलेले युवक होत, त्यांच्या हातात सळईसारखं काही होतं, अशी माहिती सामंत यांनी दिली आहे.

असा भ्याड हल्ला करुन कुणाला वाटत असेल की मी शिंदे साहेबांची साथ सोडेन, आमचे 45 लोक शिंदे साहेबांची साथ सोडतील, तर आज या हल्ल्यानं आम्ही होतो त्यापेक्षा जवळ आलो आहोत. असे भ्याड हल्ले करुन उदय सामंत थांबणारा नाही. कुठल्याही प्रसंगाला समोरा जाणारा आहे. कुणावर टीका करत नाही, त्याचा अर्थ मी हतबल नाही. आमच्या सहनशिलतेचा अंत कुणी पाहू नये, असा इशाराच सामंत यांनी हल्लेखोरांना दिलाय.