नरेंद्र मोदी, भाजपकडून बंजारा समाजाची फसवणूक, नाना पटोलेची घणाघाती टीका

| Updated on: Jun 30, 2021 | 12:02 AM

नाना पटोले यांच्या उपस्थितीत टिळक भवन इथं राष्ट्रीय बंजारा टायगर्स संघटनेचे काँग्रेस पक्षात विलीनीकरण करण्यात आलं. बंजारा टायगर्स संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आत्मारामजी जाधव, राष्ट्रीय कार्याध्यक्ष मदनभाऊ जाधव यांच्यासह संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

नरेंद्र मोदी, भाजपकडून बंजारा समाजाची फसवणूक, नाना पटोलेची घणाघाती टीका
बंजारा टायगर्स संघटनेचं काँग्रेस पक्षात विलिनीकरण
Follow us on

मुंबई : भारतीय जनता पक्षाने धनगर, मराठा समाजाची जशी फसवणूक केली तशीच फसवणूक बंजारा समाजाचीही केली आहे. 2014च्या निवडणुकीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्ता आल्यानंतर बंजारा समाजाला आदिवासींचे आरक्षण देतो, असं लेखी आश्वासन दिलं होतं. पण आजपर्यंत त्यांनी तो शब्द पाळला नाही. बंजारा समाजाची फसवणूक करून समाजाच्या दैवतांचा मोदींनी घोर अपमान केला आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलीय. (Nana Patole criticizes PM Narendra Modi and BJP)

नाना पटोले यांच्या उपस्थितीत टिळक भवन इथं राष्ट्रीय बंजारा टायगर्स संघटनेचे काँग्रेस पक्षात विलीनीकरण करण्यात आलं. बंजारा टायगर्स संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आत्मारामजी जाधव, राष्ट्रीय कार्याध्यक्ष मदनभाऊ जाधव यांच्यासह संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी आ. राजेश राठोड, प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, डॉ. राजू वाघमारे, आदी उपस्थित होते.

आता टायगर (वाघ) काँग्रेसमय झालाय- पटोले

बंजारा टायगर फोर्सच्या सर्व पदाधिका-यांचे काँग्रेस पक्षात स्वागत करून नाना पटोले म्हणाले की, स्व. वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक साहेबांचे महाराष्ट्राच्या विकासात मोलाचे योगदान राहिले आहे. त्यांनी राज्यात ऊर्जा प्रकल्पांची निर्मिती करून राज्याला प्रकाशात आणले, वसंतराव नाईक यांच्या नेतृत्वाखाली हरितक्रांती झाली. बंजारा समाजाने राज्याला दिशा दाखवून दिली. बंजारा समाज हा आत्मसन्मासाठी लढणारा, देशहितासाठी काम करणारा समाज आहे. राष्ट्रीय बंजारा टायगर्स संघटना आज काँग्रेस पक्षात विलीन झाली. टायगरला इलाका नसतो आणि पंजा फक्त टायगरकडे असतो आणि आता टायगर (वाघ) काँग्रेसमय झाला आहे, असा मिश्किल टोला पटोले यांनी लगावला.

काँग्रेस पक्षाची ताकद वाढणार

यावेळी बोलताना आ. राजेश राठोड आणि प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संजय राठोड यांनी बंजारा टायगर फोर्सच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले. बंजारा टायगर फोर्सच्या काँग्रेस पक्षातील विलीनीकरणामुळे काँग्रेस पक्षाची ताकद वाढणार आहे. भाजपचा खरा चेहरा आता बंजारा समाजासमोर आला असून बंजारा समाज भाजपला थारा देणार नाही असे ते म्हणाले. सध्याच्या परिस्थितीत फक्त काँग्रेस पक्षच बंजारा समाजाला न्याय देऊ शकतो त्यामुळे आम्ही काँग्रेस पक्षात प्रवेश केला असून यापुढे काँग्रेस विचारांवर वाटचाल करू व राज्यभरात काँग्रेस पक्ष संघटना मजबूत करू असे आत्मारामजी जाधव व मदनभाऊ जाधव म्हणाले.

संबंधित बातम्या :

पटोलेंच्या ‘स्वबळा’ला विदर्भातच बगल, नागपूर जिल्हा परिषदेत काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी

देवेंद्र फडणवीस खोटे बोलण्याची मशीन, त्यांची नौटंकी महाराष्ट्राला समजली : नाना पटोले

Nana Patole criticizes PM Narendra Modi and BJP