Sharad Pawar : काँग्रेस अहंकारी, शरद पवार यांची काँग्रेसवर थेट टीका; आत्मचरित्रात नेमके काय म्हणाले?

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचं 'लोक माझे सांगाती' हे राजकीय आत्मचरित्र प्रकाशित झालं आहे. या पुस्तकातून शरद पवार यांनी अत्यंत धक्कादायक खुलासे केले आहेत.

Sharad Pawar : काँग्रेस अहंकारी, शरद पवार यांची काँग्रेसवर थेट टीका; आत्मचरित्रात नेमके काय म्हणाले?
sharad pawar
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: May 03, 2023 | 7:28 AM

कृष्णा सोनारवाडकर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे सहसा काँग्रेसवर टीका करत नाहीत. जाहीरपणे काँग्रेसविरोधात बोलणं टाळतात. मात्र, अडचणीच्या काळात वेळोवेळी सल्ला देतात. पवार यांचं ‘लोक माझे सांगाती’ हे राजकीय आत्मचरित्र प्रकाशित झालं आहे. त्यात त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. राज्यात महाविकास आघाडी कशी निर्माण झाली याची कथाच सांगितली आहे. मात्र, हे सांगताना पवार यांनी काँग्रेसचा उल्लेख अहंकारी असा केला आहे. पवारांनी थेट टीका केली आहे. त्यामुळे आता काँग्रेस नेते त्याला काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

लोक माझे सांगाती या शरद पवार यांच्या राजकीय आत्मचरित्राचा दुसरा भाग आला आहे. त्यात अनेक राजकीय गौप्यस्फोट करण्यात आले आहेत. महाविकास आघाडी बनवताना काँग्रेसला सोबत घेताना नेमकं काय झालं? याची माहितीच पवार यांनी या पुस्तकात दिली आहे. ‘लोक माझे सांगाती’ पुस्तकात काँग्रेस महाविकास आघाडी सरकार बनवताना अहंकारी भूमिकेत होती, अशी टीका शरद पवार यांनी केली आहे.

काँग्रेसचं दबावाचं राजकारण

महाविकास आघाडी सरकार बनवण्यासाठी काँग्रेसची सोबत आवश्यक होती. त्यासाठी स्थानिक नेत्यांना दिल्लीतील पक्षश्रेष्ठींची परवानगी महत्त्वाची होती. राज्यातल्या काँग्रेस नेत्यांनी ही परवानगी मीच जाऊन पक्षश्रेष्ठीकडून घ्यावी अस मत व्यक्त केलं होतं. मी दिल्लीत जाऊन सोनिया गांधी यांना भेटलो आणि राज्यातली राजकीय कोंडी त्यांना सांगितली. सोनिया गांधी यांनी आमदारांशी बोलून अनुकूलता दर्शवली. मात्र सरकार बनवताना काँग्रेसची अहंकारी वृत्ती अनुभवायला मिळाली, असं पवार यांनी पुस्तकात लिहिलंय. महाविकास आघाडीच्या सत्तेत वाटा मिळण्याचा अंदाज आल्यानंतर काँग्रेसकडून दबावाच राजकारण सुरू झालं होतं, असंही पवार यांनी पुस्तकात म्हटलं आहे.

निवृत्तीचा निर्णय

काल यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये शरद पवार यांच्या या आत्मचरित्राचं प्रकाशन झालं. या प्रकाशनावेळी शरद पवार यांनी भाषण केलं. यावेळी त्यांच्या राजकारणातील प्रवेशापासूनचा त्यांनी आढावा घेतला. कोणती कोणती पदं भूषविली. राजकारणात काय काय अनुभव आले याची माहिती त्यांनी दिली. मात्र, हे सांगतानाच पवार यांनी कुठे तरी थांबलं पाहिजे. जास्त मोह असता कामा नये, असं सांगत आपण पक्षाच्या अध्यक्षपदावरून पायउतार होत असल्याचं जाहीर केलं. त्यामुळे एकच खळबळ उडाली.