‘भाबीजी घर पर है’मधून भाजपचा प्रचार, मालिकेवर बंदी घाला : काँग्रेस

| Updated on: Jul 05, 2019 | 4:04 PM

मुंबई : टीव्हीवरील लोकप्रिय मालिका ‘भाबीजी घर पर है’, ‘तुझसे है राबता’ यामधून भाजप निवडणूक प्रचार करत आहे. त्यामुळे या मालिका आणि संबंधित चॅनल्सवर बंदी घालावी , अशी मागणी काँग्रेसने केली आहे. आचारसंहिता भंग आणि जाणिवपूर्वक प्रेक्षकांचा विश्वासघात करत असल्याप्रकरणी या वाहिन्यांचे प्रक्षेपण तात्काळ थांबवावे, तसंच ‘भाबीजी घर पर है’, ‘तुझसे है राबता’ या मालिकांच्या निर्माते […]

भाबीजी घर पर हैमधून भाजपचा प्रचार, मालिकेवर बंदी घाला : काँग्रेस
Follow us on

मुंबई : टीव्हीवरील लोकप्रिय मालिका ‘भाबीजी घर पर है’, ‘तुझसे है राबता’ यामधून भाजप निवडणूक प्रचार करत आहे. त्यामुळे या मालिका आणि संबंधित चॅनल्सवर बंदी घालावी , अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

आचारसंहिता भंग आणि जाणिवपूर्वक प्रेक्षकांचा विश्वासघात करत असल्याप्रकरणी या वाहिन्यांचे प्रक्षेपण तात्काळ थांबवावे, तसंच ‘भाबीजी घर पर है’, ‘तुझसे है राबता’ या मालिकांच्या निर्माते आणि कलाकारांसह भारतीय जनता पक्षाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली आहे.

‘भाबीजी घर पर है’ या कार्यक्रमात अस्पष्टपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहिरात केली आहे. यामध्ये LPG गॅस कनेक्शन योजना आणि स्वच्छ भारत यावर भाष्य करण्यात आलं आहे. यामुळे या कार्यक्रमांवर काँग्रेस पक्षातर्फे आचारसंहिता भंग केल्याचा आरोप करण्यात येत आहे.

यासंदर्भात बोलताना सावंत म्हणाले की, निवडणूक आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर भारतीय जनता पक्षातर्फे सराईत गुन्हेगाराप्रमाणे वेळोवेळी आचारसंहितेचा भंग केला जात आहे. परंतु यावेळी अत्यंत गंभीर अशा पेड न्यूजच्या धर्तीवर मालिकांचा उपयोग सत्ताधारी पक्षाच्या योजनांचा आणि नेत्यांच्या प्रचार, प्रसार करण्याकरीता केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार गेल्या आठवडाभरापासून सुरु आहे. मालिकांच्या लोकप्रियतेचा उपयोग करून भारतीय जनता पक्षातर्फे छुप्या मार्गाने मायावी तंत्र वापरून प्रचार केला जात आहे. ही कार्यपद्धती समजून घेण्याकरीता झी टीव्हीवरील ‘तुझसे हे राबता’ आणि अॅन्ड टीव्हीवरील ‘भाबीजी घर पर है’ या मालिकांमधील दृश्य पेन ड्राईव्हच्या माध्यमातून पुरावे म्हणून आम्ही राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांकडे सोपवले आहेत.

या मालिकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच सरकारतर्फे हाती घेण्यात आलेल्या अनेक योजनांची जाहीरात या कार्यक्रमांमधून करण्यात आली आहे. याकरीता कुठेही जाहीरात म्हणून सूचना देण्यात आलेली नाही. लोकांची मानसिकता प्रभावित करून सत्ताधाऱ्यांना लाभ मिळवून देण्याचा कुटील डाव यातून स्पष्टपणे समोर आला आहे. या प्रकरणात कोट्यवधींचा आर्थिक व्यवहार झाला असण्याची शक्यता आहे. त्याचीही चौकशी करून भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी सावंत यांनी केली आहे.

“भारतीय जनता पक्ष दिवसेंदिवस हीन पातळी गाठत आहे. रामायणातील रावण आणि महाभारतातील कौरवांप्रमाणे मायावी आणि अनैतिक मार्गांचा वापर भाजपातर्फे सुरु करण्यात आलेला आहे. पण अंतिमतः विजय सत्याचाच होत असतो या लढाईतही सत्याचाच विजय होईल”, असा विश्वास यावेळी सावंत यांनी व्यक्त केला.