Devendra Fadnavis : ‘हा तर आणखी एक टोमणे बॉम्ब… जवाब मिलेगा और ठोक के मिलेगा’, फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना इशारा; अन्य भाजप नेत्यांकडूनही प्रत्युत्तर

| Updated on: May 14, 2022 | 11:04 PM

बाबरी पाडल्याबद्दल ज्या 32 नेत्यांवर आरोपपत्र दाखल झाले त्यात तुमचा एक महाराष्ट्राचा नेता दाखवा', असं आव्हानच फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना दिलं होतं. त्यानंतर शनिवारी बीकेसीतील मैदानात उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांवर जोरदार पलटवार केलाय. त्यावर फडणवीसांनीही ट्वीट करत अजून एक टोमणे बॉम्ब, असा टोला लगावला आहे.

Devendra Fadnavis : हा तर आणखी एक टोमणे बॉम्ब... जवाब मिलेगा और ठोक के मिलेगा, फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना इशारा; अन्य भाजप नेत्यांकडूनही प्रत्युत्तर
देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी अयोध्या, हिंदुत्व, महागाई, बेरोजगारी आदी मुद्द्यांवरुन जोरदार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. देवेंद्र फडणवीस यांनी सोमय्या मैदानावरील सभेत बोलताना अयोध्येच्या मुद्द्यावरुन शिवसेनेवर (Shivsena) जोरदार टीका केली होती. ‘भोंगे उतरवायला ज्यांची हातभर फाटते, ते म्हणतात आम्ही बाबरी पाडली, काय विनोद आहे. बाबरी पाडल्याबद्दल ज्या 32 नेत्यांवर आरोपपत्र दाखल झाले त्यात तुमचा एक महाराष्ट्राचा नेता दाखवा’, असं आव्हानच फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना दिलं होतं. त्यानंतर शनिवारी बीकेसीतील मैदानात उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांवर जोरदार पलटवार केलाय. त्यावर फडणवीसांनीही ट्वीट करत अजून एक टोमणे बॉम्ब, असा टोला लगावला आहे.

उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांच्या अयोध्येबाबतच्या दाव्यावर जोरदार टीका केली. ‘ते म्हणतात बाबरीच्या वेळेला शिवसैनिक नव्हतेच. मी गेलो होतो म्हणे तिकडे. अरे तुमचं वय काय? शाळेच्या सहलीला गेला होतात? चला चला चला अयोध्येला चला, बाबरी बघायला चला… तुम्ही आमच्यावर शंका उपस्थित करताय तर माझा तुम्हाला प्रश्न आहे की तुम्ही तरी हिंदुत्वासाठी काय केलं? देवेंद्रजी तुम्ही खरच तिकडे गेला होतात तर नुसता चढायचा प्रयत्न केला असता तरी बाबरी तुमच्या वजनाने खाली आली असती. या लोकांना श्रमच करावे लागले नसते. तुम्ही एक पाय ठेवला असता तरी बाबरी खाली आली असती’, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर पलटवार केलाय.

हे सुद्धा वाचा

‘जवाब मिलेगा और ठोक के मिलेगा!’

उद्धव ठाकरे यांच्या टीकेला फडणवीसांनीही ट्वीटद्वारे उत्तर दिलंय. इतकंच नाही तर जवाब मिलेगा और ठोक के मिलेगा असा इशाराही त्यांनी दिलाय. ‘सर्वत्र पळापळ अन् गदारोळ, नागरिक भयभीत अन् विरोधक दहशतीत, सर्वत्र सन्नाटा अन् लोक घामाघूम…
अरे छट हा तर निघाला…आणखी एक ‘ टोमणे बॉम्ब’… जवाब मिलेगा और ठोक के मिलेगा!’ असं ट्वीट फडणवीस यांनी केलंय.

त्यांना मुख्यमंत्रीपदाचाच विसर पडल्याचे दिसले – पाटील

उद्धव ठाकरे शनिवारी मुंबईतील सभेत भाषण करताना राज्याच्या विकासाच्या अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोलायचे विसरले. स्वतः पेट्रोल डिझेलची महागाई कमी करण्याची जबाबदारी विसरले. दाऊदच्या टोळीशी व्यवहार करणाऱ्याला आपण मंत्रिमंडळात ठेवले आहे, हे सुद्धा विसरले. त्यांना मुख्यमंत्रीपदाचाच विसर पडल्याचे दिसले, अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.

ते म्हणाले की, भाजपा दाऊदला मंत्री करेल, असा टोमणा उद्धव ठाकरे यांनी मारला. पण ते हे विसरून गेले की, दाऊद इब्राहिमच्या टोळीला आर्थिक मदत होईल अशा रितीने त्याच्या साथीदारांशी आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप असलेला एक मंत्री त्यांच्या मंत्रिमंडळात आहे. या नेत्याला तुरुंगात जावे लागले तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याला मंत्रिमंडळात कायम ठेवले आहे.

भाजपच्या द्वेषाचा पाढा वाचला – भातखळकर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: काय केलं? कोणती योजना आणली? त्यांनी भाजपच्या द्वेषाचा पाढा वाचला. यशवंत जाधव यांच्या संपत्तीबद्दल का बोलले नाहीत? तुमच्यावर आरप झाले त्याबाबत का बोलला नाहीत? या प्रश्नांची आधी उत्तरं द्या. तुम्ही मातोश्रीत बसला होता. तुम्ही भाजपच्या द्वेषाची गरळ ओकण्याचं काम केलं. शिवसेना हिंदुत्वाची मारेकरी आहे, मराठीची मारेकरी आहे आणि विकासाचीही मारेकरी आहे, अशी टीका भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

ही तर टोमणे सभा – बावनकुळे

मुख्यमंत्र्यांचं भाषण म्हणजे रटाळवानं भाषण. महाराष्ट्राला काय दिलं? ही कार्यकर्त्यांपुरती सभा होती. यातुन महाराष्ट्राचं काही भलं होणार नाही. अशा टोमणे सभा बंद करा. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला पुढे नेलं होतं. आता महाराष्ट्र मागे गेला आहे. उद्धवजी महाराष्ट्राचे दौरे करा आणि परिस्थिती पाहा, शेतकऱ्यांची अवस्था पाहा, दिलेले शब्द पूर्ण केले का पाहा. अशा सभांनी गरीब माणसांचं पोट भरणार नाही. पारिवारिक विषयांसाठी सभा घेऊन स्पष्टीकरण देत आहात, अशी टीका भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलीय.

मुख्यमंत्री स्वत: भरकटले आहेत – लाड

भाजप आमदार प्रसाद लाड यांनीही मुख्यमंत्री आणि संजय राऊत यांच्यावर टीका केलीय. संजय राऊत स्वत:ला छत्रपती समजायला लागले. दिशाभूल करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केला. मुख्यमंत्री स्वत: भरकटले आहेत. महाराष्ट्राला अज्ञानी मुख्यमंत्री लाभले हे महाराष्ट्राचे दुर्भाग्य, अशी टीका लाड यांनी केलीय.