अहमद भाईंमुळे अनेकांचा शपथविधी झाला, त्यांनी अनेकांना मुख्यमंत्री, मंत्री बनवलं : देवेंद्र फडणवीस

| Updated on: Dec 14, 2020 | 10:10 PM

"अहमद पटेल खूप मोठे नेते होते. पण तरीही ते अतिशय साधेपणाने वागत, साधेपणाने राहत", अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी भावना व्यक्त केल्या (Devendra fadnavis getting emotional on Ahmed Patel death).

अहमद भाईंमुळे अनेकांचा शपथविधी झाला, त्यांनी अनेकांना मुख्यमंत्री, मंत्री बनवलं : देवेंद्र फडणवीस
Follow us on

मुंबई : “काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांच्या निधनाने देशाच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ज्या व्यक्तीने अनेक मुख्यमंत्री, मंत्री बनवले त्यांनी स्वत: मंत्री बनण्याचा विचार केला नाही. अनेकांचा शपथविधी त्यांच्यामुळे झाला. पण त्या कार्यक्रमात हजर राहण्याचा त्यांनी प्रयत्न केला नाही. पाठीमागे उभं राहून पक्षाला कशाप्रकारे मजबुती देता येईल, असाच प्रयत्न नेहमी ते करायचे. म्हणून काँग्रेसचे दिवंगत अध्यक्ष राजीव गांधी, विद्यमान अध्यक्षा सोनिया गांधी यांचे अतिशय निकटवर्तीय म्हणून त्यांनी काम बघितलं”, अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अहमद पटेल यांच्या आठवणींना उजाळा दिला (Devendra fadnavis getting emotional on Ahmed Patel death).

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्यावतीने रविवारी (14 डिसेंबक) अहमद पटेल यांच्या श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आलं. या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या (Devendra fadnavis getting emotional on Ahmed Patel death).

“अहमद पटेल यांचं अचानक दुखद निधन झालं. त्यांच्या निधनाची बातमी ऐकून सर्वांनाच धक्का बसला. देशाच्या एकूण राजकारणात प्रचंड मोठं स्थान अहमद भाईंनी मिळवलं होतं. काँग्रेसची संघटन वाढण्याचं काम ते करत होते. माझा आणि त्यांचा फार परिचय येऊ शकला नाही. पण दोन वेळा त्यांची भेट झाली होती. एकदा तर आमच्या गप्पादेखील झाल्या होत्या. त्यांचा सन्मान खूप मोठा होता. पण तरीही ते अतिशय साधेपणाने वागत, साधेपणाने राहत”, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी भावना व्यक्त केल्या.

“सर्वच पक्षात मंत्री बनायला अनेक लोक असतात. पण संघटन चालवण्याचं काम करणारे कमी असतात. संघटनाचे काम चालवणारे अहमद पटेल होते. त्यांच्या जाण्याने काँग्रेस पक्षाची मोठी हानी झाली आहे. देशाच्या एकून राजकीय वातावरणात सर्व पक्षांमध्ये सर्व विचारांच्या लोकांमध्ये त्यांचा संबंध होता आणि प्रत्येकाच्या कामी धावून जायचं अशाप्रकारची त्यांची कार्यपद्धती होती”, असं फडणवीस म्हणाले.

शरद पवार भावूक

“मी सकाळपासून विचार करतोय काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांच्या शोकसभेला जाण्याचे संकट आलेलं आहे, त्यात कशा पद्धतीने बोलावं. अहमद भाई बद्दल काय बोलावे विचार करत असताना मला आठवण आली, काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नेते राजीव गांधी यांच्या काळात अहमद यांनी अत्यंत थोडा काळ सत्तेत घालवला. पण त्यांचं मन सत्तेत रमले नाही. त्यांचं मन संघटना मोठी करण्यात होतं. त्यांच्यासारखं काम महाराष्ट्रमध्ये ज्यांनी केलं ते होते वसंतदादा पाटील”, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रसचे नेते शरद पवार यांनी भावना व्यक्त केल्या.

“मी 1984 साली लोकसभेवर निवडून गेलो त्यावेळी राजीव गांधी यांच्या समवेत काम केलं. त्यावेळी अहमद भाई राजीवजी यांच्यासोबत होते. संयुक्त सरकारला चालविण्यासाठी ज्या समस्या निर्माण व्हायच्या त्या सोडविण्यासाठी अहमद भाई महत्वाचा दुवा होते. मनमोहन सिंग यांच्या 10 वर्षाचा काळ होता तेव्हा समस्यांचे निराकरण करण्याची जबाबदारी अहमद भाई पार पाडायचे”, असं शरद पवार म्हणाले.

काँग्रेसच्या डावपेचांच्या मागे अहमदभाई : मुख्यमंत्री

उद्धव ठाकरेंनी यावेळी अहमद पटेल यांच्यासोबतच्या संबंधावर भाष्य केले. अहमद पटेल यांच जाण्यानं मला 2 धक्के बसले आहेत, असं मुख्यमंत्री म्हणाले. “अहमद पटेलांविषयी माझ्याकडे असे काही किस्से नाहीत. मात्र, त्यांची कारकीर्द ही अहमदभाई काँग्रेस नेते म्हणून आणि मी सेना नेता म्हणून अशी राहिली, आम्ही विरोधात होतो.” काँग्रेस आणि सेना एकत्र येते, राजकीय नाते पुढे जाते आणि अचानक राजकीय आघात होतो, हे दुःखदायक आहे. बऱ्याच वेळा काँग्रेस डावपेच करायचे आणि आम्ही शोध लावायचो त्यावेळी कळायचे की यामागे अहमदभाई आहेत, असं मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “अहमद पटेल यांची माझी फार पूर्वी एकदा भेट झाली होती. त्यावेळी मी त्यांना म्हटलं की ऐसे होगा तो आगे कैसे होगा. मात्र, यातून अहमदभाईंनी मार्ग काढला.” उद्धव ठाकरेंनी अहमद पटेल यांच्याविषयी आणखी एक आठवण सांगितली.”एकदा मी घरी पोहोचलो होतो, रात्रीचे 12.15 वाजले होते, त्यांच्याकडून फोन करण्यास सांगितले होतं. मी उशिरा फोन केला तेव्हा सांगण्यात आलं की ते झोपले आहेत. तुम्ही रात्री 2 ते 2.30 दरम्यान फोन करा त्यांची अपॉइंटमेंट आहे. तेव्हा मला कळलं की ते कामाच्या बाबतीत किती तत्पर आहेत.

अहमद पटेलांनी कडक स्वरात लोकांसोबत संवाद साधला नाही: जावेद अख्तर

“मी कुणी राजकारणी नाही किंवा राजकीय पक्षाचा सदस्य नाही. अहमद पटेल यांनी मला राज्यसभेचे सदस्य बनविले. आम्हा कलाकारांना काही अडचण होती, त्यावेळी अहमद पटेल यांन एकदा काम सांगितले की परत ते आम्हाला सांगायचे नाही किंवा आम्ही विचारायचो नाही. ते काम मात्र होऊन जायचं”, असं ज्येष्ठ लेखक आणि गीतकार जावेद अख्तर म्हणाले.

संबंधित बातम्या : 

काँग्रेसच्या डावपेचांचा शोध लावायचो, तेव्हा कळायचे, त्यामागे अहमदभाई आहेत : उद्धव ठाकरे

अहमद पटेलांचं मन सत्तेत रमलं नाही, त्यांना संघटना मोठी करायची होती : शरद पवार