मी काँग्रेस नेत्यांना बोललो, संभाजी राजांच्या नावाला विरोध करा, आता तुमच्या घरावर दगडफेक होईल : चंद्रकांत खैरे

| Updated on: Jan 02, 2021 | 6:02 PM

"मी काँग्रेसच्या दोन-चार नेत्यांना विचारलं. तुम्ही असं कसं बोलले? संभाजी महाराजांच्या नावाला विरोध करा, आता तुमच्या घरावर दगडफेक होईल. कशाला विरोध करता? तर ते असंच विरोध करतो म्हणाले", अशी प्रतिक्रिया चंद्रकांत खैरेंनी दिली.(Chandrakant Khaire on Congress)

मी काँग्रेस नेत्यांना बोललो, संभाजी राजांच्या नावाला विरोध करा, आता तुमच्या घरावर दगडफेक होईल : चंद्रकांत खैरे
बाळासाहेब थोरात हे माझे मित्र आहेत. त्यांना मी एवढेच सांगू इच्छितो की, औरंगजेब दुष्ट राजा होता. मुस्लीम समाजालाही त्याच्याविषयी प्रेम नाही.
Follow us on

औरंगाबाद : काँग्रेस, मनसे आणि भाजपने औरंगाबाद शहराच्या नामांतराच्या मुद्द्यावरुन शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, शिवसेनेला कुणीही कोंडीत पकडू शकत नाही, असा दावा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. ते ‘टीव्ही 9 मराठी’सोबत बोलत होते. यावेळी त्यांनी काँग्रेसचा संभाजीनगर नावाला विरोध नसून मनसे आणि भाजप नामांतरावरुन राजकारण करत असल्याची भूमिका मांडली (Chandrakant Khaire on Congress).

“काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात नामांतरावर सहज बोलले असतील. मी काँग्रेसच्या दोन-चार नेत्यांना विचारलं. तुम्ही असं कसं बोलले? संभाजी महाराजांच्या नावाला विरोध करा, आता तुमच्या घरावर दगडफेक होईल. कशाला विरोध करता? तर ते असंच विरोध करतो म्हणाले. आता असंच बोलले म्हणजे त्यांना मुस्लीम मतांची आशा आहे. पण मला अनेक मुस्लीम लोकांनी नाव संभाजीनगर करा, असं सांगितलं”, असं चंद्रकांत खैरे म्हणाले (Chandrakant Khaire on Congress).

“औरंगाबादचे नामांतर हा श्रद्धेचा विषय आहे. 8 मे 1988 ला आम्ही सगळे नगरसेवक झालो होतो. त्यावेळी शिवसेनेचे 27 नगरसेवक निवडून आले होते. त्यावेळेस विजय मिळाव्यात शिवसेनाप्रमुखांनी जनतेचे आभार मानले होते. कॉमन मिनिमम प्रोग्रॅम हा विकासाचा असतो. नामांतराचा विषय हा श्रद्धेचा असतो. हा मुद्दा खरंतर क्लिअर केला पाहिजे. संभाजी महाराजांचे शेवटचे चार महिने इथे गेले. त्यामुळे या शहराचं नामकरण संभाजीनगर झालं पाहिजे”, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत खैरे यांनी दिली.

“आता संभाजीनगर नावाने विरोध करु नये. ज्याने विरोध केला त्याला खरी शिवसेना दाखवून देऊ”, असा इशारा खैरेंनी दिला. त्याचबरोबर राष्ट्रवादीची भूमिका सकारात्मक आहे. बाळासाहेब थोरातही सकारात्मक आहेत, असं मत त्यांनी मांडलं.

‘काँग्रेस सरकारमधील पाठिंबा काढूच शकत नाही’

“काँग्रेसच्या सध्या 11 जागा आहेत. यापैकी चार जागा हिंदू रहिवासी असलेल्या भागातील आहेत. तर इतर जागा मुस्लीम रहिवासी असलेल्या भागातील आहेत. औरंगाबाद महापालिकेची निवडणूक महापालिकेने एकत्र लढावी का याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि बाळासाहेब थोरात एकत्र घेतील. मात्र, जागावाटप हे आताचे सिटिंग नगरसेवक किती आहेत त्यानुसार होईल. भाजपसोबत युती असतानाही आम्ही अशीच जागावाटप केली होती”, अशी भूमिका त्यांनी मांडली.

“काँग्रेस सरकारचा पाठिंबा काढूच शकत नाही. त्यांच्या मंत्र्यांनाही मंत्रिपद हवं की नको? सरकार व्यवस्थित चालू आहे. त्यामुळे कुणीही पाठिंबा काढू शकत नाही”, असा दावा त्यांनी केला.

“एमआयएम किस झाड की पत्ती? ते नुसते लुडबुड करत आहेत. आता मुस्लीम समुदायाचा राष्ट्रवादी आणि काँग्रेसला जास्त पाठिंबा आहे”, असं खैरे म्हणाले.

‘भाजपने सत्तेत असताना काहीच केलं नाही’

“भाजप आता नामांतराची मागणी करत आहे. मग त्यांचं सरकार होतं तेव्हा नामांतर का केलं नाही? करायला हवं होतं ना. मी स्वत: भाजपचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडे गेलो होतो. ते म्हणाले की, दोन्ही सरकार आपले पाहिजेत. राज्यात सरकार आल्यावर पंतप्रधान मोदींनाही मी बोललो. औरंगाबाद शहराचं नाव कोणत्याही परिस्थितीत संभाजीनगर झालं पाहिजे. मात्र मोदी काहीच बोलले नाहीत. भाजपने शहराच्या विकासासाठी कोणतंच काम केलं नाही. भाजपची सत्ता असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह 42 मंत्र्यांना नामांतराची फाईल दिली”, असं खैरेंनी सांगितलं.

“ठाकरे सरकार स्थापन होऊन वर्ष जरी झालं असलं तरी आठ ते दहा महिने कोरोना संकटात गेले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व कायदेशीर बाबी तपासल्या आहेत. त्यांनी मार्च महिन्यात सर्व कागदपत्रे मागितले होते. त्यानंतर कोरोना संकट आलं”, असं त्यांनी सांगितलं.

“शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबाद शहराचे संभाजीनगर व्हावं, अशी घोषणा केली होती. मी त्यादिवसापासून लोकसभा आणि विधानसभेपासून सर्वत्र औरंगाबाद शरहराचा उल्लेख संभाजीनगर असाच करतो. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात त्यांचे पत्र देखील संभाजीनगर या नावाने आले आहेत. आपल्या देशात दोन औरंगाबाद आहेत. नामांतराला काँग्रेस आणि बाळासाहेब थोरात विरोध करुच शकत नाही. संभाजी महाराजांना कोण विरोध करणार? हे मनसे आणि भाजपचं राजकारण आहे. भाजपचं जेव्हा सरकार होतं तेव्हा का नाही केलं?”, असे सवाल त्यांनी केले.

हेही वाचा : ही तर भाजपची लस, त्यावर विश्वास कसा ठेवायचा? : अखिलेश यादव