Eknath Shinde | बंडखोरी टाळण्यासाठी आणि सत्ता टिकवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे फक्त हे 2 पर्याय!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काल संध्याकाळी वर्षा निवासस्थानातून बाहेर पडले आणि मातोश्रीवर पोहोचले. ठाकरे यांनी अद्याप मुख्यमंत्रीपद सोडले नसून, बंडखोरांनी पुढे येऊन चर्चा केल्यास आपण मार्ग काढू असे स्पष्ट संकेत त्यांनी दिले. शिवसेनेतील गळती थांबण्याचे नाव घेत नाहीये, तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांची ताकद वाढते आहे.

Eknath Shinde | बंडखोरी टाळण्यासाठी आणि सत्ता टिकवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे फक्त हे 2 पर्याय!
Image Credit source: tv9
| Updated on: Jun 23, 2022 | 1:58 PM

मुंबई : राज्यात शिवसेनेमध्ये (Shivsena) मोठी बंडखोरी झालीये. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे तब्बल 41 आमदार फोडले आहेत. इतकेच नाही तर आमचीच खरी शिवसेना आहे, असेही आता एकनाथ शिंदे सांगतायेत. राज्यातील महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले. महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi) कसे वाचवायचे यावर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यामध्ये विचारमंथन सुरू आहे. मात्र, महाविकास आघाडी सरकारच्या हातातून जवळपास परिस्थिती बाहेर गेलीयं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी कालच भावनिक भाषण केलंय. परंतू अशा परिस्थितीत सत्ता टिकवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव यांच्यासमोर कोणते राजकीय पर्याय उरले आहेत? हे आपण जाणून घेणार आहोत.

सत्ता टिकवण्यासाठी मुख्यमंत्र्याकडे 2 पर्याय

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काल संध्याकाळी वर्षा निवासस्थानातून बाहेर पडले आणि मातोश्रीवर पोहोचले. ठाकरे यांनी अद्याप मुख्यमंत्रीपद सोडले नसून, बंडखोरांनी पुढे येऊन चर्चा केल्यास आपण मार्ग काढू असे स्पष्ट संकेत त्यांनी दिले. शिवसेनेतील गळती थांबण्याचे नाव घेत नाहीये, तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांची ताकद वाढते आहे. शिवसेनेच्या आमदारांनी ज्याप्रकारे उद्धव ठाकरेंविरोधात बंडखोरी केली आहे, त्यावरून स्पष्ट दिसते आहे की, जर उद्धव ठाकरे यांना शिवसेनेची सत्ता टिकवायची असेल तर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करावे लागणार आहे.

एकनाथ शिंदे यांनी ट्विटमधून केले स्पष्ट

अशा परिस्थितीत एक प्रश्न उपस्थित होतो, या राजकीय संकटातून महाविकास आघाडी सरकारला वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचे पाऊल उचलतील का? तसे झाले तर महाविकास आघाडी आणि शिवसेनेतील बंडखोरी संपण्याची शक्यता आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांनी बुधवारी ट्विट करून शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबतची युती अनैसर्गिक असल्याचे सांगत यातून बाहेर पडणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. शिंदे म्हटंले की, राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन केल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजगी आहे. कारण त्यांची विचारधारा शिवसेनेच्या पूर्णपणे विरुद्ध आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी नकोच

अशा स्थितीत एकनाथ शिंदे ज्याप्रकारे काँग्रेस आणि राष्ट्रवादीबाबत आक्रमक होत भाजपसोबत सरकार स्थापनेचा पर्याय देत आहेत. अशा स्थितीत शिंदे यांनी उद्धव ठाकरेंसमोर केवळ मुख्यमंत्रीच नाही, तर महाविकास आघाडीतून बाहेर पडत भाजपासोबत सत्तास्थापन करण्याचा पर्याय दिला आहे. एकनाथ शिंदे ज्याप्रकारे काँग्रेस राष्ट्रवादीशी संबंध तोडण्याबाबत भूमिका घेत आहेत आणि पक्षाचे सर्व आमदार त्यांच्या पाठिशी उभे आहेत. अशा स्थितीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबतची युती तोडून भाजपसोबत सरकार स्थापन करणे हा उद्धव ठाकरेंसमोर दुसरा पर्याय आहे. अशा स्थितीत भाजपशी हातमिळवणी केल्यास सत्ता निश्चितच टिकून राहील.