वीज बिल माफीवर पटोले, राऊत हसं करुन घेतायत?

| Updated on: Feb 19, 2021 | 9:02 AM

राज्यात काँग्रेसची सत्ता आल्यावर वीज बिल माफ करु" असं म्हणत वीज बिल माफीवरुन काँग्रेसने भाजपच्या सुरात सूर मिसळला. (Nana Patole Nitin Raut )

वीज बिल माफीवर पटोले, राऊत हसं करुन घेतायत?
Nana Patole Nitin Raut
Follow us on

नागपूर : “राज्यात काँग्रेसची सत्ता आल्यावर वीज बिल माफ करु” असं वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केलं आहे. काँग्रेसच्या एकहाती सत्तेसाठी नाना पटोलेंनी शेतकऱ्यांना आश्वासन दिलं. मात्र ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी 100 युनिट वीज बिल माफ करणार, अशी घोषणा केलीच नव्हती, अस म्हटल्याने वीज बिल माफीवरुन दोघांमध्ये एकवाक्यता नसल्याचं चित्र आहे. (Congress Nana Patole Nitin Raut differences on Electricity Bill)

काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची माळ गळ्यात पडताच पटोले चांगलेच आक्रमक झालेले दिसत आहेत. “लॉकडाऊनमध्ये आलेलं वीज बिल माफ व्हावं, ही काँग्रेसची भूमिका आहे. राज्यात काँग्रेसची सत्ता आल्यावर वीज बिल माफ करु” असं म्हणत वीज बिल माफीवरुन काँग्रेसने भाजपच्या सुरात सूर मिसळला.

नाना पटोले काय म्हणाले?

“शेती पंपाचं अर्धे बिल माफ केले जाईल. या अर्ध्या बिलातून वीजेसाठी पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील. हे आघाडीचं सरकार असून काँग्रेसचं सरकार आल्यावर वीजेचं बिल माफ करु,” असं मत नाना पटोले यांनी व्यक्त केलं. “शेती पंपाचे बिलं दुरुस्त केले जातील. शेती पंपाचं अर्ध बिल माफ करण्यात येईल. वीज बिलाच्या या अर्ध्या पैशात वीजेच्या पायाभूत सुविधा (इन्फ्रास्टक्चर) उभ्या केल्या जातील. काँग्रेसचं सरकार आल्यावर वीजेचं बिल माफ करु, आता आघाडीचं सरकार आहे. लॉकडाऊनमध्ये आलेलं काही बिल माफ करावं, ही काँग्रेसची भूमिका आहे. आमचं सरकार असलं म्हणून आम्ही गप्प बसणार नाही.” असंही पटोले म्हणाले.

ऊर्जामंत्र्यांची भूमिका काय?

“100 युनिट वीज बिल माफ करणार, अशी घोषणा केलीच नव्हती, मी ऊर्जामंत्री झाल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. 100 युनिट वीज बिल माफीसाठी कार्यक्रम हाती घेणार आहे, असं म्हटलं होतं. त्यासाठी समितीही नेमली, पण कोव्हिड काळात एकही बैठक झाली नाही. प्रस्ताव आलाच नाही” असं ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी स्पष्ट केलं.

देवेंद्र फडणवीसांची टीका

“सत्तापक्षात राहून विरोधीपक्षाची मजा घेण्याचा प्रयत्न ते करत आहेत. ठामपणे सांगा. तुमच्या पक्षाचे कॅबिनेट मंत्री आहेत ना. आत वेगळं बोलायचं, बाहेर वेगळं बोलायचं. जनतेला काय मूर्ख समजता, जनतेला सगळं समजतं.” अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

संबंधित बातम्या :

हे आघाडीचं सरकार, काँग्रेसचं सरकार आल्यावर वीजेचं बिल माफ करणार, नाना पटोलेंचं सूचक विधान

अमिताभ बच्चन देशाचा आदर्श नाही, कॅनडाच्या अक्षय कुमारला भारतावर बोलण्याचा अधिकार काय? : राष्ट्रवादी

(Congress Nana Patole Nitin Raut differences on Electricity Bill)