फडणवीस आणि माझ्याबद्दल काहीही बोललेलं चालतं का? : चंद्रकांत पाटील

| Updated on: Jun 25, 2020 | 4:26 PM

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला आहे (Chandrakant Patil on remark of Gopichand Padalkar).

फडणवीस आणि माझ्याबद्दल काहीही बोललेलं चालतं का? : चंद्रकांत पाटील
Follow us on

कोल्हापूर : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यभरात ठिकठिकाणी निषेध आंदोलनं देखील होत आहेत. आता यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील प्रतिक्रिया देत पवारांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला आहे (Chandrakant Patil on remark of Gopichand Padalkar). विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि माझ्याबद्दल काहीही बोललेलं राष्ट्रवादी काँग्रेसला चालतं का? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला.

चंद्रकांत पाटील म्हणाले, “गोपीचंद पडळकर समजूतदार कार्यकर्ता आहेत. पडळकरांचे शब्द चुकले, पण शरद पवार यांच्याबद्दल त्यांच्या मनात आदर आहे. शरद पवार यांनी छोट्या जातीला महत्त्व दिलं नाही हा पडळकर यांचा अनुभव असेल. अनादर व्यक्त करण्याचा त्याचा हेतू नव्हता. फडणवीस यांनी पडळकर यांना शब्द जपून वापरण्याची समज दिली आहे. पण महाराष्ट्रात चाललय काय? माझ्याबद्दल कोणीही काही बोलतं, फडणवीस आणि मला कुठलीही टोपण नावं ठेवता? ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. देवेंद्र फडणीस यांनी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राचा विकास केला. तुम्ही अग्रलेखात काय लिहिता? ‘जेव्हा तुम्ही गोधड्या भिजवत होता?’ ही अग्रलेखाची भाषा असते का?”

यातून चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. तसेच शरद पवार यांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केला आहे. राजकारणात शब्द जपून वापरावे लागतात. कारण त्याची जखम खूप दिवस राहते. गोपीचंद शब्द चुकला, पण इतरांनी काहीही बोललेलं चालतं का? असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी केला. तसेच सगळ्यांनीच राजकीय संस्कृती जपायला हवी, असं नमूद केलं.

दरम्यान, बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्यावतीने शहर पोलीस स्टेशनला भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत तक्रार अर्ज दिला होता. तसेच जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत पोलीस स्टेशनवर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला. यानंतर पोलिसांनी संबंधित तक्रारीवरुन आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल केला. त्यांच्यावर 505(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

संबंधित तक्रारीत म्हटलं आहे, “राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना 2017 मध्ये भारत सरकारचा क्रमांक 2 चा नागरी पुरस्कार पद्मविभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. तसेच ते भारताचे माजी कृषीमंत्री आणि माजी संरक्षण मंत्री आहेत. असं असतानाही भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्याविरोधात द्वेष निर्माण होईल अशा हेतूने विधान केलं. यात त्यांनी शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे, असं विधान केलं. कोरोना हा जगभरात संसर्ग होत असलेला साथीचा महारोग आहे. असं असताना पडळकरांनी शरद पवार यांची तुलना कोरोनाशी केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या आणि संपूर्ण बारामतीकरांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यांचे हे वक्तव्य द्वेष पसरवणारे आहे. यामुळे सामाजिक तेढ निर्माण होण्याचा धोका आहे.”

गोपीचंद पडळकर नेमकं काय म्हणाले होते?

भाजपचे नवनिर्वाचित विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जहरी टीका केली. “शरद पवार हे या महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे. कारण गेल्या अनेक वर्षापासून ते महाराष्ट्राचं नेतृत्त्व करतात. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची भूमिका त्यांची राहिलेली आहे. ही भूमिका यापुढेही ते कायम ठेवतील”, असं गोपीचंद पडळकर म्हणाले होते.

शरद पवार हे राजकीय विरोधक, ते शत्रू नाहीत, पडळकरांच्या टीकेवर फडणवीसांचं भाष्य

पडळकरांच्या टीकेनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी भाष्य केलं. “शरद पवार हे आमचे राजकीय विरोधक आहे. मात्र ते आमचे शत्रू नाहीत. त्यामुळे असे शब्द वापरणं चुकीचं आहे,” असे फडणवीस म्हणाले.

संबंधित बातम्या :

Chandrakant Patil on remark of Gopichand Padalkar