Uddhav Thackeray : एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद देऊन उद्धव ठाकरे मविआ सरकार वाचवू शकले असते? काँग्रेसकडूनही ठाकरेंच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह

| Updated on: Jul 06, 2022 | 3:37 PM

उद्धव ठाकरेंनी समंजसपणे आणि चातुर्याने निर्णय घेतले असते तर महाविकास आघाडी सरकार वाचू शकलं असतं, असं काँग्रेस नेत्यांचं मत आहे. सोमवारी झालेला विश्वासदर्शक ठराव शिंदे सरकारनं 164 विरुद्ध 99 अशा मोठ्या फरकाने जिंकला.

Uddhav Thackeray : एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद देऊन उद्धव ठाकरे मविआ सरकार वाचवू शकले असते? काँग्रेसकडूनही ठाकरेंच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
उद्धव ठाकरे,
Image Credit source: Google
Follow us on

मुंबई : महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर आता आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झालीय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) समर्थक आमदारांमध्ये टीका-टीप्पणी सुरु आहे. त्यातच आता महाविकास आघाडी सरकारमधील घटकपक्ष असलेल्या काँग्रेस नेत्यांनी (Congress Leaders) उद्धव ठाकरे यांच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करायला सुरुवात केलीय. उद्धव ठाकरेंनी समंजसपणे आणि चातुर्याने निर्णय घेतले असते तर महाविकास आघाडी सरकार वाचू शकलं असतं, असं काँग्रेस नेत्यांचं मत आहे. सोमवारी झालेला विश्वासदर्शक ठराव शिंदे सरकारनं 164 विरुद्ध 99 अशा मोठ्या फरकाने जिंकला.

इकॉनॉमिक्स टाईम्सच्या वृत्तानुसार माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पद सोडण्याचा सल्ला देण्यात आला होता. काँग्रेसच्या एका वरिष्ठ कॅबिनेट मंत्र्याने उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा सल्ला दिला होता. तसंच एकनाथ शिंदे यांना पुढील मुख्यमंत्री म्हणून घोषणा करण्यास सांगितलं होतं. सुरुवातीच्या टप्प्यातच शिंदे यांचं बंड शांत करण्यासाठी हा सल्ला देण्यात आला होता. मात्र, एक एक दिवस उलटत गेला आणि शिवसेनेचे अनेक आमदार शिंदे गटात सामिल होत गेले.

देवेंद्र फडणवीसांचंही मोठं वक्तव्य

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातील पत्रकार परिषदेत एक मोठं वक्तव्य केलं. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव माझाच होता. सोबतच आपण उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास मानसिकरित्या तयार नव्हतो, असंही फडणवीस म्हणाले. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सूचना आणि भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आदेश दिल्यानंतर आपण सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.

गोगावले, राठोड, देसाईंचा संजय राऊतांवर निशाणा

एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंडखोरी केली आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. मात्र, या सगळ्याला खासदार संजय राऊत कारणीभूत असल्याचा आरोप आता शिंदे गटातील आमदारांकडून करण्यात येत आहे. शिंदे गटाचे मुख्य प्रतोद भरत गोगावले, आमदार संजय राठोड आणि आमदार शंभुराज देसाई यांनी संजय राऊतांमुळेच शिवेसना फुटली असा गंभीर आरोप केलाय. ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बराचसा अवधी दिला होता. अजूनही वेळ गेलेली नाही, अजूनही वेळ गेलेली नाही असं ते सांगत होते पण इकडे आमच्या एक एका लोकांची पदं काढली जात होती. या सगळ्या अनुषंगाने आणि संजय राऊतांचं जे वक्तव्य येत होतं हे काळजाला घरं पाडणारं होतं, लोकांना चिड आणणारं होतं. उद्धव ठाकरे मिलिंद नार्वेकरांना आमच्याशी चर्चा करण्यासाठी सूरतला पाठवत आहेत आणि इकडे हे आमची पदं काढत आहेत, संजय राऊत तोंडाला येईल ते बोलत आहेत, म्हणून आमचं एक एक पाऊल पुढे पडत गेलं’, असं गोगावले म्हणाले.