किरीट सोमय्यांविरोधात गुन्हा दाखल करा, काँग्रेस नेत्यांचं पोलिसांना पत्र

| Updated on: Jan 01, 2020 | 10:16 AM

कॅबिनेट मंत्री अस्लम शेख यांना देशद्रोही म्हणणाऱ्या भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी काँग्रेसच्या नेत्यांनी केली आहे.

किरीट सोमय्यांविरोधात गुन्हा दाखल करा, काँग्रेस नेत्यांचं पोलिसांना पत्र
Follow us on

मुंबई : कॅबिनेट मंत्री अस्लम शेख यांना देशद्रोही म्हणणाऱ्या भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी काँग्रेसच्या नेत्यांनी केली आहे. किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी या काँग्रेस नेत्यांनी केली. याबाबतचं पत्र कांदिवलीच्या वरिष्ठ पोलीस निरिक्षकांना देण्यात आलं आहे. या पत्रात किरीट सोमय्या यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे (Kirit Somaiya vs Congress).

नेमकं प्रकरण काय?

महाविकास आघाडीचा मंत्रिमंडळ विस्तार झाला. यामध्ये काँग्रेस आमदार अस्लम शेख यांना कॅबिनेच मंत्री बनवण्यात आलं. मात्र, 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटांचा आरोपी याकूब मेमन याच्या फाशीला विरोध करणारा देशद्रोही मंत्री कसा होऊ शकतो, असा सवाल किरीट सोमय्या यांनी उपस्थित करत शिवसेनेला धारेवर धरले. ‘2015 मधील अधिवेशनात काँग्रेस आमदार अस्लम शेख यांनी दहशतवादी याकूब मेमनच्या फाशीची शिक्षा माफ करावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर भाजप, शिवसेना आमदारांनी विरोध करत सहा वेळा अधिवेशनाचं कामकाज स्थगित केलं होतं. अस्लम शेख यांना 2015 मधे शिवसेनेने ‘देशद्रोही’ म्हटलं होतं, मात्र तेच आता ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्री झाले’ असं सोमय्या म्हणाले.

किरीट सोमय्या यांनी ट्विटरवर व्हिडीओ शेअर करुन महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. ‘उद्धवा, अजब तुझे सरकार!!!? देशद्रोही आत्ता देशभक्त झाले!!! देशद्रोही अस्लम शेख, आत्ता देशभक्त झाले!!!???’ असं सोमय्यांनी ट्वीट केलं आहे.

कोण आहेत अस्लम शेख?

अस्लम शेख हे मुंबईतील मालाड पश्चिम मतदारसंघातून काँग्रेस आमदार आहेत. 2009 पासून सलग तिसऱ्यांदा ते आमदारपदी निवडून आले आहेत. अस्लम शेख हे काँग्रेसचा मुस्लिम चेहरा म्हणून ओळखले जातात. अस्लम शेख यांना महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसच्या कोट्यातून कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलं आहे.

विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर अस्लम शेख हे काँग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याची चर्चा होती. मात्र पक्षश्रेष्ठींना त्यांची समजूत काढण्यात यश आलं. शेख यांना काँग्रेसने तिसऱ्या यादीत तिकीट वाटल्याने त्यांनी तलवार म्यान केली होती. सबुरीची भूमिका घेतल्याचं अस्लम शेख यांना मंत्रिपदाच्या रुपाने फळ मिळालं.

याकूब मेमन प्रकरणी काय मागणी?

अस्लम शेख यांनी तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना 2015 मध्ये पत्र लिहिलं होतं. याकूब मेमनला सुनावलेली फाशीची शिक्षा रद्द करण्याची मागणी या पत्रात केली होती. पत्राखाली तत्कालीन आमदार आरिफ खान, अस्लम शेख आणि अमिन पटेल यांच्यासह काँग्रेसमधील आठ नेत्यांच्या सह्या होत्या. त्यामुळे काँग्रेसला टीकेची झोड सहन करावी लागली होती.