Devendra Fadnavis : जरांगेंच्या मुंबईतल्या आंदोलनावर मुख्यमंत्र्यांचं महत्वाचं विधान; म्हणाले, ‘मराठा आंदोलकांच्या सर्व मागण्या मान्य, आता फक्त…’
मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईत होणाऱ्या आंदोलनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाचं विधान केलं आहे. यावेळी त्यांनी मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य झाल्याचे सांगितले.

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आझाद मैदान पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. त्यानंतरही मनोज जरांगे यांचा मुंबईकडे जाण्याचा मानस आहे. त्यासाठी मराठा आंदोलकांनी तयारी सुरू केली आहे. जरांगे हे उद्यापासून मुंबईच्या प्रवासाला निघणार आहेत. त्यानंतर पाच दिवसांनी मुंबईत पोहोचतील. परंतु गणेश पर्व सुरू असताना आंदोलन करणे सर्वांसाठी योग्य नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. त्यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी गणरायाची स्थापना झाली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘सर्वाना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा. सर्वांची विघ्न दूर करावीत, अशी गणरायाचरणी प्रार्थना. आपले नागरिक, बळीराजाचे संकट दूर होवो, अशी प्रार्थना. अतिशय आनंदाने आरती केल्यानंतर सर्वांना शुभेच्छा देतो. उत्सवादरम्यान कमीत कमी प्रदुषण होईल, असा प्रयत्न करूयात. जितकं पारंपारिक पद्धतीने उत्सव साजरा करता येईल, तितकं प्रयत्न करा’.
मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीवरही मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाष्य केलं. फडणवीस म्हणाले, ‘मनोज जरांगे पाटील यांच्या जवळ जवळ सगळ्या मागण्या पूर्ण झाल्या आहेत. काही मागण्या कोर्टात आहेत, विविध टप्प्यांवर आहेत. या मागण्या मान्य करण्यासाठी कोर्ट आहे, संविधानिक पद्धतीचा अवलंब करावा लागेल. त्याशिवाय मागण्या मान्य केल्या जाऊ शकत नाही. आमची आधीपासून अशीच भूमिका राहिली आहे. आम्ही चर्चेची दारे बंद केलेली नाहीत. राज्यघटनेनुसार ज्या गोष्टी आहेत. त्या गोष्टी करायला तयार आहोत. कायद्याच्या बाहेर ज्या गोष्टी जातील, ते करता येणार नाही. अतिशय खुल्या मनाने मागण्या मान्य केल्या आहेत. आता गणेश पर्व सुरू असताना आंदोलन करणे. गणेशभक्तांना असुविधा निर्माण होणे, हे कोणासाठीही योग्य नाही. मला असं वाटतं की, याचा पुर्विचार केला पाहिजे’.
ब्रिक्समध्ये मासांहारी पदार्थ नसल्याने राहुल गांधींनी आक्षेप घेतला. त्यानंतर राहुल गांधी यांनी देशात 80 टक्के मांसाहारी असल्याचा दावा केला आहे. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘छोट्या मनाचे लोक, अनेकवेळा बुद्धी संकुचित झाल्यावर अशी वागतात. ब्रिक्स ही जेवणाकरिता नव्हती. सांस्कृतिक कार्यक्रमाकरिता नव्हती. ब्रिक्स ही ग्लोबल साऊथचं फोरम होतं. ब्रिक्सचं मोठं यश हे आहे की, आज आपल्याला पाहायला मिळत आहे की, सर्व देशांनी मिळून इतक्या वादग्रस्त परिस्थितीतही दिल्ली डिक्लेरशन मान्य केलं. चीनने देखील पाकिस्तानच्या विरोधात असलेल्या डिक्लेरशनवर स्वाक्षरी दिली. यापेक्षा मोठं राजनैतिक यश असू शकत नाही. परंतु ज्यांना जेवण पाहायचं आहे, सांस्कृतिक कार्याक्रमात हाच का आला, हे पाहायचं आहे. ही संकुचित बुद्धी आहे. ब्रिक्सचे यश भारतीयांना समजू नये, त्याठी असे विवाद उभे केले जात आहेत’.
