Inflation : आत्ममग्न सरकार; चिंतामग्न जनता, महागाईवरून ‘सामना’चा केंद्र सरकारवर निशाणा

| Updated on: Jul 07, 2022 | 7:19 AM

गॅस सिलिंडरचे दर पुन्हा एकदा बुधवारी 50 रुपयांनी वाढले आहेत. यावरून सामनाच्या संपादकीयमध्ये केंद्र सरकारचा समाचार घेण्यात आला आहे.

Inflation : आत्ममग्न सरकार; चिंतामग्न जनता, महागाईवरून सामनाचा केंद्र सरकारवर निशाणा
संजय राऊत
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : बुधवारी घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरचे (LPG gas cylinder) दर पुन्हा एकदा 50 रुपयांनी वाढवण्यात आले आहेत. यावरून शिवसेनेचे (shiv sena) मुखपत्र असलेल्या सामनाच्या संपादकीयमधून केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधण्यात आला आहे. केंद्रातील राज्यकर्ते सध्या राज्या-राज्यांतील विरोधकांची सरकारे अस्थिर करण्यात मग्न आहे. त्यामुळे दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईमुळे (Inflation)’चिंतामग्न’ झालेल्या सामान्य माणसाची काळजी वगैरे करण्याशी त्यांचा संबंध राहिलेला नाही. देशातील महागाईने मागील आठ वर्षांतील उच्चांक तर गाठलाच आहे, पण त्या उच्चांकात भरच घालण्याचे काम सध्याचे सत्ताधारी करीत आहेत. स्वयंपाकाच्या गॅसचे सिलिंडर बुधवारी 50 रुपयांनी महाग झाले. त्यामुळे घरगुती गॅस सिलिंडरची किंमत मुंबईमध्ये 1 हजार 52 रुपयांच्या वर गेली आहे. गेल्या वर्षभरात घरगुती सिलिंडरच्या किंमती 834.50 रुपयांवरून 1052 रुपयांपर्यंत पोहोचल्या आहेत. म्हणजे एका वर्षात तब्बल 218.50 रुपयांचा वाढीव बोजा प्रत्येक कुटुंबाच्या बजेटवर पडला आहे. आता पुन्हा एकदा गॅस सिलिंडर महाग झाल्याची टीका सामनामधून करण्यात आली आहे.

गॅस दरवाढीचे चटके

पुढे सामना संपादकीयमध्ये म्हटले आहे की. गॅस दरवाढीचे चटके सहनच करावे लागणार आहेत. आधीच सर्व प्रकारच्या महागाईने सामान्य कुटुंबाचे दैनंदिन बजेट कोलमडले आहे, त्यात गॅस सिलिंडर मागील तीन महिन्यांत दुसऱ्यांदा महाग करण्याचा विक्रम या सरकारने केला आहे. काही महिन्यांपूर्वी खाद्यतेल, मसाल्याच्या पदार्थांनीही किमतींचा उच्चांक गाठला होता. आता त्या किमती काही प्रमाणात कमी झाल्या असल्या तरी त्या मसाल्याचा वापर असलेल्या पदार्थ्यांच्या किमती ‘जैसे थे’च ठेवल्या आहेत. त्यामुळे खाद्यतेल, पामतेल यांचे दर कमी होऊन देखील त्याचा कुठलाच फायदा हा सामान्य नागरिकांना मिळालेला नाही. केंद्र सरकार मात्र खाद्यतेल, कच्चे तेल, पामतेल स्वस्त केल्याचे ढोल वाजविण्यात मग्न आहे. खाद्यतेलाच्या अंतर्गत उत्पादनवाढीकडे दुर्लक्ष केल्यानेच आजही आपल्याला आयातीवर अवलंबून राहवे लागत असल्याचे म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

जीएसटीचे भूत

जीएसटीचे जे भूत दरवाढीच्या रुपाने सामान्य माणसाच्या मानगुटीवर बसले आहे, तेही उतरायची शक्यता नाही. जीएसटीमुळे केंद्र सरकारची तिजोरी मागील काही महिन्यांपासून अब्जच्या अब्ज उड्डाणे घेत आहे. पण सामान्य माणसाच्या खिशातील उरलेसुरले किडुकमिडुकदेखील हे जीएसटीचे भूत ओरबाडून घेत आहे त्याचे काय असा सवाल सामनामधून उपस्थित करण्यात आला आहे.