…म्हणून मुख्यमंत्री पूरग्रस्त कोल्हापुरात जाणार नाहीत

| Updated on: Aug 07, 2019 | 1:00 PM

बचावकार्यात अडथळा नको म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्त भागात जाण्याचं टाळत मुंबईतूनच आढावा बैठक घेतली

...म्हणून मुख्यमंत्री पूरग्रस्त कोल्हापुरात जाणार नाहीत
Follow us on

मुंबई : कोल्हापूर (Kolhapur Floods), सांगली, साताऱ्यातील पूरपरिस्थिती गंभीर आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या विविध भागातील पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुंबईत बैठक आयोजित केली होती. बचावकार्यात अडथळा नको म्हणून तिथे जाणं टाळलं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.

राज्यात ज्या भागात पूर ओसरला आहे तिथे पिण्याचे शुद्ध पाणी, आरोग्य सुविधा आणि वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी यंत्रणांनी सज्ज रहावे. पिण्याच्या पाण्याच्या नळ जोडण्या पूर्ववत करण्यासाठी तातडीने प्रयत्न करावेत. दुर्गम भागात आदिवासी पाड्यांमध्ये तसेच पूरग्रस्तांसाठीच्या मदत छावण्यांमध्ये अन्न धान्य, पिण्याचे पाणी अशा सुविधा पुरवण्यात याव्यात. रेल्वे यंत्रणेला पाऊस आणि धरणांच्या विसर्गाबाबतची माहिती देण्याची व्यवस्था करावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

कोल्हापूर, सांगलीमध्ये अतिवृष्टी होत आहे. एनडीआरएफची टीम बचावकार्यासाठी घटनास्थळी दाखल झाली आहे. बचावकार्यात अडथळा नको म्हणून तिथे जाणं टाळलं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, मदत आणि पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख, पर्यावरण मंत्री रामदास कदम, आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी मुंबईतील आढावा बैठकीला उपस्थित होते. कोल्हापूर, सांगली, पुणे, सातारा, पालघर, रायगड आणि रत्नागिरीतील जिल्हाधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चेला हजर राहिले.

Kolhapur Flood : छातीपर्यंत पाणी, 51 हजार नागरिकांचं स्थलांतर, आर्मी,नेव्ही कोल्हापुरात

कोल्हापूर येथे राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची (एनडीआरएफ) 22 पथके कार्यरत आहेत. कोल्हापूर मधील 204 गावांना पुराचा फटका बसला आहे. प्रशासनामार्फत सध्या 11 हजार नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. मुख्य सचिवांनी केंद्रीय सुरक्षा सचिवांशी संपर्क साधून डोनिअर विमानाच्या माध्यमातून पूरग्रस्त भागातील नागरिकांना स्थलांतर करण्याची मागणी केली. आता नौदलाचे बचाव पथक देखील कार्यरत आहे.

सांगली जिल्ह्यात सांगली, पलूस, वाळवा तालुक्यात पुराचा फटका बसला आहे. सुमारे 53 हजार नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा, माळशिरस तालुक्यातील नागरिकांना पूर परिस्थितीला सामोरे जावे लागले आहे. पंढरपूर येथील सुमारे 2000 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.

पुणे जिल्ह्यात शहरासह 64 गावं पुराने प्रभावित झाली असून सुमारे 3 हजार 343 लोकांना मदत करण्यात आली आहे. पूरग्रस्तांसाठीच्या मदत छावण्यांमध्ये गहू आणि तांदूळाचे वाटप करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यातील सर्व धरणं 100 टक्के भरली आहेत.

रायगड जिल्ह्यात 8 तालुके बाधित असून सरासरीच्या 105 टक्के पाऊस झाला आहे. सुमारे 3000 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील 38 धरणं 100 टक्के भरली आहेत. पुरामुळे 13 गावे बाधित झाली आहेत. नाशिक जिल्ह्यात गेल्या 50 वर्षांतला सर्वाधिक विसर्ग सोडण्यात आला असून सर्व धरणं 80 टक्क्यांपेक्षा अधिक भरली आहेत. ठाणे जिल्ह्यात 13 हजार नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले.

धरण क्षेत्रात पडणारा पाऊस आणि धरणातून होणारा विसर्ग याबाबत माहिती मिळाल्यास त्या भागातील रेल्वेसेवासाठी उपयुक्त ठरेल अशी सूचना रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी मांडली होती त्यावर रेल्वेला ही माहिती देण्याची व्यवस्था करावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

राज्यात पूरग्रस्त भागात आरोग्य सुविधेसाठी सुमारे 162 वैद्यकीय पथके कार्यरत असून आवश्यकता भासल्यास अधिक चीपथके पाठवण्यात येतील. औषधांचा साठा पुरेसा असून आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्याचे आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

राज्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान 1007 मिमी असून आतापर्यत सरासरीच्या 685 मिमी पाऊस झाला आहे. आतापर्यंत प्रत्यक्ष 714.40 मिमी पाऊस झाला आहे.