कमीत कमी आमदार, तरी राज्यात चमत्कार, मुख्यमंत्र्यांचा भाजपला टोला

| Updated on: Dec 25, 2019 | 2:17 PM

शरद पवारांनी कमीत कमी आमदारात राज्यात चमत्कार केला. त्यामुळे जागा जास्त म्हणून सगळीकडे तुमची पिकं नाहीत, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (CM Uddhav Tahckeray criticized on BJP) भाजपला लगावला.

कमीत कमी आमदार, तरी राज्यात चमत्कार, मुख्यमंत्र्यांचा भाजपला टोला
Follow us on

पुणे : शरद पवारांनी कमीत कमी आमदारात राज्यात चमत्कार केला. त्यामुळे जागा जास्त म्हणून सगळीकडे तुमची पिकं नाहीत, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (CM Uddhav Tahckeray criticized on BJP) भाजपला लगावला. पुणे येथे आज (25 डिसेंबर) वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची 43 वी वार्षिक सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी मुख्यमंत्र्यांसह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील (CM Uddhav Tahckeray criticized on BJP) यांच्यासह अनेक दिग्गज मंडळी उपस्थित होती.

“या संस्थेचे नेतृत्व शरद पवार यांच्याकडे आहे. ते तुम्हाला कमीत कमी जागेत जास्तीत जास्त उत्पादन द्यायला शिकवतात. तसेच राजकारणात पवारांनी नवीन चमत्कार केला. कमीत कमी आमदारात त्यांनी राज्यात चमत्कार केला. त्यामुळे असं म्हणू नये जागा जास्त आहे त्यामुळे आमची पिकं सगळीकडे येणार. कमीत कमी जागेत सुद्धा तुमच्यावर मात करु शकतो. ते करुनही दाखवले”, असा टोला मुख्यमंत्र्यांनी भाजपला लगावला.

“आपण जगात गोडवा वाटण्याचं काम करता. माझ्या बोलण्यात काही कमी आलं तर शरद पवारांना जबाबदार धरावे. यापूर्वी याच व्यासपीठावर कोण तरी म्हटले होते शरद पवारांचे बोट धरुन मी राजकारणात आलोय. त्यामुळे पवार साहेबांनी एक चूक केली दुसरी केली असं मी म्हणणार नाही, पण हे एक चांगले व्यासपीठ आहे”, असं नरेंद्र मोदींचे नाव न घेता उद्धव ठाकरेंनी टीका केली.

“सहकार आणि राजकारण वेगळं होऊ शकत नाही. ही वीण घट्ट करण्याची गरज आहे. आम्ही शहरातील लोक आम्हाला थंड रस गोड लागायचा. मात्र तुमचं कष्ट दुर्लक्ष होते. लोकांच्या आयुष्याचं चिपाड होत आहे. याकडे दुर्लक्ष झालं तर आमचं काही खरे नाही”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“ही संस्था इतर ठिकाणी उभारण्यासाठी गेल्या सरकारनं प्रयत्न केला. मात्र त्यावेळी आम्ही अर्धवट होतो. आमचं सरकार होते पण बोलाची कडी आणि बोलाचा भात होता”, असंही उद्धव ठाकरेंनी सांगितले.

“दोन लाख कर्जमुक्ती होणार, दोन लाखांवरील लोकांना दिलासा देणारा हा शब्द आहे. नियमित कर्ज भरणाऱ्याला दिलासा मिळेल. शेतकऱ्यांचा पाठीराखा म्हणून सरकार काम करणार आहे”, असा विश्वासही यावेळी उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना दिला.

“आम्हाला अनुभवातून शहाणपणा आले आहे. शरद पवारांनी आणि जनतेने आशीर्वाद दिला. त्यामुळे सर्व तज्ञ एकत्र करुन शेतकऱ्यांचा धोरणात्मक निर्णय घेणार”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.