मी पॅकेज घोषित करणारा मुख्यमंत्री नाही तर मदत करणारा मुख्यमंत्री : उद्धव ठाकरे

| Updated on: Jul 30, 2021 | 2:18 PM

मी पॅकेज जाहीर करणारा मुख्यमंत्री नाही तर मी मदत करणारा मुख्यमंत्री आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

मी पॅकेज घोषित करणारा मुख्यमंत्री नाही तर मदत करणारा मुख्यमंत्री : उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
Follow us on

कोल्हापूर : मी पॅकेज जाहीर करणारा मुख्यमंत्री नाही तर मी मदत करणारा मुख्यमंत्री आहे. मी ह्याच्या आधी देखील सांगितलं आहे की मी सवंग लोकप्रियतेसाठी कोणतीही घोषणा करणार नाही. मपण सगळ्या पूरग्रस्तांना मदत नक्की करेन, असा पुनरुच्चार मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज कोल्हापुरात बोलताना केला. (CM Uddhav Thackeray Press Conference kolhapur Shirol Maharashtra Flood)

मुख्यमंत्र्यांचा पूरग्रस्त पाहणी दौरा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थितीची पाहणी केली. स्थानिक नागरिकांनी संवाद साधत त्यांच्या अडचणी समजावून घेतल्या. तसंच त्यांना धीर देत मदतीचं आश्वासन देखील दिलं.

कोल्हापुरातील पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना आपण पॅकेज जाहीर करणारा मुख्यमंत्री नसल्याचं म्हणत मी मदत करणारा मुख्यमंत्री आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

पूरग्रस्तांना तात्काळ मदत देण्यात येईल

माझे सहकारी मंत्री देखील मदत करणारे आहेत. शासनाने जाहीर केल्याप्रमाणे पूरग्रस्तांना तात्काळ मदत देण्यात येईल. अजूनही सांगली, कोल्हापूरच्या काही भागांत पाणी आहे. आता कुठे पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे. परिस्थितीचा सगळा अंदाज घेऊन पुढील कार्यवाही करणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.

ब्लू लाईन, रेड लाईनमध्ये बांधकामांना परवानगी देणार नाही

पूर परिस्थिती रोखण्यासाठी आता काही कठोर निर्णय घ्यावे लागणार आहेत. हे निर्णय घेताना विरोध करू नका, असं सांगतानाच यापुढे नदीपात्रातील ब्लू लाईन, रेड लाईनमध्ये बांधकामांना परवानगी देण्यात येणार नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज स्पष्ट केलं आहे.

पाणी नियोजनाचा आराखडा तयार करणार

कोल्हापुरात मी दोन तीन ठिकाणी फिरलो. यावेळी नागरिकांनी आपल्या तक्रारी माझ्यासमोर मांडल्या. दरवर्षी या ठिकाणी पूर येतो. आम्ही कष्टाने कमावतो. त्यामुळे संसार उद्धवस्त होतात. त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढा, असं लोक म्हणत आहेत. नद्यांच्या अतिरिक्त पाण्याचं नियोजन करायचं आहे. नुसता अभ्यास नाही तर आराखडा तयार करावा लागणार आहे. खचणारे रस्ते, कोसळणाऱ्या दरडी यामुळे भूगर्भाचाही अभ्यास करायचा आहे, असं त्यांनी सांगितलं.

भिंत बांधावी ही कल्पना, आग्रह नाही

मी भिंत बांधायची कल्पना मांडली होती. पण त्यावर मतमतांतरे असेल तर आपण पुढे सरकता येणार नाही. केवळ भिंत हा पर्याय असू शकतो का असं मी म्हटलं होतं. असेल तर पुढे जाऊ, नसेल तर सोडून देऊ. भिंत बांधावीच हा माझा आग्रह नाही, असंही त्यांनी सांगितलं.

(CM Uddhav Thackeray Press Conference kolhapur Shirol Maharashtra Flood)

हे ही वाचा :

नदीपात्रातील ब्लू, रेड लाईनमध्ये बांधकामास परवानगी नाही, पूर परिस्थिती रोखण्यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागणार: मुख्यमंत्री