Rajya Sabha Election Results 2022 : मतदानाच्या दिवशी कंडी कुणी पिकवली?, राऊतांनी संशय का घेतला?; भुयारांनी सांगितलं नेमकं कारण!

| Updated on: Jun 12, 2022 | 7:21 PM

राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी फुटीर आमदारांना निधी देणार नसल्याचं म्हटलं आहे. त्यावर त्यांनी टीका केली. आम्ही घरच्या कामासाठी निधी मागत नाही. माझा मतदारसंघ महाराष्ट्रात आहे. पाकिस्तानात नाही.

Rajya Sabha Election Results 2022 : मतदानाच्या दिवशी कंडी कुणी पिकवली?, राऊतांनी संशय का घेतला?; भुयारांनी सांगितलं नेमकं कारण!
राऊतांनी संशय का घेतला?; भुयारांनी सांगितलं नेमकं कारण
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: राज्यसभा निवडणुकीत (Rajyasabha Election) अपक्ष आमदारांची मते फुटल्याने शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाला. त्यामुळे शिवसेनेत खळबळ उडाली आहे. या पराभवावरून शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अपक्ष आमदारांवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी मतदान न करणाऱ्या सहा अपक्ष आमदारांची जाहीरपणे नावं घेतली. त्यात राष्ट्रवादी समर्थक आमदार देवेंद्र भुयार (Devendra Bhuyar) यांच्या नावाचाही समावेश होता. राऊत यांनी आपलं नाव घेतल्याने भुयार हे चांगलेच संतापले होते. त्यांनी तात्काळ मुंबईत येऊन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेऊन आपल्यावर करण्यात आलेले आरोप खोटे असल्याचं सांगितलं. तसेच संजय राऊत यांचीही भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनाही आपल्यावरील आरोप कसे खोटे आहेत हे त्यांनी पटवून दिलं. तसेच राऊत यांचा गैरसमज दूर झाल्याचंही त्यांनी स्पष्ट केला आहे. तसेच आपल्याबाबतची कंडी कुणी पिकवली होती, याची माहितीही त्यांनी मीडियाला दिली.

संजय राऊत यांचे माझ्याबाबतचे जे गैरसमज होते. ते दूर झाले आहेत. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावरील सुप्त चर्चेमुळे तो गैरसमज झाला होता. त्या दिवशी मी मतदान केलं नाही अशी पत्रकार आणि काही नेत्यांची चर्चा सुरू होती. त्यामुळे राऊतांचा गैरसमज झाला. तसेच त्या दिवशी तीन तीन अपक्ष आमदारांनी मतदानाला जायचं ठरलं होतं. पण तुम्ही गडबड केली. तुम्ही लवकर गेलात. तुम्ही थांबायला हवं होतं, असं राऊतांनी मला विचारलं. त्यामुळे मी मुख्यप्रतोद आणि उपमुख्यमंत्र्यांच्या सूचनेमुळेच मतदान करायला गेलो होतो, असं राऊतांना सांगितलं. मी मतदानाला लवकर गेलो आणि पत्रकारांनी केलेली कुजबुज यामुळे गैरसमज झाल्याचं भुयार यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

चौकशी कराच

ज्या आमदारांनी मतदान केलं नाही. त्यांची राऊत स्वत: चौकशी करत आहेत. माझ्याबाबत त्यांचं शरद पवार यांच्याशी बोलणं झालं आहे. मुख्यमंत्र्यांशी ते चर्चा करणार आहेत. तसेच राष्ट्रवादीच्या प्रतोदांनीही खुलासा केला आहे. त्यामुळे हे प्रकरण आता संपलं आहे, असंही त्यांनी सांगितलं. तसेच या प्रकरणाचा तपास केला जावा. यातील कोण फुटलं याची माहिती पुढे आली पाहिजे, अशी मागणीही आपण राऊत यांच्याकडे केल्याचं ते म्हणाले.

आघाडीसोबत होतो, आहे, राहील

विधान परिषदेच्या निवडणुकीतही मी आघाडीसोबत राहणार आहे. मी यापूर्वीही आघाडी सोबत होतो. आताही आहे आणि पुढेही राहील. भाजपचे विचार आणि तत्त्व आपल्याला पटत नाहीत. त्यामुळे त्यांच्यासोबत जाण्याचा प्रश्नच येत नाही, असं ते म्हणाले.

मॅजिक फिगर कायम राहील

राज्यसभेच्या निवडणुकीत आघाडीची मते फुटली त्याला कारण आघाडीच आहे. शिवसेना आणि महाविकास आघाडीचे नियोजन व्यवस्थित नव्हतं. एकमेकांवर विसंबून राहिले. त्यामुळे पराभव झाला. आता नियोजन करा. काळजी घ्या. नाही तर आमदारांवर खापर फोडाल, असंही ते म्हणाले. आता आमची मतं फुटणार नाहीत. तळ्यातमळ्यातील लोकांची मतेही फुटणार नाहीत. मॅजिक फिगर कायम राहील, असा दावाही त्यांनी केला.

माझा मतदारसंघ पाकिस्तानात नाही

राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी फुटीर आमदारांना निधी देणार नसल्याचं म्हटलं आहे. त्यावर त्यांनी टीका केली. आम्ही घरच्या कामासाठी निधी मागत नाही. माझा मतदारसंघ महाराष्ट्रात आहे. पाकिस्तानात नाही. वडेट्टीवारही महाराष्ट्राचे मंत्री आहेत. मी घरच्या कामासाठी निधी मागत नाही. मतदारसंघातील जनतेसाठी निधी मागत आहे. आमदार जाऊ द्या चुलीत. पण जनतेसाठी तर निधी द्या. निधी न देण्याची भाषा योग्य नाही. चुकीची आहे, असंही ते म्हणाले.