भाजपने पाच वर्षात विदर्भाला कंगाल केले : नितीन राऊत

| Updated on: Dec 02, 2019 | 6:45 PM

राज्यात नुकतेच शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाने एकत्र येत महाविकासआघाडीचं सरकार बनवले. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

भाजपने पाच वर्षात विदर्भाला कंगाल केले : नितीन राऊत
Follow us on

नागपूर : राज्यात नुकतेच शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाने एकत्र येत महाविकासआघाडीचं सरकार बनवले. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यासोबतच महाविकासआघाडीच्या सहा नेत्यांनाही मंत्रिपदाची शपथ दिली आहे. यामध्ये काँग्रेसचे विदर्भातील ज्येष्ठ नेते नितीन राऊत यांनाही कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे. मंत्रिपद मिळाल्यानंतर नितीन राऊत (Nitin raut criticized on Bjp) यांचे नागपुरात जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला.

“भाजपने पाच वर्षात विदर्भाला कंगाल केले. आश्वासन देऊनंही विदर्भ वेगळा केला नाही”, असा आरोप कॅबिनेट मंत्री नितीन राऊत (Nitin raut criticized on Bjp) यांनी भाजपवर केला.

“राज्यावर 6.71 लक्ष कोटी रुपयांचे कर्ज आहे. फडणवीस सरकारने राज्याला कर्जाच्या खाईत ढकलले. खासदार अनंतकुमार हेगडेंचं वक्तव्यही बोलकं आहे. 40 हजार कोटी केंद्राला परत गेले असतील तर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर द्यावं”, असंही राऊत म्हणाले.

दरम्यान, कॅबिनेट मंत्री नितीन राऊत यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ते नागपुरात परतले. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष करत त्यांचे स्वागत केले. यावेळी मोठ्या प्रमाणात काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

कोण आहेत नितीन राऊत?

नितीन राऊत (Nitin Raut Profile) हे काँग्रेसचे महाराष्ट्रातील धडाडीचे नेते आहेत. महाराष्ट्र काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष आहेत. राऊत 2014 पर्यंत महाराष्ट्र सरकारमध्ये रोजगार हमी आणि जलसंधारण विभागाचे कॅबिनेट मंत्री होते.

1999, 2004 आणि 2009 मधील विधानसभा निवडणुकीत ते नागपूर उत्तर मतदारसंघातून आमदारपदी निवडून गेले होते. त्यांनी पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यव्यवसाय, गृह, जेल, राज्य कामगार आणि उत्पादन शुल्क विभागाचं कॅबिनेट मंत्रिपद भूषवलं आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर नितीन राऊत यांनी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कुटुंब नियोजनावरील विचार आणि आधुनिक भारताशी त्याचा संबंध’ यासारख्या विषयांवर पुस्तकंही लिहिली आहेत.

नितीन राऊत यांनी ‘संकल्प’ या स्वयंसेवी संस्थेमार्फत सामाजिक कार्य केले असून मागास वर्गातील जनतेला मदत करण्यासाठी ते काम करतात.