सत्तार यांचे सुप्रिया सुळे यांच्याबाबत अपशब्द; सुलक्षणा सलगर यांच्यापासून पंकजा मुंडेंपर्यंत कोण काय म्हणालं?

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनीही या प्रकरणावरून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मी हे वक्तव्य अद्याप पाहिलेलं नाही. कृषी मंत्री असो की अन्य कुणी. कुणीही महिलांबद्दल अपशब्द वापरता कामा नये.

सत्तार यांचे सुप्रिया सुळे यांच्याबाबत अपशब्द; सुलक्षणा सलगर यांच्यापासून पंकजा मुंडेंपर्यंत कोण काय म्हणालं?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 07, 2022 | 3:53 PM

मुंबई: शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या (एनसीपी) खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात अपशब्द वापरले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधून संतापाची भावना व्यक्त होत आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सत्तार यांच्या मुंबईतील घराबाहेर जोरदार निदर्शने करत त्यांच्या विधानाचा निषेध नोंदवला. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सत्तार यांच्या घरावर दगडफेक करत त्यांच्या खिडक्यांच्या काचाही फोडल्या. तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या महिला नेत्यांनी सत्तार यांच्या विधानावर निषेध नोंदवला आहे. भाजपच्या (बीजेपी) नेत्या पंकजा मुंडे यांनीही सत्तार यांना कानपिचक्या दिल्या आहेत.

अब्दुल सत्तार यांचं वादग्रस्त विधान आल्यानंतर त्यावर सर्वच स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादीच्या युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. अब्दुल सत्तार यांनी येत्या 24 तासात माफी मागावी अन्यथा त्यांना दिसेल तिथे झोडपून काढू, असा इशाराच सक्षणा सलगर यांनी दिला आहे.

राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांनीही सत्तार यांच्या या विधानाचा समाचार घेतला आहे. सत्तेत महत्त्वाच्या पदावर आहात तरी विकृता सारखे अपशब्द वापरत आहात. महिलांना शिवीगाळ करणाऱ्या नालायक मंत्र्याचा जाहीर निषेध, असं रुपाली पाटील यांनी म्हटलं आहे.

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनीही या प्रकरणावरून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मी हे वक्तव्य अद्याप पाहिलेलं नाही. कृषी मंत्री असो की अन्य कुणी. कुणीही महिलांबद्दल अपशब्द वापरता कामा नये. कोणी कोणत्याही पक्षाचा असो महिलांचा सन्मान ठेवलाच पाहिजे. वैयक्तीक टीका आणि अपशब्द टाळलेच पाहिजे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

अब्दुल सत्तार हे सुप्रिया सुळेंबद्दल जे बोलले त्याचा मी निषेध करतो. मी नेहमी सांगतो की, अब्दूल सत्तार हा मूर्ख माणूस आहे, अशिक्षित आहे आणि विकृत माणूस आहे, अशी टीका जालन्याचे काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी केली आहे.

सत्तार यांना कृषिमंत्री केले हा महाराष्ट्राला लागलेला शाप आहे. अब्दुल सत्तार यांची हकालपट्टी केली पाहिजे, असे मी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना नेहमी सांगत आलो आहे. या माणसाची हकाल पट्टी केली पाहिजे, अशी मागणीही गोरंट्याल यांनी केली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us