फडणवीसांच्या काळातील 6 महिन्यांच्या फाईल मागवल्या, मुख्यमंत्री ठाकरे अॅक्शनमध्ये!

| Updated on: Dec 02, 2019 | 6:53 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागील काही दिवसांत एकामागून एक निर्णयांचा धडाका लावल्याने ते 'अॅक्शन'मध्ये आल्याचं दिसत आहे. (CM Uddhav Thackeray on Fadnavis Government decisions).

फडणवीसांच्या काळातील 6 महिन्यांच्या फाईल मागवल्या, मुख्यमंत्री ठाकरे अॅक्शनमध्ये!
Follow us on

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागील काही दिवसांत एकामागून एक निर्णयांचा धडाका लावल्याने ते ‘अॅक्शन’मध्ये आल्याचं दिसत आहे. (CM Uddhav Thackeray on Fadnavis Government decisions). त्यांनी आधी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या मुंबई मेट्रोच्या आरे जंगलातील कारशेडला स्थगिती दिली. यानंतर आता त्यांनी फडणवीस सरकारच्या मागील 6 महिन्यांमधील सर्व निर्णयांच्या फाईल्स मागवल्या आहेत (CM Uddhav Thackeray on Fadnavis Government decisions). त्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आधीच राज्याच्या आर्थिक स्थितीची माहिती घेत असल्याचं सांगत श्वेतपत्रिका काढण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे त्या अहवालातूनही ठाकरे फडणवीसांची कोंडी करणार असल्याचं दिसत आहेत. दुसरीकडे फडणवीस सरकारच्या कार्यकाळातील अखेरच्या 6 महिन्यांमध्ये घेतलेला प्रत्येक निर्णय बारकाईने तपासला जाणार आहे. त्यामुळे अनेकांना धडकी भरल्याची चर्चा आहे.

फडणवीसांच्या विकासाच्या दाव्यांचा फुगा फोडण्याचा प्रकार?

उद्धव ठाकरे यांनी सर्व विभागांना विविध योजना, निविदा प्रक्रिया, लहान, मोठे निर्णय याबाबतच्या फाईल्स देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे यातील अनेक निर्णयांवर कुऱ्हाड पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे राज्याच्या सध्याच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेण्याचंही काम सुरु आहे. त्यामुळे हे आदेश म्हणजे फडणवीस यांच्या विकासाच्या दाव्यांचा फुगा फोडण्याचाच प्रकार असल्याची चर्चा आहे.

शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी या आदेशाचा उद्देश आढावा घेण्याचा असल्याचं म्हटलं आहे. एकनाथ शिंदे म्हणाले, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. यात जे प्रकल्प सुरु आहेत त्याचा आढावा घेतला जात आहे. यात कोणतंही सूडाचं काम मुख्यमंत्री आणि आमचं सरकार करणार नाही असं खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं आहे. लोकांच्या हिताचे सुरु असलेले प्रकल्प आणि त्यांची स्थिती काय आहे हे स्पष्ट होण्यासाठी हा सर्व आढावा घेतला जात आहे.”