काँग्रेसची आपटी, भाजप नामानिराळी, नाशिकचं गणित कुणी जुळवून आणलं? देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं….

| Updated on: Jan 13, 2023 | 4:21 PM

सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरण्यामागे भाजपचीच खेळी असल्याचं म्हटलं जातंय. कारण या निवडणुकीत भाजपने अखेरपर्यंत आपला उमेदवार दिला नाही.

काँग्रेसची आपटी, भाजप नामानिराळी, नाशिकचं गणित कुणी जुळवून आणलं? देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं....
Image Credit source: social media
Follow us on

अभिजित पोते, पुणेः नाशिक पदवीधर मतदार संघातल्या घडामोडींकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय. गुरुवारी अत्यंत नाट्यमय घडामोडींनंतर या निवडणुकीत काँग्रेस सपशेल तोंडावर आपटल्याचं चित्र दिसलं तर भाजप नामानिराळी राहिल्याचं दिसून आलं. हा सगळा खेळ कुणी जमवून आणला, असा प्रश्न विचारला असता भाजपमधील एकाच नेत्याचं नाव समोर येतं. पुण्यात यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘ आम्ही कोणतंही गणित घडवलेले नाही. मी त्यांच्या पुस्तक प्रकाशनाला गेलो होतो, पण सगळेच नेते तिथं होते. त्यामुळं हा घटनाक्रम चुकीच्या पद्धतीने जोडू नये. योग्यवेळी सगळं समोर येईल.

आम्ही कोणता उमेदवार द्यायची यावर चर्चा सुरू होती. राजेंद्र विखेंनी उमेदवारी घ्यावी अशी चर्चा होती पण ऐनवेळी उमेदवारी द्यायचं नाही असं ठरलं, असं स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.

नाशिकमध्ये काय घडलं?

नाशिक पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली होती. मात्र काल उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी सुधीर तांबे यांनी निवडणुकीतून माघार घेतली.

तर त्यांचे पुत्र सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला. काँग्रेसमध्ये असूनही सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरण्यामागे भाजपचीच खेळी असल्याचं म्हटलं जातंय. कारण या निवडणुकीत भाजपने अखेरपर्यंत आपला उमेदवार दिला नाही.

सत्यजित तांबे यांना पाठिंबा देणार का?

काँग्रेसचे नेते असलेले सत्यजित तांबे यांनी ऐनवेळी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला. आता भाजप, शिवसेनेचे दोन्ही गट तसेच राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देण्यासाठी विनंती करणार असल्याचं सत्यजित तांबे यांनी म्हटलंय.

त्यामुळे भाजपा सत्यजित तांबे यांना पाठिंबा देणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘ आमचं धोरण बावनकुळे यांनी सांगितलं आहे. सत्यजित तांबे यांचं काम चांगलं आहे. पण कोणताही निर्णय धोरणात्मक घ्यायचा असतो…

बावनकुळे काय म्हणाले?

सत्यजित तांबे यांनी पाठिंबा मागितला तर यापुढचा निर्णय पक्षातील वरिष्ठ नेतृत्व, केंद्रीय बोर्डातर्फे घेण्यात येईल, अशी भूमिका बावनकुळे यांनी स्पष्ट केली आहे.