मुख्यमंत्री आणि राज्यपालांची राजभवनात भेट

| Updated on: Apr 28, 2020 | 6:24 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राजभवनात भेट झाली. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांचा शपथविधी आज संध्याकाळी राजभवनात झाला. (CM Uddhav Thackeray to meet Governor Bhagatsingh Koshyari at Rajbhavan)

मुख्यमंत्री आणि राज्यपालांची राजभवनात भेट
Follow us on

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राजभवनात भेट झाली. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांचा शपथविधी आज संध्याकाळी राजभवनात झाला. यावेळी राज्यपाल आणि मुख्यमंत्री उपस्थिती होते. (CM Uddhav Thackeray to meet Governor Bhagatsingh Koshyari at Rajbhavan)

शपथविधीच्या वेळी उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यात राज्यातील स्थितीवर चर्चा होणार असल्याची माहिती होती. त्याचबरोबर राज्यपाल नियुक्त आमदारांच्या प्रस्तावावरही चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. याच प्रस्तावात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विधानपरिषदेचे सदस्य बनवण्यासंदर्भातही चर्चा झाल्याचं सांगण्यात येत होतं.

विशेष म्हणजे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आज पुन्हा राज्यपालांच्या भेटीला गेले होते. राजभवनात गेल्या काही दिवसात अनेक वेळा दोघांची भेट झाल्याची माहिती आहे. कोरोना आणि इतर विषयांवर दोघांची चर्चा झाली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजूनही राज्यपाल नियुक्त आमदारांच्या प्रस्तावावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सही केलेली नाही. त्यामुळे ‘कोरोना’सारख्या वैश्विक संकटाच्या वेळीही विरोधक राजकारण करत असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.

हेही वाचा : राज्यपालांनी फडणवीसांना मुख्यमंत्री करण्यासाठी त्यांचा अधिकार वापरला, आता त्यांना मंत्रिमंडळाचं ऐकावं लागेल : पृथ्वीराज चव्हाण

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर 6 महिन्यांच्या आत विधानसभा किंवा विधानपरिषद या विधिमंडळाच्या कोणत्याही एका सभागृहाचं सदस्य होणं संविधानानुसार बंधनकारक असतं. अन्यथा, मंत्र्याचं पद धोक्यात येण्याची शक्यता असते. उद्धव ठाकरे यांनी नोव्हेंबर महिन्यात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. 27 मे रोजी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन 6 महिने पूर्ण होत आहेत. (Uddhav Thackeray Governor Rajbhavan)

कोरोनाच्या संकटामुळे विधानपरिषदेची निवडणूक लांबणीवर पडली आहे. सध्या राज्यपाल नियुक्त दोन जागा रिक्त आहेत. त्यातल्या एका जागेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाची शिफारस 6 एप्रिलला राज्यपालांकडे करण्यात आली आहे.

येत्या काही दिवसात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या आमदारकीबाबत निर्णय घेतला गेला नाही, तर राज्यपालांना शिफारस स्वीकारण्याबद्दल पुन्हा विनंती करावी लागेल. अन्यथा 3 मेनंतर लॉकडाऊन संपल्यानंतर लगेचच निवडणूक घेता येऊ शकते. मात्र निवडणूक घेण्यासाठी किमान 12 दिवस हवे. उद्धव ठाकरे यांना 27 मे रोजी मुख्यमंत्री होऊन 6 महिने पूर्ण होतील. त्याआधी आमदारकी मिळवणं आवश्यक आहे. लॉकडाऊननंतर 4 ते 27 मे असा 24 दिवसांचा कालावधी मिळतो.

राज्यपाल कोट्यातून घटनात्मकदृष्ट्या उद्धव ठाकरे आमदार होऊच शकत नाहीत, असं काही दिवसांआधीच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले होते. तर राजभवन हे फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केली होती.

पृथ्वीराज चव्हाण काय म्हणतात?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीबाबत राजकारण होत आहे यात काही शंका नाही. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यासाठी त्यांचा अधिकार वापरला, आता त्यांना मंत्रिमंडळाचं ऐकावं लागेल, असं स्पष्ट मत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं आहे.

भारतीय राज्यघटनेप्रमाणे एकदा मंत्रिमंडळ अस्तित्वात आलं की मग, मंत्रिमंडळाचा अधिकार हा सर्वोच्च असतो. राज्यपालांनी मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच राज्य करायचं असतं, त्यांना मंत्रिमंडळाचा सल्ला मान्य करावा लागतो. मंत्रिमंडळ गठन व्हायच्या आत, कोणाला मुख्यमंत्री करायचं, याचे राज्यपालांकडे भरपूर स्वेच्छाधिकार असतात. तो यावेळी वापरलाही गेला. म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचं केवळ 80 तासांचं सरकार झालं. परंतु एकदा सरकार अस्तित्वात आलं, उद्धव ठाकरे यांचं सरकार अस्तित्वात आलेलं आहे. की त्या मंत्रिमंडळाने दिलेला सल्ला, किंवा त्यांनी दिलेला जो निर्णय असेल, शिफारस असेल, ती राज्यपालांना मान्यच करावी लागेल, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.