बाबांना वाटतंय ‘ऑपरेशन कमळ’, पाहा Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट

अजित पवारांनी माध्यमांसमोर येत, चर्चांना पूर्णविराम दिला. मात्र त्याआधी बरंच काही घडलं. शिंदेंच्या शिवसेनेनंही भाजपला इशारा दिला. तर काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाणांना ऑपरेशन कमळची शंका आहे.

बाबांना वाटतंय ऑपरेशन कमळ, पाहा Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट
Chetan Patil | Updated on: Apr 18, 2023 | 11:47 PM

मुंबई : आपल्या संदर्भातल्या चर्चेत काहीही तथ्य नाही, असं विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले आणि बंडखोरी वगैरेच्या चर्चांना पूर्णविराम बसला. तर इकडे अजित दादांचं स्वागत करु म्हणणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनीही काहीसा यूटर्न घेतला. अजून कोणताही प्रस्ताव नाही असं बावनकुळे म्हणाले आहेत. पण ज्या चर्चा सुरु होत्या, त्यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं आपली भूमिका स्पष्ट केली. एक दिवसाआधीच प्रवक्तेपदी नियुक्ती झालेले आमदार संजय शिरसाट यांनी अजित दादांचं स्वागत आहे, असं म्हणतानाच, आम्ही सत्तेत राहणार नाही, अशा शब्दात इरादे स्पष्ट केले

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा विरोध होता हे शिरसाटांच्या बोलण्यातून स्पष्ट झालं. पण त्याचवेळी अजित पवारांना महाविकास आघाडीत साईडलाईन केलं जातंय हेही सांगायला ते विसरले नाहीत. दुसरीकडे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी मोठी शंका व्यक्त केलीय. कर्नाटक आणि मध्य प्रदेश प्रमाणंच ऑपरेशन लोटस सुरु झाल्याचं चव्हाण म्हणाले आहेत.

भाजपसोबत कोणतीही बोलणी नाही हे सांगून अजित पवारांनी वातावरण शांत केलंय. पण न्यू इंडियन एक्स्प्रेसच्या 40 आमदारांच्या दाव्यावरुनही पृथ्वीराज चव्हाणांनी भाष्य केलंय. अजित पवारांसोबत 40 आमदार आले तरी विलीनीकरण हा मुद्दा आहेच. दरम्यान, आधी अजित दादांचं स्वागत आहे असं म्हणणारे भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचे नेतेही काहीसे शांत झालेत. अर्थात बावनुकळेंच्या सांगण्याप्रमाणं अद्याप तसा प्रस्ताव नाहीय.

‘मला एकट्यालाच भाजपसोबत लढावं लागेल’, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य

दुसरीकडे भाजपसोबत जाण्यासंदर्भात कोणताही प्लॅन नाही? निव्वळ अफवा आहेत हे अजित पवारांनी स्पष्ट केलं. मात्र या चर्चेच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंचं वक्तव्य फार महत्वाचं आहे. मला एकट्यालाच भाजपसोबत लढावं लागेल, असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी काँग्रेस नेत्यांकडे केल्याची माहिती आहे. ज्याचा उल्लेख अजित पवारांनीही आपल्या पत्रकार परिषदेत केला पण राष्ट्रवादीत काही घडलंच तर, ठाकरे गट, काँग्रेस आणि वंचित एकत्र येऊन लढू शकतात.

सोमवारीच त्याची झलक मातोश्रीवर दिसली. काँग्रेसचे सरचिटणीस के सी वेणूगोपाल यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. या भेटीत विचारधारा वेगवेगळी असली आणि काही मुद्यांवर मतभेद असले तरी, एकत्र लढण्यावर एकमत झालंय आणि उद्धव ठाकरेंना दिल्लीत येण्याचंही निमंत्रण देण्यात आलं असून ठाकरे दिल्लीत राहुल गांधींना भेटल्यानंतर राहुल गांधी मुंबईत येणार आहेत.

ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशी 3 पक्षांची महाविकास आघाडी आहे. तर प्रकाश आंबेडकरांच्या वंचितसोबत ठाकरे गटाची वेगळी युती आहे. पण वंचित महाविकास आघाडीत समाविष्ट झालेली नाही. त्याचं कारण आहे प्रकाश आंबेडकरांचा राष्ट्रवादीला विरोध, त्यामुळं समजा राष्ट्रवादी किंवा अजित पवारांचा गट वेगळा झालाच तर वंचित आणि काँग्रेस ठाकरेंना साथ देऊ शकतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us