आदित्यजी, सावरकरांना बलात्कारी म्हणणाऱ्या काँग्रेसच्या अंकावर बंदी घालण्याची हिंमत आहे का? : फडणवीस

| Updated on: Feb 26, 2020 | 2:22 PM

मी आधीच बोललो होतो, की बांगड्या घालण्याचं वक्तव्य कोणाला आवडणार नाही. त्यामुळे मी गप्प बसणार का, असं म्हटल्याचं देवेंद्र फडणवीस आदित्य ठाकरेंना उत्तर देताना म्हणाले

आदित्यजी, सावरकरांना बलात्कारी म्हणणाऱ्या काँग्रेसच्या अंकावर बंदी घालण्याची हिंमत आहे का? : फडणवीस
Follow us on

मुंबई : विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यातील बांगड्यांवरुन रंगलेला वाद चांगलाच पेटला आहे. ‘बांगड्या घालण्याचं वक्तव्य कोणाला आवडणार नाही. त्यामुळे मी गप्प बसणार का, असा प्रश्न विचारला होता. परंतु आदित्य ठाकरेजी, सावरकरांना बलात्कारी म्हणणाऱ्या काँग्रेसच्या ‘शिदोरी’ अंकावर बंदी घालण्याची हिंमत तुमच्या सरकारमध्ये आहे का?’ असा थेट सवाल फडणवीसांनी आदित्य ठाकरेंना विचारला. (Devendra Fadnavis answers Aditya Thackeray)

‘मी आधीच बोललो होतो, की बांगड्या घालण्याचं वक्तव्य कोणाला आवडणार नाही. त्यामुळे मी गप्प बसणार का, असं म्हटलं. परंतु त्यांनी माझं भाषण पूर्ण ऐकलं असतं, तर असं वक्तव्य केलंच नसतं. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावरुन वाद निर्माण होईल, याची कल्पना त्यांना होती, त्यामुळे या वादाला बगल देण्यासाठी त्यांनी दुसरा मुद्दा उपस्थित केला. पण आदित्य ठाकरेजी, सावरकरांना बलात्कारी म्हणणाऱ्या काँग्रेसच्या ‘शिदोरी’ मासिकावर बंदी घालण्याची हिंमत तुमच्या सरकारमध्ये आहे का? आधी हे सांगा, मग बाकीच्या गोष्टी बोलू’ असं चॅलेंज देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंना दिलं.

याआधी, बांगड्या भरण्याबाबत वक्तव्यावरुन देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांच्यात रंगलेल्या कलगीतुऱ्यात मिसेस फडणवीसांनीही उडी घेतली होती. ‘रेशमी किड्याला आयुष्यातील ‘उपहास’ कधीच समजणार नाही, कारण पूर्वजांनी विणलेल्या सुखासीन ‘रेशमी’ आयुष्याचा उपभोग घेतच त्यांची भरभराट होते. देवेंद्र फडणवीसजी, तुमच्या संघर्षाचा आणि भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मेहनतीचा अभिमान वाटतो’ असा पलटवार अमृता फडणवीसांनी केला होता.

काय आहे प्रकरण?

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला उद्देशून बांगड्यांवरुन केलेल्या वक्तव्याला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिलं होतं. देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागावी अशी विनंती आदित्य ठाकरे यांनी केली होती.

देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या आंदोलनादरम्यान आझाद मैदानातील भाषणावेळी शिवसेनेवर हल्लाबोल केला होता. वारिस पठाण यांच्या वक्तव्याचा निषेध करताना, ‘शिवसेनेने बांगड्या घातल्या असतील, आम्ही नाही असं म्हटलं होतं’. त्याला आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिलं होतं.

सहसा मी प्रत्युत्तर देत नाही, पण.., बांगड्यांबाबतच्या विधानावर आदित्य ठाकरेंचं फडणवीसांना उत्तर!

आदित्य ठाकरे यांनी ट्विट करुन माफी मागण्याची विनंती केली होती. “देवेंद्र फडणवीसजी, सहसा मी प्रत्युत्तर देत नाही. कृपया बांगड्यांबाबतच्या विधानाबाबत माफी मागा. सर्वात शक्तिशाली असा महिलावर्ग बांगड्या परिधान करतो. राजकारण चालूच राहील, पण ही मानसिकता बदलायला हवी. किमान माजी मुख्यमंत्र्यांकडून तरी अशी अपेक्षा नाही” असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं होतं.

देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले होते?

माजी आमदार वारिस पठाण यांच्या 100 कोटी विरुद्ध 15 कोटीच्या वादग्रस्त वक्तव्यावरुन फडणवीसांनी शिवसेनेला घेरलं होतं. आमचा हिंदू समाज सहिष्णू आहे, मात्र त्याला आमची दुर्बलता समजून असा कोणी लावारीस बोलत असेल, तर त्याला आम्ही सोडणार नाही.

“शिवसेनेने बांगड्या घातल्या असतील, खरं म्हटलं तर बांगड्या घातल्या हा शब्द आमच्या महिला कार्यकर्त्यांना आवडत नाही आणि म्हणून मी तो वापरणार नाही. मात्र, शिवसेना मूग गिळून बसली असेल, तरी आम्ही मूग गिळून बसणार नाही”, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीसांनी केलं होतं.

शिवाजी महाराजांचा अपमान झाला तरी चालेल मात्र आम्ही खुर्ची सोडणार नाही, अशी शिवसेनेची भूमिका आहे. पण भाजप शिवाजी महाराजांच्या वंशजांचा अपमान सहन करणार नाही. कोण आहे तो वारिस की लावारिस? असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केला होता.

भाजपने महाआघाडी सरकारविरोधात काल राज्यव्यापी एल्गार आंदोलन पुकारलं होतं. राज्यभरात विविध ठिकाणी 400 आंदोलनं झाल्याचा दावा भाजपने केला. मुंबईतील आझाद मैदानातील आंदोलनाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह सर्व भाजप दिग्गजांनी हजेरी लावली. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला होता.

Devendra Fadnavis answers Aditya Thackeray